"'मेलेला मराठा' विरुद्ध 'मारणारे वंजारी' अशी कळ ठरवून लावली जातेय..."; संतोष देशमुख प्रकरणी किरण मानेंची पोस्ट चर्चेत
Kiran Mane Post On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे हादरवणारे फोटो समोर आल्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांना आवाहन केलं आहे.

Kiran Mane Post On Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Sarpanch Santosh Deshmukh Case) प्रकरणानं महाराष्ट्र (Maharashtra News) हादरला. नुसता हादरला नाही , तर या हत्येच्या घटनेनं महाराष्ट्राचं समाजकारण, राजकारण ढवळून निघालं. याप्रकरणी आरोपपत्रही दाखल झालंय. आणि आता आरोपींच्या क्रौर्याचा सर्वात मोठा पुरावा एबीपी माझाच्या हाती लागलाय. संतोष देशमुखांची हत्या (Santosh Deshmukh Case) करतानाचे आरोपींचे फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहेत. माणसाच्या रुपातला हैवान कॅमेऱ्यानं कैद केला आहे. हे फोटो अतिशय भीषण आहेत. कोणत्याही सहृदय व्यक्तीला विचलित करतील असेच हे फोटो. हे फोटो पाहून हा आपलाच महाराष्ट्र आहे ना, असा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहणार नाही.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे हादरवणारे फोटो समोर आल्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट करत सर्वांना आवाहन केलं आहे. संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा 'जात' दूर ठेवा, असं आवाहन किरण मानेंनी केलं आहे. मिडीयामधून अचानक संतोषच्या मृत्यूचे व्हायरल झालेले फोटोज हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका, असंही किरण माने म्हणाले आहेत.
किरण माने काय म्हणाले?
किरण मानेंनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, "बहुजनांनो, संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा 'जात' दूर ठेवा. मिडीयामधून अचानक संतोषच्या मृत्यूचे व्हायरल झालेले फोटोज हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका. आपण जातीजातीत लढलो तर जुल्मी सत्तेचा फास आणखी आवळला जाईल ! कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी, सोलापूरकरी गिधाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फुट पाडण्याचा कट असू शकतो."
"एवढंच लक्षात ठेऊया की खून झालेला एक तुमच्या-माझ्यासारखा 'माणूस' होता… आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असणारे आहेत ! बास. वर्तमानात आपल्या भवताली याच दोन जाती आहेत. 'सामान्य माणूस विरूद्ध सत्तेतले नराधम'… याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे, हे मेंदूत कोरून घ्या.", असं किरण माने म्हणाले आहेत.
किरण माने म्हणाले आहेत की, "मेलेला मराठा' विरुद्ध 'मारणारे वंजारी' अशी कळ ठरवून लावली जात आहे… गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीचं ते कारस्थान आहे. एक सत्य समजून घ्या की, याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतला आहे! म्हणजेच, ते जातीच्या नाही, तर सत्तेच्या कैफात धुंद आहेत. या खुन्यांपासून ते कोरटकरांपर्यंत सगळे एका माळेतले मणी आहेत."

"…त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात बोलताना 'मराठा-वंजारी' अशा जातीवरून कमेंट करू नका. फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी हे निर्घृण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टारगेट करा.", असं आवाहनदेखील किरण मानेंनी केलं आहे.
"बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेलं ऐतिहासिक गांव आहे. त्याला हिणवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका. खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरालाल सुखलालजी कोटेचा होते! पानिपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमीत. याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी स्वखर्चानं मशीद बांधून दिली होती ! तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो.", असंही किरण माने म्हणाले आहेत.
किरण माने म्हणाले की, "अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लागणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता. पुढे रहावा असे वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा. संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे जगजाहीर आहे. त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या!"
महत्त्वाच्या इतर बातम्या :























