Nashik Crime News: इव्हेंटच्या नावाखाली विवाहितेचा 'सौदा', दोन लाखांत विक्री करत बळजबरी विवाह लावण्याचा घाट, पोलिसांना कुणकुण लागली अन्...; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Nashik Crime News : नाशिकमध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असताना नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Nashik Crime News: नाशिकमध्ये मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतानाच सातपूर पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या तीन-चार महिन्यांच्या तान्ह्या बाळाची आई आणि पतीपासून विभक्त असलेल्या महिलेची ‘इव्हेंट मॅनेजमेंट’मध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांत विक्री करण्यात आल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे तर नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Nashik Crime News: नोकरीच्या आमिषाने जाळ्यात ओढले
सातपूरच्या कार्बन नाका परिसरात राहणाऱ्या पीडित महिलेला 27 फेब्रुवारी रोजी राणी आणि भागी नावाच्या दोन महिला एजंटांनी संपर्क साधला. “इव्हेंटचे चांगले काम मिळवून देतो,” असे सांगत तिला विश्वासात घेतले. त्यानंतर कारमधून तिला मालेगावमार्गे थेट नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथे नेण्यात आले. तेथे नवनाथ खिरडकर नावाच्या तरुणाकडून दोन लाख रुपये घेत पीडितेच्या इच्छेविरुद्ध तिचा जबरदस्तीने विवाह लावण्यात आल्याचा आरोप आहे. एका रात्रीत आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची जाणीव झालेल्या पीडितेने 28 फेब्रुवारी रोजी कसाबसा मोबाईलवरून आईशी संपर्क साधून संपूर्ण प्रकार सांगितला.
Nashik Crime News: 300 जणांच्या जमावातून सुटका
पीडितेच्या पालकांनी तातडीने सातपूर पोलीस ठाणे गाठले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांचे पथक लगेच जातेगावकडे रवाना झाले. तेथे सुमारे 300 ग्रामस्थांचा जमाव होता. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांनी धाडसाने कारवाई करत पीडितेची सुखरूप सुटका केली. या प्रकरणात दोन महिलांना अटक करण्यात आली असून आणखी सहा संशयित फरार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. या मागे मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Nashik Crime News: ऑपरेशन शोध मोहिमेला वेग
नाशिकमध्ये महिलांच्या आणि अल्पवयीन मुलींच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढल्याने पोलिसांनी ‘ऑपरेशन शोध’ मोहीम सुरू केली आहे. गेल्या दोन महिन्यांत 79 अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांत अंबड, सातपूर आणि इंदिरानगर भागांतून तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या






















