एक्स्प्लोर
World Photography Day BLOG: आकाश निरीक्षण आणि कोकणातील संधी

BLOG1908
- श्रीवल्लभ माधव साठे
आकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्रीय अभ्यास हा पूर्वीपासूनच एक हौशी अभ्यासकांची विशेष रूची राहिलेला विषय आहे. रोजच्या आकाशात दिसणारे चंद्र-सूर्य आणि रात्रीच्या आकाशात दिसणारे हजारो लहानमोठे तारे यांच्याविषयी प्रत्येकाच्या मनात कमीअधिक कुतूहल हे असतेच! मृग नक्षत्रातील हरिणाच्या शरीरात घुसलेला बाण आणि सप्तर्षिंच्या साहाय्याने ध्रुवतारा ओळखणे हे काही सामान्य लोक सवयीने करतही असतात. काहीजणांना मंगळ, शुक्र, गुरू हे आपल्या सूर्यमालेतील ग्रहदेखील ओळखता येतात. पण इतर तारे ओळखणे, उघड्या डोळ्यांनी हे सर्व विश्व पाहणे आणि पुढे जाऊन त्यांचे तपशीलवार निरीक्षण नोंदवणे, हे मात्र काही हौशी लोकच करताना दिसतात.
आपल्या दररोजच्या आकाशात दिसणारे ग्रह-तारे यांचे निरीक्षण, राशी, नक्षत्रे यांचे निरीक्षण हे या अभ्यासाचे पारंपारीक स्वरूप राहिलेले आहे. सामान्यपणे आपल्या आकाशात रात्री दिसणारे तेजस्वी तारे ओळखण्यातून याची सुरूवात होते. यांतून कुतूहल वाढत जाते, तसतसे धूमकेतू, ग्रहणे, अधिक्रमणे (occultation) आणि सखोल अवकाशस्थ घटक (deep sky objects) यांचे निरीक्षण अशी पुढची पायरीही काहीजण गाठतात. सखोल अवकाशस्थ घटक यांमध्ये आपली 'मिल्की वे' ही आकाशगंगा, वेगवेगळे तेजोमेघ (nebulae), दीर्घीका (galaxies), तारकागुच्छ (clusters) यांचे निरीक्षण केले जाते. हे निरीक्षण नोंदवतानाच त्यांचे तपशील नोंदविणे आणि बदल तपासणे अशाप्रकारे अभ्यास केला जातो. प्राचीन भारतीय, ग्रीक आणि अरब अभ्यासकांनी याची सुरूवात केल्याचे मानले जाते. ऐतिहासिक काळात गॅलिलिओ, कोपर्निकस, मेस्सियर, लोकमान्य टिळक यांनी अशाप्रकारे नोंदी घेण्याचा सातत्याने प्रयत्न केला. त्यातूनच आजची परंपरा निर्माण झाल्याचे जाणवते.
अलिकडील काळात तंत्रज्ञानाच्या प्रगतीतून या निरीक्षण-नोंदींना छायाचित्रणाची जोड मिळालेली दिसते. दूरदर्शक (telescope) आणि कॅमेऱ्याच्या साहाय्याने अवकाशातील घटकांचे छायाचित्रण करणे हा तरूण निरीक्षकांच्या पसंतीस उतरलेला विषय झालेला आहे. चंद्रावरील खड्डे, गुरू ग्रहावरील रंगीत पट्टे, शनी ग्रहाच्या कड्या, आपली आकाशगंगा, काही तेजोमेघ आणि 'देवयानी' (Andromeda) सारख्या दीर्घीका यांचे छायाचित्रण करण्यास पसंती असलेली दिसते. आदित्य किंजवडेकर या पुण्यातील अशाच हौशी आकाश निरीक्षक आणि छायाचित्रकाराने काढलेल्या फोटोंमुळेच या लेखाच्या लिखाणाचे निमित्त झालेले आहे. साधारण मार्च २०२१ मध्ये आदित्यने राजापूरजवळील कोंड्ये या गांवातून मृग तारकासमूहातील 'एम-४२', म्हणजेच ओरायन तेजोमेघाचे छायाचित्रण केले. या छायाचित्रांना समाजमाध्यमातून मोठी प्रसिद्धी मिळाली. यातूनच कोकणातील संधीवर अधिक लक्ष केंद्रीत झालेले आहे. अर्थात, ही छायाचित्रे घेणे हा प्रचंड मेहनतीचा भाग आहे. अधिक चांगल्या क्षमतेचे कॅमेरे, दूरदर्शक आणि काही संगणकावरील सॉफ्टवेअरच्या मदतीनेच ही छायाचित्रे तयार होतात. म्हणजेच कोणत्याही साध्या छायाचित्रांप्रमाणे हे काम केले जात नाही.
