श्रीनगर : भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या जवानाने बलिदान दिलं आहे. जम्मूच्या कुपवाड्यातील माछिल सेक्टरमध्ये झालेल्या गोळीबारात सांगलीचे नितीन सुभाष कोळी शहीद झाले आहेत. नितीन सुभाष कोळी यांच्यासोबतच शिख रेजिमेंटचे मनदीप सिंह देखील शहीद झाले आहेत.
पाकिस्तानच्या गोळीबारात काल रात्री कॉन्स्टेबल नितीन सुभाष कोळी जखमी झाले होते. मात्र आज त्यांना वीरमरण आलं. मूळ सांगलीतील दूधगावचे असणारे नितीन कोळी 2008 साली बीएसएफमध्ये रुजू झाले होते. ते सध्या बीएसएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून सीमेचं संरक्षण करत होते. त्यांच्यामागे पत्नी तसंच चार आणि दोन वर्षांची दोन मुलं असा परिवार आहे.
माछिल सेक्टरमध्ये सीमेवर पेट्रोलिंग करणाऱ्या बीएसएफ जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी शुक्रवारी रात्री भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात मनजित सिंह आणि नितीन कोळी यांना वीरमरण आलं. कठुआ, माछिलसह अनेक भागात पाकिस्तानकडून गोळीबार सुरु आहे. ज्यात प्रामुख्यानेसीमेलगतच्या गावांना लक्ष्य केलं जातं आहे. कठुआ भागात तर पाकिस्ताननं थेट तोफांचाही मारा केल्याचं वृत्त आहे. भारतीय जवानही पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहेत.
दरम्यान, भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 56 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा