चुन-चुन कर मारेंगे! कोणालाही सोडणार नाही, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमित शाह आक्रमक, म्हणाले दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आक्रमक झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आक्रमक झाले आहेत. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना गृहमंत्री अमित शहा यांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सूत्रधारांना इशारा दिला आहे. भ्याड हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडणार नाही. चुन-चुन कर मारेंगे असा शब्दात अमित शाह यांनी हल्लाबोल केला.
दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरुच राहणार
कार्यक्रमाच्या सुरुवातीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, दिल्लीचे उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना, मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर बोलताना अमित शाह दहशतवादी हल्ल्याच्या मुद्यावरुन आक्रमक झाले. दहशतवाद संपेपर्यंत आमचा लढा सुरुच राहील आणि ज्यांनी हे कृत्य केले आहे त्यांना धडा शिकवणार असल्याचे अमित शाह म्हणाले.
कोणालाही सोडणार नाही : अमित शाह
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली, आम्ही प्रत्येक गोष्टीला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. जर कोणाला वाटत असेल की भ्याड हल्ला करून त्याने मोठा विजय मिळवला आहे, तर समजून घ्यावे की हे नरेंद्र मोदी सरकार आहे. आम्ही कोणालाही सोडणार नाही, असा इशारा अमित शाह यांनी दिला आहे. या देशाच्या प्रत्येक इंचावरुन दहशतवादाला मुळापासून उखडून टाकण्याचा आमचा संकल्प आहे आणि ते सिद्ध होईल असे अमित शाह म्हणाले.
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हालचालींना वेग आला आहे. भारतीय नौदलाची जहाजे दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