मूळात कोकण म्हणताना, भारताचे भौगोलिक स्थान हे उत्तर गोलार्धात असले तरीही विषुववृत्तापासून जवळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या स्थानामुळे आपण उत्तर गोलार्धासोबतच दक्षिण गोलार्धातील साधारण ३०º क्रांती (declination - अक्षांश) पर्यंतचे अवकाश सहजगत्या पाहू शकतो. अर्थात निरीक्षक असलेल्या ठिकाणाची भौगोलिक स्थितीही यांमध्ये परिणामकारक ठरत असते. आसपासच्या इमारती, झाडांची उंची आणि डोंगर यांमुळे प्रत्येक ठिकाणावरून सगळे आकाश नजरेत येतेच असे होत नाही. शहरांतील रात्रीच्यावेळी निर्माण होणारा प्रकाश तसेच कारखान्यांच्या परिसरातील दिवे यांमुळेही अवकाशाचे निरीक्षण हे काहीसे कठीण बनते. यालाच 'प्रकाश प्रदूषण' (light pollution) असेही म्हणतात. म्हणूनच हौशी निरीक्षक हे शहरांपासून लांब आणि अंधाऱ्या जागी जाऊन निरीक्षण करण्यास प्राधान्य देतात. येथेच कोकणातील संधी ठळक होऊ लागतात. कोकणातील सडे-पठारे ही आकाशनिरीक्षणासाठी अतिशय आदर्श भौगोलिक ठिकाणे आहेत. समुद्र जवळ असल्याने अशा पठारांवरून पश्चिम अवकाशात मावळणाऱ्या घटकांचेही निरीक्षण करणे कोकणातून सुलभ होते. रत्नागिरीचे १७º उत्तर अक्षवृत्त हे स्थानही येथे फायद्याचे ठरते. त्यामुळे आधी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण अवकाशाचे निरीक्षण करणे सुलभ होते.
अवकाशातील घटक आणि त्यासंदर्भात घडणाऱ्या विविध घटनांचे एक निश्चित कालनिर्णय ठरलेले असते. उदा. ठराविक तारखेला दिसणारे उल्कावर्षाव किंवा निश्चित अमावस्या-पौर्णिमेला दिसणारी सूर्य व चंद्रग्रहणे इ. हे कालनिर्णय जाणून घेणे आज इंटरनेटच्या मदतीने सोपे झालेले आहे. आपल्या सोयीच्या तारखा आणि सोयीची भौगोलिक जागा तपासून आकाश निरीक्षण करण्याचा प्रयत्न सगळे हौशी निरीक्षक करतात. यांशिवाय अशा जागी थांबून दररोजचे अवकाश पाहणे हा यांमधील सरावाचा भाग राहतो. वस्तुतः दररोजचे आकाश निरीक्षण हे साध्या डोळ्यांनीच मोठ्या प्रमाणावर केले जाते. सरत्या महिन्यांप्रमाणे दिसू लागणारे आणि मावळणारे नवनवीन अवकाशस्थ घटक यामाध्यमातून पाहिले जातात. हे घटक तपासण्यासाठी अवकाशाचे किंवा खगोलाचे नकाशे आणि कॅटलॉग उपलब्ध आहेत. अतिशय आधारभूत तांत्रिक कौशल्य प्राप्त केल्यानंतर कोणत्याही सामान्य व्यक्तीला हे निरीक्षण नोंदविता येऊ शकते.
