'अशा लहानसहान गोष्टी होतच असतात..' दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीची ए. आर. रहमान यांच्या सांप्रदायिक वक्तव्यावर प्रतिक्रिया. स्पष्टच म्हणाल्या..
या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून काहींनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यावर आक्षेप नोंदवला.

AR Rehman: संगीतकार ए. आर. रहमान यांनी बॉलीवूडमधील कथित सांप्रदायिक भेदभावाबाबत केलेल्या वक्तव्यावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. त्यांच्या या विधानानंतर मनोरंजन अनेक प्रतिक्रिया उमटत असताना आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कामामध्ये चढ-उतार येतच असतात, यात काही वेगळं नाही, असं त्या म्हणाल्या आहेत. ए. आर. रहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मागील काही वर्षांपासून आपल्याला काम कमी मिळत असल्याचं सांगितलं होतं. यामागे इंडस्ट्रीतील ‘सांप्रदायिक पूर्वग्रह’ कारणीभूत असू शकतो, असा सूचक उल्लेख त्यांनी केला होता. या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला असून काहींनी त्याला पाठिंबा दिला, तर काहींनी त्यावर आक्षेप नोंदवला. या पार्श्वभूमीवर वहीदा रहमान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाल्या वहीदा रहमान?
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यावर विचारलं असता वहीदा रहमान म्हणाल्या, “हो, मी याबद्दल वाचलं आहे. पण मला या विषयाच्या खोलात जायचं नाही. सगळं ठीक चालू असताना अशा गोष्टींवर जास्त लक्ष देणं मला गरजेचं वाटत नाही. प्रत्येक देशात अशा लहानसहान गोष्टी होतच असतात.”
त्या पुढे म्हणाल्या, “कुणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. हे खरं आहे की नाही, यामध्ये आपण का गुंतायचं? किमान माझ्या या वयात मला कोणत्याही वादात पडायचं नाही. शांततेत रहा. हा आपला देश आहे. आनंदी रहा. मी एवढंच सांगू शकते.”
‘कामात चढ-उतार असतात’
वहीदा रहमान यांनी यावेळी कामाबाबतही मत व्यक्त केलं. “कदाचित रहमान यांना अपेक्षेइतकं काम मिळत नसेल, म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं असेल. कामात चढ-उतार येतच असतात. एका विशिष्ट वयानंतर लोक नव्या किंवा वेगळ्या लोकांना संधी देण्याचा विचार करतात. काही जण या प्रक्रियेत मागे पडतात. एखादी व्यक्ती एकदा शिखरावर पोहोचली म्हणून ती कायम तिथेच राहील, असं होत नाही,” असंही त्या म्हणाल्या.
ए. आर. रहमान यांनी नेमकं काय म्हटलं होतं?
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रहमान यांनी म्हटलं होतं की, मागील काही वर्षांत बॉलीवूडमध्ये निर्णय घेण्याची सत्ता कमी क्रिएटिव लोकांकडे गेली आहे. “गेल्या 8 वर्षांत सत्तेत बदल झाला असावा. जे फारसे क्रिएटिव नाहीत, तेच निर्णय घेत आहेत. कदाचित सांप्रदायिक बाबीही असतील, पण कोणी माझ्या समोर उघडपणे काही सांगितलेलं नाही. मात्र काही कुजबुज ऐकू येते,” असं रहमान यांनी म्हटलं होतं. याच वक्तव्यामुळे सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे.






















