Riteish Deshmukh On Marathi Film Industry: 'महाराष्ट्रातच मराठीला दुसरं स्थान...'; रितेश देशमुखनं बोलून दाखवली खंत, विलासरावांची इच्छा सांगताना म्हणाला...
Riteish Deshmukh On Marathi Film Industry: मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना, असंही रितेश देशमुख म्हणाला.

Riteish Deshmukh On Marathi Film Industry: सिनेसृष्टीत आपल्या अभिनयानं अनेक कलाकारांनी छाप सोडलीय, त्यानंतर अभिनयाच्या जोडीला अनेकांनी दिग्दर्शन आणि निर्मितीचा मार्ग अवलंबलाय. त्यापैकी एक नाव म्हणजे, महाराष्ट्राचा भाऊ रितेश विलासराव देशमुख (Riteish Vilasrao Deshmukh). बॉलिवूडमध्ये (Bollywood News) आपल्या नावा ठसा उमटवणारं मराठमोळं नाव. वडील कुशल राजकारणी आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असूनही रितेश देशमुखनं (Riteish Deshmukh) आपला वेगळा मार्ग निवडला आणि सिनेसृष्टीत पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला बॉलिवूड आणि नंतर मराठी सिनेसृष्टीतही (Marathi Film Industry) रितेश देशमुख काम करतोय. अभिनय, दिग्दर्शन, निर्माता आणि आता 'बिग बॉस मराठी' सारख्या महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेल्या गाजलेल्या रिअॅलिटीशोचं सुत्रसंचालन यांसारख्या जबाबदाऱ्या रितेशनं अगदी दमदाररित्या हाताळल्या आहेत. रितेशनं मराठी सिनेसृष्टीसाठीही खूप कामं केली आहेत. जेवढा तो आपल्या दमदार भूमिका आणि अभिनयासाठी ओळखला जातो, तेवढाच तो आपल्या स्पष्ट आणि परखड मतांसाठीही ओळखला जातो. नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना रितेशनं महाराष्ट्रातच मराठी सिनेमांकडे (Marathi Movies) पाठ फिरवली जात असल्याची खंत बोलून दाखवली.
मुंबईत समाजवादी पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'व्हिजन इंडिया' या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख उपस्थित राहिलेला. याच कार्यक्रमात बोलताना रितेशनं मराठी सिनेसृष्टी आणि बॉलिवूड यामध्ये होणाऱ्या तुलनेवर स्पष्ट भाष्य केलं. तसेच, एका मराठी माणसानं महाराष्ट्रातच सिनेसृष्टीची सुरुवात करूनदेखील मराठी सिनेमा मागे आणि हिंदी सिनेमा पुढे का आहे? यावरही रितेश देशमुखनं आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख नेमकं काय म्हणाला?
अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की,"सिनेसृष्टीचा जन्म महाराष्ट्रात, आपल्या मुंबईत झाला आणि एका मराठी माणसानं, म्हणजेच दादासाहेब फाळके यांनी 100 वर्षांपूर्वी त्याची सुरुवात केली. मला कोणताही वाद निर्माण करायचा नाही, पण महाराष्ट्रात मराठी सिनेमाकडे दुर्लक्ष होतय... देशाच्या विविध भागांतून लोक इथे आले आणि त्यांनी हा प्रवास आपलासा केला, म्हणूनच मुंबई हे चित्रपटसृष्टीचे मुख्य केंद्र बनलं".
रितेश म्हणाला की, कर्नाटक किंवा केरळमध्ये तिथल्या स्थानिक चित्रपटांना पहिलं प्राधान्य दिलं जातं. महाराष्ट्रात 10 ते 11 कोटी लोक मराठी बोलतात, ही संख्या काही दाक्षिणात्य राज्यांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. तरीही तिथे प्रादेशिक सिनेमा जसा जोमानं व्यवसाय करतो, तसा तो महाराष्ट्रात करत नाही. आपल्याकडे प्रेक्षकांची पहिली पसंती हिंदी असते, गेल्या काही वर्षापासून तर ती अधिकच होत चालली आहे."
"मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना..."
पुढे बोलताना रितेशनं मराठी सिनेमा मागे पडण्याचं कारणंही सांगितलं, तो म्हणाला की, मराठी सिनेमे मागे पडण्याचं खरं कारण हिंदी आणि मराठी सिनेमामधील आर्थिक तुलना. मराठी सिनेमे 3 ते 7 कोटींमध्ये बनवले जातात. पण हिंदी सिनेमा करायचा म्हटलं तर, त्यासाठी 100 कोटी रुपये लागतात. त्यामुळे सहाजिकच एकाच दरात भव्य हिंदी सिनेमा पाहण्याचा पर्यात उपलब्ध असल्यानं प्रेक्षक तिकडे वळतात..."
रितेश देशमुखनं कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि त्याचे वडील विलासराव देशमुखांची एक इच्छाही बोलून दाखवली. रितेशनं सांगितलं की, "मी जेव्हा निर्मिती क्षेत्रात आलो, तेव्हा माझे वडील म्हणाले होते की, तू हिंदीत काम करतोस, पण मराठी सिनेमासाठी काय करतोयस? म्हणूनच माझ्या कंपनीनं सहा चित्रपट बनवले, ते सुद्धा सगळे मराठीत... आपल्या प्रदेशातील कथा आपल्याच लोकांसाठी मोठ्या पडद्यावर मांडणे ही आपली जबाबदारी आहे..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















