Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Rahul Gandhi On Delhi Protest : अमित शाहांनी दिल्लीत लाठीचार्जचा आदेश दिला नसता तर ते संसदेत आले असते आणि स्पष्टीकरण दिलं असतं. पण ते तसं करत नाहीत, असं विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्ली: नीट पेपरफुटीवर आंदोलन (NEET Paper Leak Protest) करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाल्यानंतर आता त्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसतंय. लोकसभेत या मुद्द्यावरून आपल्याला बोलू दिलं नसल्याचा आरोप करत राहुल गांधींनी यावर माध्यमांशी संवाद साधला. दिल्लीतील लाठीचार्ज हा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या आदेशानेच केला. अमित शाहांमुळेच आंदोलक विद्यार्थी हे रक्तबंबाळ झाले, चिरडले गेले, असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. अमित शाहांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी राहुल गांधी यांनी केली.
अमित शाह हे देशाचे हिरो आहेत अशी इमेज निर्माण केली जात आहे. त्यासाठी मोठा पैसा लावण्यात आला आहे, वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. परंतु विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे त्यांच्या इमेजचा फुगा फुटला आहे, असा टोला राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, दिल्लीत शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांच्या लाठ्यांना खिळेही होते. तसेच यामध्ये विद्यार्थ्यांना विद्युत करंटही देण्यात आला. एका विद्यार्थाला पेलेट गनच्या माऱ्यामुळे अंधत्व आलं आहे. महिलांना, मुलींनाही मारण्यात आलं. यामध्ये पोलीसांच्या वर्दीत नसलेले काहीजणही लाठीचार्ज करत होते.
या प्रकरणावर मी संसदेत बोलत होतो पण मला बोलू दिलं गेलं नाही. यावर मंत्री बोलले, पण मला संधी दिली नाही. मला माफी मागायला लावली, पण मी माफी मागितली नाही. विद्यार्थ्यांचा मुद्दा उपस्थित करणं हा माझा अधिकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
'अमित शाहांच्या आदेशानेच लाठीचार्ज'
राहुल गांधी म्हणाले की, "दिल्लीतील पोलीस हे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. अमित शाहांच्या आदेशानेच पोलीस चालतात. अमित शाहांनीच विद्यार्थांना चिरडलं, मारलं, रक्तबंबाळ केलं. गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय गोळीबार किंवा पेलेटगनचा वापर केला जात नाही. अमित शाहांना याची कशाचीच माहिती नसेल तर ते अकार्यक्षम मंत्री आहेत. 25 जुलै रोजी मी गृहमंत्र्यांना पत्र लिहिलं आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचा आदेश कुणी दिला असं विचारलं. त्याची माहिती मला अद्याप देण्यात आली नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही खूप हुशार आहात, तर तसं नाही. लाठीचार्जचा आदेश कुणी दिला याची जबाबदारी निश्चित करणं गरजेचं आहे."
अमित शाह हे लोकसभेत येत नाहीत, लाठीचार्ज कुणी केला याची माहिती देत नाहीत. ते जर अपराधी नसते तर लगेच लोकसभेत आले असते आणि स्पष्टीकरण दिलं असतं. पण ते तसं करत नाहीत, असं राहुल गांधी म्हणाले.
ही बातमी वाचा:
Before You Go
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती





















