Beed Crime news: बीडमध्ये प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन संपवलं, परळीतील रत्ननगर तांडा हादरला
Beed Crime: या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी घबराटलेले आहेत.

Beed Crime: बीडच्या परळी तालुक्यातील रत्ननगर तांड्यात एका तरुणाची प्रेमप्रकरणाच्या संशयावरून कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून, स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मृत तरुणाचे नाव भीमराव शिवाजी राठोड असून, आरोपीचे नाव अनिल चव्हाण आहे, जो घटनास्थळावरून अद्याप फरार आहे.
नेमकं प्रकरण काय?
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, अनिल चव्हाण आणि भीमराव राठोड यांच्यात घरगुती वाद सुरू होता. हा वाद अनेक दिवसांपासून सुरू होता आणि यावरून अनिल चव्हाणने भीमरावला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी अनिलने भीमरावला रत्ननगर तांड्यात बोलावले. या भेटीत दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला. बाचाबाची झाली आणि नंतर हाणामारीत रूपांतर झालं. या हाणामारीदरम्यान अनिलने जवळच असलेला कोयता उचलून भीमरावच्या डोक्यात अनेकदा वार केले. यात भीमराव गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी अनिल चव्हाण घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी आरोपी अनिल चव्हाणच्या शोधासाठी विविध पथके रवाना केली आहेत.
परिसरात तणावाचे वातावरण
या हत्येच्या घटनेमुळे रत्ननगर तांडा आणि आसपासच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिक आणि शेजारी घबराटलेले आहेत. पोलिसांनी येथील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे आणि घटनास्थळी अधिक सुरक्षाबळ तैनात केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने सखोल तपास सुरू केला आहे. आरोपीच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज, शेजारींचे बयान आणि मोबाइल लोकेशन यांचा आधार घेतला जात आहे. तसेच, पोलिसांनी हा प्रकरण गंभीरतेने हाताळत अनिल चव्हाणला लवकर पकडण्यात येईल असे सांगण्यात येत आहे.
बीड जिल्ह्यात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी टोक गाठले असून किरकोळ कारणांनी होणाऱ्या मारहाणीपासून, दिवसाढवळ्या हत्या, खून, मारहाणीचे व्हिडिओ व्हायरल करणे, लैंगिक अत्याचार, फसवणूक अशा कितीतरी घटना वारंवार समोर येत असल्याने गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलाय की नाही? असा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होतोय.























