Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: 'आता बायोपिक अजित पवारांवरच...'; प्रवीण तरडेंचं ठरलंय, म्हणाले, 'अनेकांनी कोरे चेक दिले पण...'
Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: प्रवीण तरडे यांनी आनंद दिघेंवर 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर 2' केल्यानंतर अजितदादांवर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे.

Pravin Tarde On Ajit Pawar Biopic: मराठी सिनेसृष्टीत (Marathi Film Industry) काही सिनेमे (Marathi Movies) असे आले, ज्यांनी मराठी इंडस्ट्रीला एका नव्या वळणावर नेऊन उभं केलं. त्यापैकी काही मोजक्या सिनेमांची नावं घ्यायची झाली तर, त्यापैकी 'देऊळ बंद' (Deool Band), 'मुळशी पॅटर्न' (Mulshi Pattern), 'धर्मवीर' (Dharmaveer), 'धर्मवीर 2' (Dharmaveer 2) या सिनेमांची आणि हे सिनेमे पडद्यावर साकारणाऱ्या अभिनेता, दिग्दर्शक, लेखक आणि निर्माता अशा विविध भूमिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांचं नाव घ्यावं लागेल. प्रवीण तरडे यांनी आपले वेगळ्या ढाटणीचे सिनेमे साकारुन सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलीय. ग्रामीण ढंगातील कथा, दमदार संवाद आणि वास्तववादी मांडणी ही त्यांच्या सिनेमांची ओळख. आता काही दिवसांतच त्यांचा 'देऊळ बंद 2' (Deool Band 2) सिनेमा येतोय, याच निमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत 'धर्मवीर'नंतर जर बायोपिक करायचा झालाच, तर दिवंगत राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यावरच करेन, असा मानस दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी बोलून दाखवला आहे.
महाराष्ट्र टाईम्सच्या 'मटा कट्टा'वर बोलताना प्रवीण तरडे यांनी आनंद दिघेंवर 'धर्मवीर' आणि 'धर्मवीर 2' केल्यानंतर अजितदादांवर बायोपिक करण्याची इच्छा प्रवीण तरडे यांनी व्यक्त केली आहे. 'धर्मवीर' हिट झाल्यानंतर प्रवीण तरडेंना अनेक नेत्यांनी, राजकारण्यानी बायोपिक करण्यासाठी विचारणा केलेली, पण त्यांनी सर्वांच्या ऑफर परत पाठवल्यात, असंही सांगितलं.
प्रवीण तरडे नेमकं काय म्हणाले? (Pravin Tarde On Ajit Pawar)
'देऊळ बंद 2'चे दिग्दर्शक प्रवीण तरडे म्हणाले की, "मुळशी पॅटर्न'नंतर माझ्याकडे अनेक ऑफर आल्या. अनेकांना असं वाटायचं की, आता आपल्याकडे पैसा आहे, नाव आहे, त्यामुळे कुणावरही सिनेमा करायला मी तयार होईन... पण मी खूप ऑफर परत पाठवल्यात... 'आमच्यावर सिनेमा करा', 'आमच्या नेत्याची कथा सांगा', अशा कितीतरी मागण्या आल्या. अनेक पुढाऱ्यांनी कोऱ्या चेकपासून ते अफाट बजेटपर्यंतच्या ऑफर दिल्या, पण मी प्रत्येक वेळी स्वतःला एकच प्रश्न विचारला, 'मी हे मनापासून करू शकतो का?"
"आनंद दिघेसाहेबांवर सिनेमा केल्यानंतर मला वाटलेलं की, आता यापुढे कुणावर चरित्रपट करायचा नाही. कारण, तो विषय माझ्यासाठी केवळ सिनेमा नव्हता, ती एक भावनिक जबाबदारी होती... त्यामुळे त्यानंतर कुणावरही तसंच काम करणं सोपं नव्हतं... पण, जर कधी मला पुन्हा एखादी बायोपिक करावीशी वाटलीच, तर ती अजितदादांवर असेल... कारण, अजितदादांना मी जवळून पाहिलंय. त्यांची काम करण्याची पद्धत अनुभवलीय...", असं प्रवीण तरडे म्हणालेत.
पुढे बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, "सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात करणारा मंत्री मी दादांच्या रूपात पाहिलाय. मंत्रालयाच्या पायऱ्यांनाही कदाचित त्यांच्या पावलांची सवय झाली असेल. आजही त्या पायऱ्या म्हणत असतील की, सकाळी सकाळी धावत येणारी ती पावलं कुठे गेली? इतकी कामाशी नाळ जोडलेली माणसं फार कमी पाहायला मिळतात... त्यांच्या आयुष्यातला संघर्ष, वेग, दबाव आणि कामाचा ध्यास हा सिनेमाचा विषय होऊ शकतो, असं मला प्रामाणिकपणे वाटतं..."
प्रवीण तरडे यांच्याबाबत थोडंस...
प्रवीण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. प्रवीण तरडे यांनी अनेक गाजलेल्या मराठी सिनेमांचं लेखन आणि दिग्दर्शन केलंय. विशेषतः 'मुळशी पॅटर्न', 'धर्मवीर' आणि 'सरसेनापती हंबीरराव' यांसारख्या सिनेमांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांच्या सिनेमांमध्ये सामाजिक वास्तव, राजकीय घडामोडी आणि ग्रामीण जीवनाचं प्रभावी चित्रण पाहायला मिळतं. अभिनयातही त्यांनी आपल्या वेगळ्या शैलीची छाप सोडली आहे. खडतर, रांगड्या आणि प्रभावी व्यक्तिरेखा साकारण्यात त्यांचा हातखंडा मानला जातो. मराठी सिनेसृष्टीत आशयप्रधान आणि मोठ्या कॅनव्हासवरील सिनेमांना नवी दिशा देणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये प्रवीण तरडे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















