टाटा ग्रुपकडून मृतांच्या वारसांना प्रत्येकी 1 कोटींची मदत; जखमींचा खर्च उचलणार, वसतिगृह देखील बांधणार
टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं. ''एअर इंडिया फ्लाइट 171 मधील दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे.

मुंबई : अहमदाबाद विमान दुर्घटनेत एअर इंडियाच्या (Air india) बोईंग 171 फ्लाईटमधील 241 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुदैवाने 1 प्रवासी बचावला आहे. अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी घटनेनं देश शोकसागरात बुडाला असून 241 प्रवाशांच्या कुटुंबीयांवर आणि नातेवाईकांवर शोककळा पसरली आहे. एअर इंडिया ही कंपनी टाटा ग्रुपने (Tata) घेतल्याने या विमान दुर्घटनेनंतर टाटा ग्रुपकडूनही दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे. अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारत आणि सामाजिक जाणीव ठेऊन टाटा ग्रुपने विमान दुर्घटनेतील (ahmedabad plane crash) जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्च देखील टाटा ग्रुपकडूनच करण्यात येणार असून आवश्यक ती सर्व काळजी आणि मदत जखमींना मिळेल, असे टाटा ग्रुपने म्हटले आहे. तर, विमान अपघातात कोसळलेल्या अहमदाबादमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहाच्या बांधकामात मदत करण्याचे आश्वासनही टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांच्याकडून देण्यात आले आहे.
टाटा ग्रुपचे चेअरमन एन. चंद्रशेखर यांनी पत्रक जारी करत विमान दुर्घटनेवर शोक व्यक्त केलं. ''एअर इंडिया फ्लाइट 171 मधील दुःखद घटनेने आम्हाला खूप दुःख झाले आहे. या क्षणाच्या आमच्या दु:खद भावना शब्दात व्यक्त न करता येणाऱ्या आहेत. विमान दुर्घटनेत ज्या कुटुंबीयांनी आपले प्रियजन गमावले आहेत, आणि जे जखमी झाले आहेत त्यांच्यासोबत आमच्या सहवेदान आणि प्रार्थना आहेत. या दुर्घटनेत जीव गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबाला (वारसांना) टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. तसेच, जखमींचा वैद्यकीय खर्चही आणि त्यांना आवश्यक ती सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन टाटा ग्रुपकडून देण्यात आले आहे. तसेच, विमान दुर्घटनेमुळे इमारत कोसळलेल्या बी.जे. मेडिकलच्या वसतिगृहाची नव्यानी उभारणी करण्यातही टाटा ग्रुप पुढाकार घेईन,'' असे टाटा ग्रुपचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांनी जाहीर केले.
बोईंगची टीम तपासासाठी भारतात येणार
एअर इंडियाचं हे अपघातग्रस्त विमान बोईंग कंपनीचे असल्याने आता बोईंग कंपनीतील तज्ज्ञांची टीम भारतात पाठवण्यात येणार आहे. एअर इंडिया दुर्घटनेसंदर्भात तपासासाठी बोईंगकडून टीम येणार असल्याची माहिती टाटाकडून देण्यात आली. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी बोईंगच्या सीईओंसोबत चर्चा केली. दुर्घटनेचे नेमकं कारण काय आहे? याच्या तपासासाठी जीई एरोस्पेस देखील तपासात मदत करण्यासाठी टीम पाठवणार असल्याची माहिती आहे.
Tata Group will provide Rs 1 crore to the families of each person who has lost their life in this tragedy. We will also cover the medical expenses of those injured and ensure that they receive all necessary care and support. Additionally, we will provide support in the building… pic.twitter.com/jBPxfmo4at
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) June 12, 2025
विजय रुपाणींचाही मृत्यू
242 प्रवाशांसह लंडनसाठी उड्डाण घेतलेलं हे विमान अचानक खाली कोसळलं अन् मोठा स्फोट झाला. या स्फोटात विमानातील सर्वच्या सर्व 241 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ भाजप नेते विजय रुपाणी हेही प्रवास करत होते. आता, या दुर्घटनेत विजय रुपाणी यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनात शिंदे यांनी दिली. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या विमान प्रवासात होते, त्यांचाही मृत्यू झाला आहे. मी दुर्घटनेबाबत खेद व्यक्त करतो, असे एकनाथ शिंदेंनी म्हटलं. दरम्यान, या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिग्गजांनी शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा
अत्यंत वेदनादायी, दुर्दैवी, विमान दुर्घटनेत विजय रुपाणींचाही मृत्यू; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती
