केवळ, दररोजची हवास्थिती या निरीक्षणाला मोठ्या प्रमाणावर प्रभावित करत असते. आपल्याकडे मान्सूनचा हंगाम सोडल्यास साधारण नोव्हेंबर ते मार्च या काळात आकाशनिरीक्षण तुलनेने अधिक सुलभ राहते. अर्थात चक्रीवादळे किंवा अवकाळी पाऊस यांसारखे तात्कालिक हवामान बदल अनेकदा परिणामकारक ठरतात. मात्र, ते सोडल्यास हे आकाशनिरीक्षण सर्वथा आनंददायीच ठरते.
यानिमित्ताने कोकणातील पर्यटन व्यवसायाला या आकाशनिरीक्षणाची जोड देणे सहजशक्य असलेले दिसते. वास्तविक, काही संस्था आणि काही रिसॉर्टस् यांमध्ये उत्साहाने सहभागी होताना दिसतात. रत्नागिरीजवळील कर्ला येथील 'सुशेगाद जलविहार' यांचेमार्फत भाट्याच्या खाडीतील जलविहारादरम्यान आकाशनिरीक्षण घडवले जाते. संगमेश्वरजवळील धामणी येथील 'राई' या रिसॉर्टमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केले जातात. शिवाय, काही हौशी निरीक्षक आणि अभ्यासक खाजगी पद्धतीनेदेखील लहान गटांसाठी असे उपक्रम राबवताना दिसतात. याचपद्धतीने वेगवेगळ्या हॉटेल आणि रिसॉर्टच्या साहाय्याने आलेल्या पर्यटकांसाठी एखादा दिवस अवकाशनिरीक्षणाचे आयोजन करण्याकडे आता कल वाढू लागलेला आहे. यांमुळे पर्यटकांच्या विरंगुळ्यातही भर पडते, शिवाय रत्नागिरी किंवा कोकण – एक पर्यटनक्षेत्र (destination) म्हणूनही पर्यटनवैशिष्ट्यांचे मूल्यवर्धन होऊ शकते. यांसाठी आवश्यक असलेले जाणकार आजघडीला कोकणात उपलब्ध आहेत. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या 'खगोल मंडळ' या उपक्रमामधून विद्यार्थ्यांमध्येही याविषयीचे कुतूहल जोपासण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे.
अलिकडे पर्यटकांमध्येही अशा चाकोरीबाहेरील उपक्रमांद्वारे विरंगुळा मिळवण्याकडे कल वाढतो आहे. निसर्ग पर्यटन हा एक अतिशय पसंतीचा पर्यटनविभाग आता बनू लागलेला आहे. तरूण पर्यटकांमध्ये त्याची विशेष ओढ असलेली जाणवत आहे. शहरांपासून आणि सामान्य गर्दीगोंधळापासून लांब जाऊन एखाद्या शांत जागी 'खाली धरती, वर आकाश' यापद्धतीने राहणे आणि निसर्गाचे आविष्कार अनुभवणे हे आनंददायी तर आहेच, परंतु साहसीदेखील आहे. अशावेळी या संधी ओळखून त्यानुसार कार्य करणे श्रेयस्कर आणि औचित्याचे आहे.
ही सर्व उपलब्ध पार्श्वभूमी, जाणकार आणि उत्साही आदरातिथ्य व्यावसायिक यांच्या एकत्रित परिश्रमातून आणि उपक्रमांतून कोकणातील पर्यटन व्यवसायाला एक नवीन आयाम देणे आज समयोचित ठरेल. यातून जाणकार तरूणांना रोजगारसंधी उपलब्ध होईलच, शिवाय अशा समर्पित जागा निर्माण झाल्यास स्थानिकांनाही वेगवेगळ्या संधी निर्माण होऊ शकतात. वाहनतळ व्यवस्था, उपाहारगृहे, प्रसाधनगृहे अशा व्यवस्थांची जोड मिळाल्यास त्यांतूनही रोजगारसंधी निर्माण होऊ शकतात. सगळ्यांच्या परस्परसहकार्यातून कोकणाचे नाव अधिकाधिक उज्ज्वल व्हावे, यांसाठीच हा लेखनप्रपंच!
- श्रीवल्लभ माधव साठे, रत्नागिरी
लेखक आकाशनिरीक्षक आणि फोटोग्राफीचे अभ्यासक आहेत.
View More
























