एक्स्प्लोर
Advertisement
प्रियांका गांधी राहुल गांधींना पर्याय नव्हे तर पूरक ठरणार?
'प्रियांका लाओ'ची मागणी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पण तेव्हा राहुल गांधी अपयशी असल्याने प्रियांका हव्यात असं चित्र होतं. आज मात्र ते चित्र बदललंय. अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर एका वर्षात राहुल गांधींचं नेतृत्व परिपक्व होत चाललंय, तीन राज्यांच्या यशाची मोहोरही उमटलीय, त्यावेळी प्रियांकांना आणलं जातंय
नवी दिल्ली : आता येणार, मग येणार म्हणून ज्या प्रियांका गांधींची चर्चा इतकी वर्षे सुरु होती, त्या प्रियांकांची राजकारणातली एन्ट्री आज अखेर जाहीर झाली. काँग्रेसने इतके दिवस राखून ठेवलेलं आपलं शेवटचं अस्त्र अखेर बाहेर काढलं. काँग्रेस पक्षाच्या महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करत त्यांना पूर्व उत्तर प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे.
प्रियांका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियांकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसने आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलं आहे. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली.
प्रियांका गांधी यांना ज्या टायमिंगला आणलं जात आहे, तेही महत्त्वाचं आहे. 'प्रियांका लाओ'ची मागणी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पण तेव्हा राहुल गांधी अपयशी असल्याने प्रियांका हव्यात असं चित्र होतं. आज मात्र ते चित्र बदललंय. अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर एका वर्षात राहुल गांधींचं नेतृत्व परिपक्व होत चाललंय, तीन राज्यांच्या यशाची मोहोरही उमटलीय, त्यावेळी प्रियांकांना आणलं जातंय. एकप्रकारे राहुलला पर्याय नव्हे तर पूरक म्हणून प्रियांका येतायत, हे या टायमिंगमधून दाखवलं जातंय.
प्रियांका गांधी-रॉबर्ट वाड्रा... राजकारणातील हायप्रोफाईल कपल
जेव्हा जेव्हा प्रियांका गांधींच्या प्रवेशाच्या चर्चा सुरु व्हायच्या, तेव्हा त्यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या घोटाळ्याच्या बातम्या मीडियात यायच्या. 2014 च्या वेळी वाड्रा प्रकरण काढून भाजपने प्रियांकांना रोखलं खरं. पण गेल्या पाच वर्षात भाजपची बहुमताची सत्ता असताना, ज्या हरियाणामध्ये ही केस दाखल आहे तिथेही भाजपची सत्ता असताना वाड्रांवर एकही कारवाई होऊ शकली नाही. वाड्रांना घोटाळेबाज म्हणून सिद्ध करण्यात भाजप कमी पडलीय. त्यामुळे याचा केवळ राजकीय अस्त्र म्हणूनच वापर होतोय का अशीही शंका उपस्थित होते. प्रियांका आणि राहुल या दोघांच्या शैलीतही फरक आहे. प्रियांकांमध्ये अनेकांना इंदिरा गांधींची छाप दिसते. त्यांचा जाहीर कार्यक्रमांतला वावरही अगदी जाणीवपूर्णक तसाच असतो. राहुल गांधींना त्यांच्या प्रवेशालाच 'पप्पू' म्हणून हिणवण्याचा प्रयत्न झाला. प्रियांकांच्या बाबतीत मात्र हे धाडस कुणी करु शकणार नाही. शिवाय त्या महिला आहेत, त्यामुळेही टीकेच्या मर्यादेचं भान भाजपला ठेवावं लागेल. ज्या उत्तर प्रदेशात लोकसभेचे सर्वाधिक 80 खासदार येतात, त्या उत्तर प्रदेशाची जबाबदारी आजवर काँग्रेसमध्ये गुलाम नबी आझाद यांच्याकडे होती. पण आता या राज्याची पूर्व आणि पश्चिम अशी विभागणी करुन काँग्रेसने ती ज्योतिरादित्य आणि प्रियांका गांधी यांच्याकडे दिलीय. यूपीतले हे युवा कनेक्शन काँग्रेसला ऊर्जा देईल का, हे पाहावं लागेल.काँग्रेसची 'धाकड गर्ल' प्रियांका गांधींकडे पूर्व उत्तर प्रदेशचंच प्रभारीपद का?
प्रियांका गांधींच्या राजकारणातल्या प्रवेशाचा आणखी एक इफेक्ट होणार आहे तो म्हणजे काँग्रेसमध्ये दोन सत्ताकेंद्रं निर्माण होणार. याआधी गांधी घराण्यात काही काळ इंदिरा गांधी आणि त्यांचे पुत्र संजय गांधी अशी दोन सत्ताकेंद्रं काही काळासाठी तयार झाली होती. पण या दोन सत्ताकेंद्रांचा तो अनुभव पक्षासाठी फारसा बरा नव्हता. आता बहीण-भावाची ही जोडी कशा समन्वयाने काम करणार आणि निष्ठा दाखवताना काँग्रेस नेते कशी कसरत करणार हेही प्रश्न यानिमित्ताने आहेतच. प्रियांका गांधींच्या महासचिव पदानंतर त्यांच्या निवडणूक लढण्याबाबत काय घोषणा होते याचीही उत्सुकता आहेच. त्यामुळे काँग्रेसने अगदी राखून ठेवलेलं हे ब्रम्हास्त्र आता त्यांच्या किती फायद्याचं ठरणार याचं उत्तर लवकरच मिळेल.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion