Beed : बीडमध्ये पुन्हा क्षीरसागर विरुद्ध पंडित संघर्ष; विकासकामांच्या बैठकीवरून दोन्ही आमदार आमनेसामने
Sandeep Kshirsagar Vs Vijaysinh Pandit : बीड आणि गेवराई मतदारसंघातील विकासकामांच्या बैठकीवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि आमदार विजयसिंह पंडित यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे.

बीड : जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून गेवराईचे राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित आणि बीडचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे. विकासकामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीवरून दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा ‘क्षीरसागर विरुद्ध पंडित’ असा संघर्ष चर्चेचा विषय ठरला आहे.
गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड आणि गेवराईमधील 11 विकासकामांबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. या बैठकीला बीड मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी तीव्र आक्षेप घेतला. बीड मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.
Sandip Kshirsagar Statement : ‘बीड माझा मतदारसंघ आहे, हस्तक्षेप सहन करणार नाही’
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, “बीड मतदारसंघ हा माझा आहे. दोन वेळा जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली माझ्या मतदारसंघातील योजना दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न झाला तर मी त्याला विरोध करणारच."
ते पुढे म्हणाले, “संघर्षाची मला सवय आहे. संघर्ष नसेल तर काम करण्यात मजा येत नाही. बीडच्या विकासाशी तडजोड होऊ देणार नाही. गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
Vijaysinh Pandit Reply : ‘बीडकरांचे माझ्यावर प्रेम, त्याचा त्रास का होतो?’
संदीप क्षीरसागर यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार विजयसिंह पंडित म्हणाले, “मी जिल्हाधिकाऱ्यांसोबत घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. त्याचबरोबर बीड नगर परिषदेच्या काही प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. माझं बीडवर प्रेम उतू जाण्यापूर्वी बीडकरांचे माझ्यावर प्रेम उतू गेले आहे. बीडकरांनी मला कौल दिला आहे. मग त्या प्रेमाचा काहींना त्रास का होतो?”
NCP Politics in Beed : राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी शाब्दिक युद्ध
या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा उघड झाले आहेत. स्थानिक राजकारणात त्यांच्यातील संघर्ष सातत्याने चर्चेत असतो. विकासकामांच्या मुद्द्यावरून आता हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Beed Development Projects : 165 कोटींच्या योजनेवरही पंडितांचा सवाल
विजयसिंह पंडित यांनी संदीप क्षीरसागर यांच्या कुटुंबावरही अप्रत्यक्ष टीका केली. “तुमचे कुटुंब गेली तीन दशके नगरपालिकेत सत्तेत होते. मग 165 कोटी रुपयांच्या योजनेचे काय झाले?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Beed Political Conflict : बीडच्या राजकारणात नव्या संघर्षाची सुरुवात
विजयसिंह पंडित यांचा बीड मतदारसंघातील वाढता हस्तक्षेप आणि त्यावर संदीप क्षीरसागर यांची तीव्र प्रतिक्रिया यामुळे बीडच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात झाली आहे. आगामी स्थानिक आणि विधानसभा राजकारणात या संघर्षाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
ही बातमी वाचा:





















