एक्स्प्लोर
राजकारणात उतरलेल्या अभिनेत्रींचं अपमानास्पद चित्रण, अभिनेत्री स्पृहा जोशीचा संताप
'प्रचार करताना इतकी घाणेरडी पातळी का गाठावी लागते? कुठलाही प्रचार सेन्सिबल मुद्द्यांना धरून होऊच शकत नाही?? सभ्यतेची किमान पातळी धरून होऊ शकत नाही?' असे सवाल अभिनेत्री स्पृहा जोशीने उपस्थित केले आहेत.

मुंबई : कलाकारांना लोकसभा निवडणुकांची उमेदवारी मिळणं नवीन नाही. मात्र निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या अभिनेत्रींचं चित्रण ज्याप्रकारे केलं जातं, त्यावरुन युवा अभिनेत्री स्पृहा जोशीने नाराजी व्यक्त केली आहे. स्पृहाने फेसबुक पोस्ट लिहून आपली खदखद बोलून दाखवली आहे. 'यंदाही उर्मिला मातोंडकर काँगेसकडून रिंगणात उतरल्याची बातमी तुम्ही ऐकली असेलच. बंगालमधून तृणमूल काँग्रेस कडून मिमी चक्रवर्ती, नुस्रत जहाँ या अभिनेत्री आहेत ज्या ट्विटरपासून ते चहाच्या टपरीपर्यंत सगळीकडे ट्रेंडिंग आहेत. चर्चेचा विषय झाल्यात. गंमत अशी की या अभिनेत्रींसाठी राजकारणातली एंट्री तशी कसरतच असते म्हणजे अर्थातच 'अभिनेत्री' म्हणून असलेली लोकप्रियता हा त्यांच्या आणि त्यांच्या पार्टीसाठी 'कॅश' करण्याचा विषय असतोच. पण आपल्या सेक्सिस्ट समाजामध्ये - माफ करा पण धडधडीतपणे हाच शब्द वापरणं मला भाग आहे - तर या सेक्सिस्ट समाजामध्ये त्यांचं 'अभिनेत्री' असणं हे कित्येकदा अपमानकारक पद्धतीने दर्शवलं जातं.' असं स्पृहाने म्हटलं आहे. VIDEO | अभिनेत्री-कवयित्री स्पृहा जोशीसोबत खास गप्पा | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा 'सध्या बंगालमध्ये मिमी आणि नुसरतच्या सो कॉल्ड 'रिव्हिलिंग' कपड्यांवरून त्यांना ट्रोल करणारे 'मीम्स' सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एका ज्येष्ठ अभिनेत्रीबद्दल समाजवादी पक्षाच्या एका नेत्यानं म्हटलं. - "त्या आपल्या 'घुंगरू' आणि 'ठुमक्यांनी' लोकांना तल्लीन करून टाकतील आणि त्यांच्या रात्री 'रंगीन' करून टाकतील!" किती भयानक वाटतं हे सगळं' असं लिहित स्पृहाने संताप व्यक्त केला आहे. 'फक्त अभिनेत्रींच्याच वाट्याला हे shaming का? अभिनय करून मग राजकारणात उतरणाऱ्या अभिनेत्यांना / हिरोंना का नाही या सगळ्याला तोंड द्यावं लागत ? गोविंदा, शत्रुघ्न सिन्हा... कितीतरी जण उतरलेत की राजकारणात. मग फक्त स्त्री कलाकारांच्या बाबतीत अशी सोयीस्कर घाणेरडी वृत्ती कशी उभारून येते आपल्याकडे ? याची पाळंमुळं फार खोल रुजली आहेत. बाईला नुसती वस्तू मानण्याच्या आपल्या किडक्या मनोवृत्तीत.' असं निरीक्षणही स्पृहाने नोंदवलं आहे. VIDEO | उर्मिला मातोंडकर विरोधात तक्रार, हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप | मुंबई | एबीपी माझा 'प्रचार करताना इतकी घाणेरडी पातळी का गाठावी लागते? कुठलाही प्रचार सेन्सिबल मुद्द्यांना धरून होऊच शकत नाही?? सभ्यतेची किमान पातळी धरून होऊ शकत नाही?' असे सवालही स्पृहाने उपस्थित केले आहेत. स्पृहा जोशीची फेसबुक पोस्ट :
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन
टेलिव्हिजन

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















