राजपाल यादव यांना यापूर्वीही दोनदा झालेला तुरुंगवास; कोट्यवधींची मालमत्ता जप्त, एका चित्रपटामुळे कर्जाचा फास आवळला
पण या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित केलं जातोय की, राजपाल स्वतःची मालमत्ता विकून हा वाद मिटवू शकत नाहीत का?

Rajpal Yadav: सध्या बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव (Rajpal Yadav) तिहार कारागृहात असून त्यांच्या अडचणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत. आर्थिक संकटामुळे ते अडचणीत सापडले असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अभिनेत्यानं तिहार तुरुंगात जाऊन सरेंडर केलं आहे. परिस्थितीपुढे हतबल झालेल्या राजपाल यादवनं आपल्याकडे पैसेच नसल्याचं मान्य केलेलं. तसेच, मी काय करावं? माझ्याकडे पैसेच नाहीत... मला दुसरा कोणताही उपाय दिसत नाही..., असंही म्हटलेलं. त्यांच्या मदतीसाठी अभिनेता सोनू सूद पुढे आला.अनेक कलाकारांनी त्चायाला आर्थिक मदतही ऑफर केल्याचं समोर आलं. पण या सगळ्यात एक प्रश्न उपस्थित केलं जातोय की, राजपाल स्वतःची मालमत्ता विकून हा वाद मिटवू शकत नाहीत का?
तर झालं असं होतं की, ‘अता-पता लापता’ हा चित्रपट तयार करण्यासाठी राजपाल यादव यांनी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्याकडून प्रत्येकी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र चित्रपट फ्लॉप ठरल्याने ते कर्ज फेडू शकले नाहीत. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना तुरुंगवास भोगावा लागला.
मालमत्तेचं काय झालं?
या प्रकरणात 2018 मध्ये त्यांना तीन महिन्यांचा तुरुंगवास झाला होता. त्यानंतर 2024 मध्ये बँकेने त्यांच्या शाहजहांपूर येथील कोट्यवधींच्या मालमत्तेवर जप्ती आणली गेली. जवळच्या सूत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, 2005 मध्ये राजपाल यांनी आपल्या आई-वडिलांच्या नावावर ‘नवरंग गोदावरी एंटरटेनमेंट लिमिटेड’ ही प्रॉडक्शन कंपनी स्थापन केली होती आणि मुंबईतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स शाखेतून 5 कोटींचे कर्ज घेतले होते. लिलावाच्या वेळी त्यांच्यावर सुमारे 11 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या मते, बँक अधिकाऱ्यांनी इमारत घाईघाईत सील केली होती.
रंगभूमीपासून बॉलिवूडपर्यंतचा प्रवास
राजपाल यादव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांत काम केले आहे. शिक्षणानंतर त्यांनी शाहजहांपूर येथे रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. 1987 ते 1992 या काळात त्यांनी थिएटरमध्ये काम करून अभिनयाची धार वाढवली. पुढे त्यांनी लखनऊ येथील भारतेंदू नाट्य अकादमी आणि दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिक्षण घेतले.
1999 मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘गरम मसाला’, ‘भागम भाग’, ‘भूल भुलैया’, ‘फिर हेरा फेरी’, ‘चुप चुप के’, ‘पार्टनर’, ‘ढोल’, ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’, ‘कृष 3’, ‘वेलकम बैक’ आणि ‘भूल भुलैया 3’ यांसारख्या चित्रपटांत त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘भूत बंगला’ आणि ‘वेलकम 3’चा समावेश आहे.
























