Karuna Sharma: शरद पवारांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलावले होते, पण अजितदादांनी... करूणा शर्मा मुंडेंचा गौप्यस्फोट
Karuna Sharma On Dhananjay Munde : करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण आणि हत्या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडायला सुरूवात केली. तेव्हापासून ते आत्तापर्यंत अंजली दमानिया यांनी मुंडेंना लक्ष केलं आहे, अशातच आज सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारी कार्यप्रणालीवरुन धनजंय मुंडे आणि त्यांच्या खात्यावर आरोप केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव पास न होताच मुंडेंनी टेंडर काढले असा आरोप दमानियांनी केला आहे, यानंतर आता करूणा शर्मा यांनी देखील धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर अजित पवार मुंडेंना वाचवत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.
एबीपी माझाशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले आहेत. करूणा शर्मा बोलताना म्हणाल्या मस्साजोग प्रकरणी ज्याप्रकारे सुप्रिया सुळे यांनी लक्ष दिलं आहे. त्याच प्रकारे त्यांनी मला कलेक्टर कार्यालयात वाल्मिक कराड याने कलेक्टर समोर आणि मंत्री धनंजय मुंडे समोर मारहाण केली, त्याचे सीसीटीव्ही उपलब्ध करून द्यावेत अशी विनंती केली आहे. यासोबतच मुंडेंनी ज्या लोकांच्या जमिनी कब्जा केल्या आहेत, त्या सोडवून देण्यासाठी मदत करावी याबाबत चर्चा केली आहे.
अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही...
धनंजय मुंडेंनी खूप भ्रष्टाचार केला आहे. अंजली दमानिया सगळी प्रकरण हळूहळू बाहेर काढतील. परंतु अजित पवार सातत्याने त्यांना वाचवत आहे. लोकांच्या मतांचा गैरवापर करणं सध्या सरकारकडून सुरू आहे. पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. त्यानंतर लोकांनी पंकजा मुंडे यांना नाकारलं, परंतु तरी देखील आता त्या मंत्रिमंडळात आहेत. वाल्मिक कराडने मारहाण केली. आता तो जेलमध्ये सडतोय. आता धनंजय मुंडेंची देखील तीच अवस्था होणार आहे. यांनी आत्तापर्यंत 3 हजार वंजारी लोकांवर खोटे एफआयर यांनी केल्या आहेत, असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. अजित पवार यांच्यावर माझा विश्वास नाही कारण ते ऐकत नाही. अंजली दमानिया यांनी पुरावे दिले मात्र त्यांनी काही केलंच नाही, असंही त्या पुढे म्हणाल्यात.
शरद पवारांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलावलं...
धनंजय मुंडेंचा राजीनामा आधीच झाला असता, कारण शरद पवारांनी मला 4 ते 5 वेळा फोन करून बोलवलं होतं. परंतु अजित पवारांनी काही तरी केलं आणि शरद पवार साहेबांनी मला वेळ दिला नाही, असा मोठा गौप्यस्फोट देखील करूणा शर्मा यांनी केला आहे. याआधी करूणा शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील धनंजय मुंडे यांना वाचवत असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता अजित पवार देखील मुंडेंना वाचवत असल्याचा दावा केला आहे.























