Pahalgam : दहशतवादी हल्ल्यामध्ये 'संधी' शोधण्याचा विमान कंपन्यांचा नालायकपणा, दिल्लीपर्यंतचे 15 हजारांचे तिकीट दर 65 हजारांवर नेलं
Pahalgam Terror Attack : एकीकडे दहशतवादी हल्ल्यामुळे लोक भयभीत, असहाय्य झाले असताना दुसरीकडे विमान कंपन्यांनी मात्र त्यांच्या असहाय्यतेचा फायदा घेतल्याचं दिसून आलं.

नवी दिल्ली : एकीकडे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack ) 26 पर्यंटकांनी जीव गमावला, देश दुःखात बुडाला... त्याचवेळी दुसरीकडे देशातील विमान कंपन्यांनी (Flight Company) या हल्ल्यामध्ये संधी शोधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं. श्रीनगर ते नवी दिल्ली या मार्गावरील नेहमीचे विमान तिकीट (Shrinagar To Delhi Flight Ticket Rate) हे 12 ते 15 हजार इतके असते. मात्र हल्ल्यानंतर पर्यटकांची आगतिकता पाहता विमान कंपन्यांनी तिकीट दर 65 हजारांपर्यंत नेले. यावरुन देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
आधीच संकटात सापडलेल्या पर्यंटकांसमोर विमान कंपन्यांनी त्यांची लायकी दाखवत आणखी एक संकट उभं केलं. श्रीनगरहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या तिकिटात चौपट ते पाचपट वाढ करत फायदा कमावण्याचा प्रयत्न केला.
पहलगाममध्ये 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर श्रीनगर ते दिल्ली आणि इतर शहरांच्या विमान तिकिटांच्या किमतीत अचानक वाढ झाली होती. 26 पर्यटकांचा बळी घेणाऱ्या हल्ल्यानंतर, संकटातून बाहेर पडण्यासाठी गर्दी झाली होती. त्याचा फायदा घेऊन विमान कंपन्यांनी तिकीट दरात अनेक पट वाढ केली होती.
हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, श्रीनगर ते दिल्ली एक मार्गी विमान तिकिटाची किंमत 65,000 रुपयांपर्यंत गेली होती. सामान्य दिवसांमध्ये त्याच तिकिटांची किंमत ही 12,000 ते 15,000 रुपयांदरम्यान होती. उदाहरणार्थ, स्पाईसजेटचे 24 एप्रिलचे फ्लाइटचे भाडे 28,800 रुपये होते. तर त्याच विमानाचे दर हे इतर दिवशी 14,600 रुपये आहे. इंडिगो फ्लाइटचे दरही पुन्हा 15,000 रुपयांवर आणण्यात आले आहेत.
ये सीधी सीधी लूट है. एयरलाइन कंपनियों का बर्ताव आतंकियों से भी ज्यादा खराब है. वो जान के दुश्मन हैं और ये लोग माल के. आक थू तुम पर एयरलाइन वालों. सब बर्बाद हो जाओगे एक दिन. pic.twitter.com/tW2ZfW7BnO
— आजाद भारत का आजाद नागरिक (@AnathNagrik) April 25, 2025
विमान कंपन्यांनी 4 ते 5 पटीने दरवाढ केली
अचानक झालेल्या या वाढीमुळे सोशल मीडियावर लोक संतापले. बऱ्याच वापरकर्त्यांनी एअरलाइन्सवर 'देश संकटात असताना नफा कमावण्याचा' आरोप केला. एका यूजरने लिहिले की, श्रीनगर-दिल्ली फ्लाइटचे भाडे नेहमीपेक्षा 4 ते 6 पटीने जास्त आहे. हा संकटाचा काळ आहे आणि अशा परिस्थितीत खाजगी क्षेत्रात खुलेआम लूट सुरू आहे.
हे दहशतवादी हल्ल्यापेक्षा भयंकर
अनेक युजर्सने सोशल मीडियावर आपला राग व्यक्त केला आणि हे दहशतवादी हल्ल्यापेक्षाही भयंकर असल्याचे म्हटले. संपूर्ण देश शोकसागरात बुडालेला असताना विमान कंपनी अपघातग्रस्तांकडून मनमानी भाडे आकारत आहेत.
सोशल मीडियावर वाढता दबाव आणि प्रवाशांच्या तक्रारींनंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने विमान कंपन्यांना भाडे नियंत्रित करण्याचे आणि अतिरिक्त उड्डाणे चालवण्याचे निर्देश दिले. यानंतर एअर इंडिया आणि इंडिगोने श्रीनगर ते दिल्ली आणि मुंबईसाठी अतिरिक्त उड्डाणे जाहीर केली. याव्यतिरिक्त, एअरलाइन्स 30 एप्रिलपर्यंत तिकीट रद्द करणे आणि संपादन शुल्कावर सूट देत आहेत.
पहलगाम हल्ल्यामुळे आणि त्यानंतरच्या घटनांमुळे काश्मीरच्या पर्यटन उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक व्यापारी आणि मार्गदर्शकांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेची मागणी करण्यासाठी मोर्चे काढले. पर्यटनावर अवलंबून असलेल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला हा मोठा धक्का आहे.























