BLOG : बदलत्या काळात कलेचे नवे 'रंगमंच'

BLOG : काळ बदलला असं सरार्ससपणे बोललं जातं. पण काळ बदलला म्हणजे काय झालं? तर याचं नेमकं उत्तर संदर्भातल्या विषयानुसार तसं तसं दिलं जातं. पण जर कलेबाबत बोलायचं झालं तर १९२० सालचा नाट्यमन्वतराचा काळ आठवत असेलच. ज्याचं वर्णन कुसुमाग्रजांनी असं केलं होतं की, मराठी संगीत रंगभूमीच्या उद्धवस्त धर्मशाळेत संध्याकाळचा दिवा लावायला ही कुणी नाही अशी परिस्थिती झालेली होती, अशा काळामध्ये त्यावेळच्या समाजाला आवडेल, रुचतील अशी नाटकं आली आणि एक नाट्यमन्वतर घडलं.
फार इतिहासात जात नाही. मात्र काळानुसार कला नाही तर सादरीकरणात बदल झाले आणि आपण समाज म्हणूनही ते स्वीकारतही गेलो. काळाच्या हातात हात घालून 'कला' चालते याची प्रचिती दरवेळी अधोरेखित होते. कोणी कितीही म्हणू दे पण, बदल ही काळाची आणि कलेची गरज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
उदाहरण जर द्यायचं झालं रेडिओ, दूरदर्शन, मोबाईलमध्ये जसे बदल झाले, होत आहेत त्याचप्रमाणे भजन, कीर्तन, गाण्याच्या, कवितांच्या, नाटकाच्या, लोककलेच्या सादरीकरणाला जुन्यासोबत नवा साजही चढला. जेव्हा नवीन पिढीकडे वारसा सुपूर्द केला जातो असं सांगितलं जातं, पण प्रत्यक्षात तो खरंच दिला जातो का? तर अगदी कागदोपत्री ती काही रिटारमेंट वगैरे नसते, तर कलाकार त्याच्यातली कला नव्यानं सादर करतो आणि त्यात समरसून जातो.
पूर्वी कलेच्या सादरीकरणासाठी नाट्यगृहे, जत्रा, कीर्तनमंच, लोकनाट्यांची रंगमंचे हीच प्रमुख माध्यमे होती. आज त्यांची जागा पूर्णपणे बदलली नसली तरी त्यासोबत डिजिटल मंचांची भर पडली आहे. त्यामुळे कलेचा विस्तार अधिक व्यापक झाला आहे.
गेल्या काही काळात फेसबूक, इन्स्टाग्राम जी सध्या लोकप्रिय समाज माध्यमं म्हणून ओळखली जातात, त्यावर आपण रिल्स व्हीडिओ पाहतो. त्यावर लोककला सादर करणारं फोक अख्यान, लोक आख्यान याची चर्चा, व्हीडिओज् आपण मोठ्याप्रमाणात पाहिले असतील, काही जणांनी तो कार्यक्रम प्रत्यक्षही अनुभवला आहे. यातील कलाकारांनी जी वाद्य, जी पद्ये आपली ठेवीतली होती पण मागे पडत होती, काही ठराविक भागातच सादर केली जात होती, ती शिकून घेऊन, सादर करायला सुरुवात केली आणि लोककलेला नवीसंजीवनी मिळाली अशी प्रतिक्रिया समाजातून लोकांनी द्यायला सुरुवात केली.
अगदी याचप्रमाणे ओपन माईक कार्यक्रम ज्यात तुम्ही केवळ तुम्हाला जी कला येते ती सादर करावी मग त्यात काहीही असो, कथा, कविता, गीत, नृत्य, नाट्य असा एक बुकेच असतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इतकंच नव्हे तर पार्कातल्या कविता, छोट्या छोट्या संहिता लिहून त्याची नाट्यछटा किंवा चित्रकथा म्हणजेच रील्स तयार करणं असेल त्यातून काय नेमका संदेश पोहोचवायचा असतो तो पोहोचवला जातो. अशी कित्येक उदाहरणं देता येतील की असे कितीतरी प्रयोग कलेच्या प्रत्येक आयामात सुरु आहेत आणि निरंतर सुरु राहतील.
विद्यार्थी, तरुण, काही प्रमाणात ज्येष्ठ मंडळीसुद्धा याला पसंती देताना दिसून येते. नवनवीन मंच तयार होतात, त्यातून कलेचे विविध प्रकार सादरही केले जातात. कलेविषयी समाजात कालही सजगता होती, आजही आहे आणि उद्याही राहिल यात तीळमात्र शंका नाही. बदल आपण स्वीकारलेला असला असं जरी आपण म्हणत असलो तरी याच कलेच्या मंचावरून, कलेचा वापर करुन काही समाजकंटक नको त्या गोष्टीही करत असल्याची उदाहरणं आपण पाहिली आहेत. फार त्या खोलात जाण्याची गरज नाही, मात्र जे चिरंतन असतं ते टिकतं, यात लोकसहभाग, समाजाचा सहभाग असतोच, कारण समाज, कला आणि कलेतून संस्कृती टिकवणं हे कलाकाराचं कार्य आणि भान असायलाच हवं.
बदलत्या काळात कलेच्या सादरीकरणाला नवी व्यासपीठे मिळत आहेत आणि त्यातून कलाकारांना आपली कला अधिक व्यापकपणे समाजापर्यंत पोहोचवण्याची संधीही मिळत आहे. मात्र या नव्या मंचांचा स्वीकार करताना परंपरेची मुळं जपत कलेचा आशय आणि संस्कृतीची जाण जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कला ही केवळ मनोरंजनापुरती मर्यादित नसून समाजमन घडवण्याची आणि संस्कृती जपण्याची प्रभावी शक्ती आहे. म्हणूनच बदलत्या काळाशी सुसंगत राहून कलेला नवे आयाम देणं आणि त्याचवेळी तिची मूल्यं टिकवणं हीच खरी कलाकारांची जबाबदारी आहे.कारण कला ही केवळ मनोरंजनाचं साधन नसून समाजमन घडवण्याची प्रभावी शक्ती आहे. कारण कला टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृतीच्या आधारावर देशाची ऐक्यताही!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज






















