गेला आठवडाभर गाजत असलेला नवीन प्रजातीचा कोरोनाच्या विषाणूचा अखेर भारतात शिरकाव झाला आहे. सर्वाधिक वेगाने संक्रमित होणाऱ्या या विषाणूच्या भारतातील प्रवेशामुळे देशभरातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. या नवीन प्रजातीचा हा विषाणू फारसा घातक नसला तरी संक्रमित होण्याचा वेग आधीच्या कोरोनाच्या विषाणूच्या तुलनेत सर्वाधिक असल्याचे तंज्ञानी यापूर्वीच सांगतिले आहे. या नवीन विषाणूचा शिरकाव भारतात होऊ नये म्हणून केंद्र सरकारने तात्काळ पाऊले उचलून ब्रिटन होऊन येणाऱ्या विमानांना प्रवेश बंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र, बंदी करण्याच्या आदल्या दिवशी येणाऱ्या काही प्रवाशाच्या तपासणीत हा नवीन विषाणू 6 प्रवाशांच्या नमुने तपासणीत आढळून आला आहे. अजून काही नमुन्यांची तपासणी सुरूच आहे. सध्याच्या तपासणीत सध्या तरी महाराष्ट्रातील एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, भविष्यात महाराष्ट्रात मिळणारच नाही असे खात्रीलायक सांगता येत नाही. सध्या जे रुग्ण सापडले आहेत ते भारतातील विविध भागातील आहे. या नवीन विषाणूचा परदेशातील कहर पाहता हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कारण होता कामा नये. त्या दृष्टीने नागरिकांनी न घाबरता सुरक्षिततेच्या सर्व नियमाचे पालन करत आपला वावर ठेवला पाहिजे.


सध्या जो नवीन प्रजातीचा कोरोना म्हणून आपल्याकडे ज्याबाबत जोरदार चर्चा सुरु आहे. त्याची विज्ञान जगतातील जी माहिती उपलब्ध झाली आहे. त्याप्रमाणे हा नवीन प्रजातीचा कोरोनाचा विषाणू वेगाने पसरतो. मात्र, त्याची तीव्रता फार नसल्यची माहिती वैद्यकीय तज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे सावधगिरी जो पूर्वीचा उपाय होता तोच या विषाणूचा बाबतीतही लागू होतो. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत आधीच 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण असल्याचे जाहीर केले आहे. सावधगिरीचा उपाय म्हणून ही प्रतिबंधात्मक उचलली आहेत. विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून 25 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.


केंद्र सरकारच्या अखत्यारीतील पत्र सूचना विभाग कार्यालयने 29 डिसेंबर रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात देशात 6 रुग्ण नवीन विषाणूच्या प्रजातीचे आढळल्याचे जाहीर केले आहे. आतापर्यंत जे काही 114 नागरिकांमध्ये कोरोनाची चाचणी पॉजिटीव्ह आली होती अशा सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी म्हणजेच त्याच्यामध्ये नवीन प्रजातीचा विषाणू आहे कि नाही हे पाहण्यासाठी देशातील 10 अत्याधुनिक प्रयोगक्षेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये जीनोम सिक्वेन्सिंगची सुविधा उपलब्ध आहे. या अशा 10 प्रयोगशाळा मध्ये, एन आय बी एम जि कलकत्ता, आय एल एस भुवनेश्वर, एन आय व्ही पुणे, सी सी एस पुणे, सी सी एम बी हैद्राबाद, सी डी एफ डी हैद्राबाद, इनस्टेम बंगलोर, निमहान्स बंगलोर, आय जि आय बी दिल्ली, एन सी डी सी दिल्ली या प्रयोगशाळेंचा समावेश आहे. जे 6 रुग्णांचे नवीन विषाणूच्या प्रजतीचे नमुने ज्या प्रयोगशाळेत सापडले त्यामध्ये 3 नमुने निमहान्स बंगलोर, तर 2 नमुने सी सी एम बी हैद्राबाद, तर 1 नमुना एन आय व्ही पुणे या प्रयोगशाळेच्या तपासणीत आढळून आला आहे.


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे सांगतात, की, "या नव्या विषाणूची प्रजाती सापडल्यापासून राज्याचे प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. प्रतिबंधात्मक पावले उचलणे हे गरजेचं होत ते काम शासनाने केले आहे. यापुढे नागरिकांनी आपला वावर सुरक्षित ठेवला पाहिजे. आजही राज्यात अनेक ठिकाणी नागरिक मास्कचा वापर हवा तसा करत नाही. सुरक्षिततेच्या नियमांच्या अनुषंगाने नागिकांमध्ये ढिलाई आली आहे. आपण एवढी काळजी घेतल्यामुळे हे नवीन प्रजातीच्या विषाणूचे रुग्ण सापडले आहे, एखादा जरी सर्वेक्षणातून सुटला तर कहर होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी जी अगोदर घेत होते त्याप्रमाणे घेत राहिलीच पाहिजे. काही महिन्यात लस येईल तो पर्यंत तरी सगळ्यांनी या आजराबाबत दक्ष राहणे गरजेचे आहे."


