दिवसागणिक 'कोरोना' वाढतोय ही आता बातमी देणे म्हणजे फक्त औपचारिकता झाली आहे. सुरुवातीच्या काळात सर्व सुरक्षिततेचे नियम पाळणारे आता ढेपाळले आहे. कोरोनबाधितांचे आकडे चौफेर बाजूने दणादण वाढत आहेत. शहरातला कोरोना आता ग्रामीण भागाकडे वळलाय. राज्याच्या विविध भागात स्थानिक पातळीवर लॉकडाउन करण्यास पुन्हा सुरुवात झाली आहे. मात्र, या सगळ्या प्रक्रियेत काही नागरिकांनी मात्र सुरक्षिततेच्या उपायांकडे मात्र पाठ वळविल्याचे चित्र राज्यातील विविध भागात बघायला मिळत आहे.


लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या नियंत्रित राहण्यास मदत होत असली तरी 'पुन्हा' लॉकडाउन करायची वेळ का येते? यामधून नागरिकांनी धडा घेतला पाहिजे. लॉकडाउन शिथिल झाल्यावरही सुरक्षिततेचे नियम पाळत राहणे गरजेचे आहे यावरून स्पष्ट होते. जोपर्यंत कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्याकडे आहे तोपर्यंत काळजी घेत राहणे ही काळाची गरज आहे.


राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातील रुग्ण संख्या ही दिवसागणिक वाढतच आहे. मोठा काळ लॉकडाउनमध्ये घालविल्यानंतर प्रत्येकालाच रोजगाराचा प्रश्न भेडसावू लागला आहे. काही जणांना रोजगार मिळवायचा असेल तर बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही अशी काही लोकांची परिस्थिती आहे. बाहेर पडल्यानंतर काही लोकांकडून सुरक्षिततेचे नियम अनावधानाने पाळले जात नाही. काही लोकांना नियम पाळायची इच्छा नसते. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेतून कोरोनाचा संसर्ग वाढीस लागल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून दिसून आले आहे.


राज्याच्या आरोग्य विभागाने 12 जुलै रोजी जी रुग्णसंख्याची आकडेवारी जाहीर केली आहे, त्यामध्ये ठाणे मंडळ, पुणे मंडळ आणि औरंगाबाद मंडळातील आकडेवारी वाढत आहे. शहरी भागात आरोग्याच्या सुविधा ग्रामीण भागाच्या तुलनेने अधिक आहे, शिवाय खासगी आणि शासनाची महापालिकेची रुग्णालये शहरी भागात मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यामुळे रुग्णांना तात्काळ उपचार मिळणे सहज शक्य होते. ग्रामीण भागातही आरोग्याच्या सुविधा आहेत, मात्र त्या कमी प्रमाणात आहेत, त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला तर त्यांना अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. या सगळ्या राज्याभर पसरलेल्या कोरोनामुळे आता शहरातील आरोग्य व्यवस्थेबरोबर प्रशासनाला ग्रामीण भागाकडेही लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. शहरातील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोना आता नियंत्रित करण्यात आरोग्य विभागाला यश प्राप्त होताना दिसत आहे. मात्र, ज्या पद्धतीने शहरात आरोग्याच्या सुविधा मुबलक प्रमाणात आहे. तेवढ्या सुविधा आजही ग्रामीण भागात उपलब्ध नाही हे कटू वास्तव आपण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे.


एप्रिल महिन्याच्या काळात राज्यातील जिल्ह्याचे वर्गीकरण कोरोनाच्या प्रादुर्भावावरील आकडेवारीनुसार केली जात होती, म्हणजेच ग्रीन, ऑरेंज आणि रेड अशा तीन झोन मध्ये त्यांची विभागणी करण्यात आली होती. शहरापुरता मर्यादीत असणारा कोरोना आता ग्रामीण भागात चांगलाच पसरलाय. या काळात 'झोन'ची टप्पेवारी कधी नाहीशी झाली ही कोणलाही कळली सुद्धा आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे झोन ही संकल्पनाच मुळात संपुष्ठात आली. ग्रीन झोन म्हणजे राज्यातील असे जिल्हे, ज्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही किंवा गेल्या 21 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही, तर ऑरेंज झोन याचा अर्थ असा होता कि ज्या जिल्ह्यात गेल्या 14 दिवसात एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नाही. रेड झोनच तर सांगायलाच नको, मोठ्या संख्यने ज्या जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहे असा परिसर. सध्या राज्याच्या सर्वच जिल्ह्यात कोरोनबाधित रुग्ण आढळून आले आहेत.


सुरुवातीच्या काळात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगर हे जिल्हे रेड झोन मध्ये येत होते. तर ऑरेंज झोन मध्ये येणाऱ्या ह्या जिल्ह्यात रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलडाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे ग्रीन झोन मध्ये येणारे या जिल्ह्यांमध्ये उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश होता. ग्रामीण भागातील बऱ्यापैकी तालुक्यात जिल्ह्यात दिवसागणिक कमी संख्यने का होईना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील एकही जिल्हा नाही की जिथे कोरोना पोहचला नाही, भंडारा आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे सोडले तर दुर्दैवाने सर्वच ठिकाणी कमी जास्त संख्यने या आजराने मृत्यू झाले आहेत. ज्या या सहा जिल्ह्यांचा समावेश मे च्या पहिल्या आठवड्यामध्ये ग्रीन झोन मध्ये येत होता. उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा अशा सर्व जिल्ह्यामध्ये आज कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सध्याच्या घडीला पूर्ण राज्यच कोरोनामय झालं आहे.

विशेष म्हणजे ग्रामीण भागात आजही नागरिक शासनाने कोरोनापासून बचाव करण्याकरिता जे नियम आखून दिले आहेत, ते पाळताना दिसत नाही. त्यामुळे या भागात त्यांना अजून या आजाराची जनजागृती करण्याची गरज आहे. कोरोनाचा फैलाव अधिक होण्या अगोदरच या ग्रामीण भागातील लोकांना दक्ष राहावे लागणार आहे. सुदैवाने ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा आकडा कमी असला तरी तो तेवढाच ठेवून किंवा कमी कसा करता येईल यावर प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. काही नागरिकांचा फाजील आत्मविश्वास उफाळून आलाय, दुसरे कोणी नियम पाळत असतील तर त्याला तो कसा मूर्ख आहे, नियम वैगरे पळून काही होत नाही याचे सध्या धडे देत आहेत. यापुढे नागरिकांनी गाफील राहता कामा नये, लवकरच श्रावण महिन्यास सुरुवात होत आहे. त्यानंतर आपल्याकडे बऱ्यापैकी विविध सणांना सुरुवात होते. मात्र, यावेळी सर्व सण शासनाने दिलेल्या नियमांचा आदर राखून छोट्या स्वरूपात केले पाहिजे. अनाठायी होणारी गार्ड प्रत्येकानेच टाळली पाहिजे. पावसाचे दिवस आहेत त्यामुळे पावसाळी आजाराचे प्रमाण वाढू शकते. एकंदरच काय तर मोठ्या प्रमाणात कोरोना पसरून ग्रामीण भागही आता कोरोनामय झाला आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग