Operation Sindoor : दिनकरांच्या कवितेचा आधार, रामायणाचा संदर्भ अन् किक्रेटचे उदाहरण; भारतीय लष्कराने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाडला
Indian Army PC On Operation Sindoor : दहशतवाद्यांच्या सहकार्याला पाकिस्तानची सेना आली तर त्याचीही आहुती दिली जाईल असा भारतीय सैन्याने स्पष्ट शब्दात इशारा दिला.

नवी दिल्ली : DGAO एअर मार्शल ए.के. भारती, DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई आणि DGNO व्हाईस अॅडमिरल ए.एन. प्रमोद... सैन्यदलाच्या या तीन मोठ्या अधिकाऱ्यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. कधी राष्ट्रकवी दिनकरांच्या शब्दातील कृष्णनीती, कधी रामचरित मानसमधील दोहे तर कधी क्रिकेटचे दाखले देत पाकिस्तानला इशारा दिला. या तिघांनी भारताने पाकवर केलेल्या प्रतिहल्ल्यासाठी नैतिक अधिष्ठान काय आहे हे सुद्धा स्पष्ट केलं. पाकिस्तानची झालेली वाताहत पुराव्यानिशी जगासमोर मांडली. या निमित्तानं एका प्रोफेशनल आर्मीचे प्रोफेशनल अधिकारी कसे असतात हे जगाला पुन्हा पाहायला मिळालं.
ऑपरेशन सिंदूरचे अपडेट देण्यासाठी भारतीय सैन्यदलाचे तीन मोठे अधिकारी सोमवारी दुसऱ्यांदा एकत्र जमले. सैन्यदलाची कामगिरी सांगताना रविवारी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला शिवतांडवचे सूर घुमले होते. दुसऱ्या दिवशी सुरुवातीला कानावर पडले कृष्णनीतीचे शब्द. राष्ट्रकवी दिनकर यांच्या शब्दात ज्याचा सार होता- याचना नही अब रण होगा...
याचना नही अब रण होगा!
दुर्योधनाप्रमाणे पाकिस्तानला समजावून सांगण्याचे सगळे प्रयत्न करुन पाहिले तरी तो ऐकत नाही, हल्ल्यावर हल्ले करतोय त्याला उत्तर म्हणून भारताने शेवटचा पर्याय वापरला. याचना नही अब रण होगा- या भूमिकेतून भारताने प्रतिहल्ला चढवला. भारतीय सैन्यदलाचा हा संदेश तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत पाकिस्तानसह जगाला सांगितला.
एका प्रश्नाच्या उत्तरात एअर मार्शल एके भारती यांनी रामचरित मानसचा दोह्याचा दाखला दिला. ज्यात लंकेला जाण्यासाठी समुद्रदेवतेची प्रार्थना करुन उपयोग झाला नाही, तेव्हा श्रीरामाने धनुष्याला बाण लावला. हा प्रसंग सांगत भारताची नैतिक भूमिका स्पष्ट केली आणि पाकला इशारा दिला.
क्रिकेटचा किस्सा अन् दहशतवाद्यांचा खात्मा
एअर मार्शल एके भारतींपासून DGMO राजीव घई यांनी प्रेरणा घेतली आणि क्रिकेटचं उदाहरण दिलं. अॅशेस मालिकेत जोडीने इंग्लंडच्या फलंदाजांची शिकार करणाऱ्या लिली थॉमसन या वेगवान गोलंदाजांच्या जोडीप्रमाणे भारतीय सैन्यदलाने पाकच्या दहशतवाद्यांची आणि त्यांना आश्रय देणाऱ्या ठिकाणांची अचूक शिकार केली हे जगाला सांगितलं.
पाकिस्तानचा बुरखा फाटला
कांगावेखोर आणि विश्वासघातकी पाकिस्तानचा बुरखा भारतीय सैन्यदलाने पुन्हा एकदा फाडला. पाकिस्तानचे सगळे खोटे दावे एक एक करत पुराव्यासह उधळून लावले. भारताची हवाई सुरक्षा यंत्रणा अभेद्य आहे आणि पाकिस्तान ती भेदू शकला नाही, हे सांगतानाच आपल्या वायुसेनेचा भीम पराक्रमही सांगितला. तुर्कीच्या ड्रोनपासून ते चीनी क्षेपणास्त्राच्या अवशेषांची आठवण करुन दिली.
आमची लढाई पाकिस्तानी सैन्यासोबत नाही तर त्यांनी पोसलेल्या दहशतवाद्यांसोबत आहे यावर भारताने पुन्हा एकदा भर दिला. पण दहशतवाद्यांच्या मदतीला पाक सेना आली तर 'तक्षकाय इंद्राय स्वाहा' म्हणजे दहशतवाद्यांसोबत पाकिस्तानच्या सैन्याचीही आहुती पडेल हे सांगायला आपले अधिकारी विसरले नाहीत.
