या सहाही रुग्णांना वर सध्या व्यवस्थित उपचार सुरू असून त्याच्या सानिध्यात असणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हा नवीन प्रजातीचा विषाणू यापूर्वीच डेन्मार्क, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रांस, स्वित्झर्लंड, जर्मनी, कॅनडा, जपान, लेबनॉन, आणि सिंगापूर या देहसमध्ये आढळून आला आहे.


"जे काही रुग्ण सापडले आहेत त्यांचा आणि त्यांच्या सानिध्यातील आलेल्या व्यक्तींचा अलगीकरणाचा कालावधी 14 दिवसापेक्षा अधिक असला पाहिजे. या प्रकरणी आपण सगळ्यांनी जास्त सतर्क राहणे गरजेचे आहे. सध्या तरी या नवीन विषाणूच्या आजारावर तीच उपचार पद्धती असल्याची माहिती समोर आली आहे आणि या आजाराच्या प्रादुर्भावाची लक्षणे हा सारखीच असल्याचे सांगण्यात येत आहे. हा विषाणू घातक नसला तरी त्याचा प्रादुर्भावाचा वेग हा प्रचंड आहे. त्यामुळे सध्या तरी कोणतीही नवीन उपचापद्धती नसली तरी लोकांनी थोडी जास्त काळजी या काळात घेतली पाहिजे. आपण आतापर्यंत कोरोनाची सक्षमपणे लढाई लढत आलो आहोत. हा नवीन विषाणूच्या प्रजाती दुसरे लाटेचे कारण बनता काम नये एवढी आपण काळजी घेतली पाहिजे." असे पुणे येथील श्वसन विकार तज्ञ डॉ स्वप्नील कुलकर्णी सांगतात.


डिसेंबर 24, ला 'जुना विरुद्ध नवा कोरोना!' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये, कोरोनाची साथ आटोक्यात येत असतानाच आता या नवीन प्रजातीचा कोरोना निर्माण झाल्याच्या घटनेने आरोग्य विभागाची चांगलीच डोकेदुखी वाढवली आहे. सध्याच्या या परिस्थितीत जो जुना कोरोना अस्तित्वात होता त्याच्यामुळे लाखो नागरिक या संसर्गजन्य आजराने बाधित झाले तर हजारोच्या संख्येने नागरिकांचा मृत्यू झाला. त्या कोरोनाबद्दल सध्या फार कुणी बोलताना दिसत नसून नव्या कोरोनाच्या प्रजातीभोवती सर्वच यंत्रणा फिरत असल्याचे आढळत आहे. त्यामुळे जुना विरुद्ध नवा कोरोना असे चित्र सध्या जगभरात दिसत आहे. आजही आपल्याकडे रोज जुन्या कोरोनाच्या विषाणूमुळे नवीन निर्माण होणारे रुग्ण आढळत आहेत तर त्यापासून होणाऱ्या मृत्यूची संख्याची मोठी आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालानुसार बुधवारी 23 डिसेंबर रोजी 3 हजार 913 नवीन रुग्णांचे निदान झाले असून 93 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी नव्या कोरोनाची भीती न बाळगता उगाच चिंता व्यक्त करत न बसता सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे हाच दोन्ही प्रकारच्या कोरोनापासून लांब राहण्याचा एकमेव मार्ग आहे. नव्या कोरोनाबद्दल तो वेगाने पसरतो यापेक्षा कोणतीही नवीन माहिती अद्याप कुणाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकारात जुन्या कोरोनाच्या विषाणूला न विसरता सगळ्यांनीच सतर्क राहणे गरजेचे आहे. दोन्ही कोरोनाचे विषाणू हा संसर्गजन्य आजाराचाच भाग आहेत.

नवीन प्रजतीचा विषाणूचा रुग्ण भारता सारख्या देशात सापडणे चांगले लक्षण नव्हे. सध्या विनोदाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये जे कुणी नागरिक परदेशातून येत आहे त्यांचे 'स्वॅबसे करेंगे सबका स्वागत' असे म्हंटल आहे. मात्र, संभाव्य धोके टाळायचे असेल तर आता अशाच पद्धतीने काम करावे लागणार आहे. कारण सध्याच्या काळात आर टी पी सी आर चाचणी वर अवलंबून राहावे लागणार असून त्यामुळे या प्रवाशांच्या चाचण्यांमधून संशयित रुग्ण सापडण्यास मदत होणार आहे. ब्रिटन होऊन काही दिवसापूर्वी राज्यात दखल झालेल्या नागरिकांचा आरोग्य यंत्रणा शोध घेत आहे. जर असे नागरिक कुणाला माहित असल्यास असल्यास त्यांनी यंत्रणाना माहिती दिली पाहिजे. त्यामुळे वेळीच या आजाराला अटकाव घालण्यास मदत होऊ शकते. नागरिकांनी आता आरोग्य साक्षर होऊन आपली समाजउपयोगी असलेली मदत केली पाहिजे. तो कोरोनाच्या प्रादुर्भावाला प्रतिबंध घालण्याचा एक मार्ग आहे हे विसरता कामा नये.


संतोष आंधळे यांचे आणखी काही महत्वाचे ब्लॉग