Beed Bribe News : जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं भोवलं, बीडमधील सरपंच एसीबीच्या जाळ्यात
Beed Bribe News : बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला जलसिंचन विहिरीच्या प्रस्तावासाठी लाच घेणं चांगलंच भोवलं आहे.

Beed Bribe News : बीडच्या (Beed) माजलगाव (Majalgaon) तालुक्यातील किट्टी आडगावच्या सरपंचाला (Sarpanch) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलसंचन विहिरीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यासाठी पैसे घेणे महागात पडलेय. सरपंच रुक्मानंद खेत्रे याने तक्रारदाराच्या आईच्या नावाने मंजूर झालेली विहीर अंतिम यादीत समाविष्ट करण्यासाठी आणि विहिरीच्या प्रस्ताव मंजूर करण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. 20 हजारांपैकी पहिला हप्ता म्हणून दहा हजार रुपयांची लाच (Bribe) घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे याला एसीबीने (ACB) रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील एका शेतकऱ्याने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत सरकारी अनुदानावर विहीर मिळावी, अशी मागणी आपल्या आईच्या नावे केली होती. यासाठी प्रयत्न करत असताना, गावचे सरपंच रुख्मानंद खेत्रे यांनी "तुला विहीर मंजूर करून देतो" असे सांगून, गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी आणि मंजुरीसाठी संबंधित इंजिनिअर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये, म्हणजे एकूण 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
सरपंचाला पैसे घेणे पडले महागात
या प्रकरणाची तक्रार शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) केली. त्यानंतर पडताळणी करून शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानननगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचण्यात आला. या वेळी 20 हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10 हजार रुपयांची लाच घेताना सरपंच रुख्मानंद खेत्रे यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बीडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली आहे.
व्याजाच्या पैशातून तरुणाचे अपहरण
दरम्यान, बीडच्या धारूरमध्ये उसने घेतलेल्या दहा हजार रुपयांचे व्याजासह 80 हजार रुपये झाल्याने ते वसूल करण्यासाठी एका तरुणाचे चौघा जणांनी अपहरण केले होते. अपहार केलेल्या मुलाच्या घरी फोन करत मुलगा जिवंत पाहिजे असेल तर आताच्या आता पन्नास हजार रुपये टाका, नाहीतर तो तुम्हाला दिसणार नाही, अशी धमकी देखील दिली. या प्रकरणात धारूर पोलिसांनी अंबाजोगाई जवळील साकुर येथून दोघांना अटक केली आहे. तर दोन जण फरार आहेत. कृष्णा मैंद असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृष्णा मैंद याने धनराज चाटे, पृथ्वीराज राग व परमेश्वर आगाव यांच्याकडून पैसे उसने घेतले होते. त्याचे व्याज न दिल्याचे कारण सांगत या तिघांसह अन्य एकाने कृष्णाचे अपहरण केले होते.
आणखी वाचा
बीड जिल्ह्यात भीषण अपघात; भरधाव वेगातील कारच्या धडकेत युवक ठार, 2 जखमी























