भंडाऱ्यात हिट अँड रनची घटना, अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, तर कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रिलस्टारचा अपघाती मृत्यू
भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
Bhandara Accident News : भंडाऱ्यात "हिट अँड रन"ची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव अज्ञात वाहनाने भीषण धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला. या भीषण अपघातानंतर अपघातास कारणीभूत असलेला अज्ञात वाहनचालक पळून गेला आहे. हा अपघात भंडारा - साकोली या राष्ट्रीय महामार्गावरील धारगाव इथं पेट्रोलपंप समोर घडला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला
मिळालेल्या माहितीनुसार, कुंडलिक वालदे (63) आणि भिवा बोंदले (70) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे दोघेही भंडाऱ्याच्या धारगाव येथील रहिवाशी आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या एका बाजूनं ते फिरायला निघाले असताना हा अपघात घडला. याप्रकरणी कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
कल्याणमध्ये सुप्रसिद्ध रिलस्टार प्रेम भाटी यांचा अपघाती मृत्यू
कल्याणमध्ये एका दुर्दैवी अपघाताची घटना घडली आहे. सुप्रसिद्ध रिलस्टर, प्रेम भाटी यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मोहने परिसरात घरी जात असताना हा अपघात घडला. रस्त्यावर पडलेल्या खडीमुळे त्यांची गाडी घसरली आणि ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोप रिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी केला आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताबाबत अधिक तपास सुरू आहे.
धुळे जिल्ह्यात देखील भीषण अपघाताची घटना, तीन जणांचा मृत्यू
धुळे जिल्ह्यात देखील भीषण अपघाताची घटना घडली आहे. धुळे शहरा जवळील पारोळा रोडवरील नक्षत्र लॉन्स परिसरात भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्स ने तीन जणांना उडवल्याची घटना घडली आहे. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या अपघातात वरखेडी येथील तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी आझाद नगर पोलीस ठाण्यात ट्रॅव्हल्स चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरखेडी गावातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. मात्र हा अपघात नेमका कसा झाला? हे अद्याप समजू शकलेलं नाही. या अपघातात वरखेडे येथील सुभाष धनगर, नंदू पाटील, सिंधुबाई पाटील यांचे निधन झालं आहे.
Before You Go
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार





















