Agriculture News : दुसऱ्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील कापूस आणि तुरीचेही सर्वेक्षण होणार, शेतकऱ्यांना मिळणार अग्रीम पीकविमा
पहिल्या टप्प्यात सोयाबीन मूग आणि उडीद पिकाचा सर्वेक्षण केलं जाणार आहे. या तिन्ही पिकांचा एकत्रित सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस तुरीचेही सर्वेक्षण होणार आहे.

Agriculture News : बीड (Beed) जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापासून पावसानं दडी मारली आहे. त्यामुळं शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यातच शेतकऱ्यांना (Farmers) मदत म्हणून सरकारनं अग्रीम पीक विम्याची घोषणा केली आहे. पहिल्या टप्प्यात सोयाबीन, मूग आणि उडीद पिकाचा सर्वेक्षण केलं जाणार आहे. या तिन्ही पिकांचा एकत्रित सर्व्हे झाल्यानंतर शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कापूस तुरीचेही सर्वेक्षण होणार असून शेतकऱ्यांना अग्रीम पीकविमा मिळणार आहे.
बीड जिल्हा प्रशासनाने कृषीमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिलेल्या सुचनेचे तंतोतंत पालन केले आहे. जिल्ह्यातील एकूण 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा (Pik Vima) मंजूर करण्यात आला आहे. याबाबत पीकविमा कंपनीनं तातडीनं अग्रीम पीकविमा वितरीत करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची अधिसूचना काढली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळणार आहे. पहिल्या चार दिवसात प्राप्त सर्व्हे अहवालानुसार सोयाबीनच्या 52, मुगाच्या 22 तर उडीदाच्या 13 मंडळांमध्ये अग्रीम विमा मंजूर करण्यात आला आहे.
बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश परिस्थिती
बीड जिल्ह्यातील विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत पावसात दीर्घकालीन खंड पडल्यामुळं शेतकरी संकटात आले आहेत. बीड जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यांमध्ये पावसाच्या खंडाने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा मिळवून देण्यासाठी सात दिवसांच्या आत महसूल, कृषी आणि पिक विमा कंपनीने एकत्रित सर्वे करुन अहवाल सादर करावा असे निर्देश कृषीमंत्र्यांनी दिले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे यांनी 87 महसुली मंडळांमध्ये सोयाबीन, उडीद आणि मूग या पिकांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले आहेत. या सर्व महसुली मंडळांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळं संभाव्य नुकसान हे सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा अधिक असल्यास निकषानुसार ही महसूल मंडळे अग्रीम पीक विम्यास पात्र ठरतात. त्या महसूल मंडळांमध्ये तातडीने अग्रीम पीक विमा देण्यात येतो, अशा पद्धतीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.
50 टक्केच्या निकषात बसणारी सर्व मंडळे पिक विम्यास पात्र
दरम्यान, उर्वरित मंडळांचे सर्व्हेक्षण अजूनही सुरु आहे. येत्या चार ते पाच दिवसात सोयाबीनचे सर्व 87 मंडळातील सर्व्हे पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानुसार 50 टक्केच्या निकषात बसणारी सर्व मंडळे सोयाबीन अग्रीम पिकवीम्यास पात्र ठरणार आहेत. तसेच सोयाबीनचे सर्व्हेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात कापूस आणि तूर या दोन पिकांचे सर्व्हे हाती घेण्यात येणार आहेत. ते सर्व्हे पूर्ण झाल्यानंतर 50 टक्के नुकसानीच्या निकषानुसार त्या पिकांनाही अग्रीम पिकविमा लागू होईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको
तेलगाव महसूल मंडळामध्ये पावसाचे प्रमाण कमी पासून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे तरीदेखील शासनाने जाहीर केलेल्या अग्रीम पीक विम्यातून या महसूल मंडळातील 13 गाव वगळण्यात आले आहेत. त्यामुळं तेलगाव महसूल मंडळाला सरसकट आगरीम पीक विमा जाहीर करण्यात यावा यासाठी या शेतकऱ्यांनी हे रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनामध्ये अनेक गावातील शेतकरी सहभागी झाले आहेत. त्यामुळं परळीहून बीडकडे जाणारी वाहतूक आणि माजलगावहून धारुरकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे खोळंबली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Agriculture news : बीड जिल्ह्यातील 87 मंडळात 25 टक्के अग्रीम पीकविमा मंजूर, कृषीमंत्री मुंडेंच्या सुचनेचे प्रशासनाकडून पालन; शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके






















