Jalgaon Crime News: पती-पत्नीने एकाच दोरीने संपवली जीवनयात्रा, दोन चिमुकली मुलं पोरकी; जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Jalgaon Crime News: जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील शिवापूर येथे पती-पत्नीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना समोर आली आहे.

Jalgaon Crime News: जळगावच्या (Jalgaon) चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील शिवापूर (Shivapur) येथे पती-पत्नीने शेतात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भगवान जाधव आणि आशाबाई जाधव असे या मृत दाम्पत्याचे नाव असून, त्यांच्या या टोकाच्या पावलामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे दोन लहान मुले पोरकी झाली असून जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Jalgaon Crime News)
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवापूर शिवारातील आपल्याच शेतात असलेल्या उंबराच्या झाडाला या पती-पत्नीने एकाच दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घरापासून अवघ्या 300 फूट अंतरावर ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.
Jalgaon Crime News: शिवापूर गावावर शोककळा
दरम्यान, मृत भगवान आणि आशाबाई यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन लहान मुलं आहेत. दाम्पत्याची दोन्ही मुले शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने घरी नव्हती. आपल्या आई-वडिलांनी अशा प्रकारे जीवन संपवल्याचे समजताच मुलांसह नातेवाईकांना मोठा धक्का बसला आहे. सुखी संसाराचा अचानक असा अंत झाल्याने शिवापूर गावावर शोककळा पसरली आहे. जाधव दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आत्महत्येमागचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे.
Nashik Crime News: तमाशात मध्यरात्री राडा; दगडफेक, तोडफोडीत 10 जखमी
दरम्यान, मालेगाव तालुक्यातील टोकडे गावात दुर्गादेवी यात्रेनिमित्त आयोजित तमाशा कार्यक्रमादरम्यान मध्यरात्री अचानक हिंसाचार उसळला. काही समाजकंटकांच्या टोळक्याने कार्यक्रमस्थळी घुसून दगडफेक करत धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात सुमारे 8 ते 10 जण जखमी झाले असून, जखमींमध्ये एका लहान बालकाचाही समावेश आहे.
हल्लेखोरांनी गावातील दोन घरांवर दगड व विटांनी हल्ला करत तोडफोड केली, तसेच काही वाहनांचेही नुकसान केले. अचानक झालेल्या या प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत काही संशयितांना ताब्यात घेतले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे. जखमींवर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणावपूर्ण शांतता असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
आणखी वाचा





















