(Source: ECI / CVoter)
BLOG: शिवसेना बंडाची वर्षपूर्ती
दिनांक 20 जून 2022 याच दिवशी शिवसेनेच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या बंडाची पहिली ठिणगी पडली. या बंडाला एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांनी हे 'बंड' नव्हतं तर तो एक 'उठाव' असल्याचा दावा करून नाण्याची दुसरी बाजू मांडली. त्यावर अनेक बाजूंनी खल झाला. राजकीय निरीक्षकांनी विश्लेषणं केली, पुस्तकं लिहिली. प्रत्येकानं आपल्याला जे दिसलं, जे अनुभवता आलं ते लिहिलं. त्यावर भाष्य केलं. पण अजूनही शिवसेनेतल्या त्या ऐतिहासिक बंडावर बोलणं थांबत नाहीय. कारण सध्याच्या राज्यातल्या राजकारणात हे 'बंड' किंवा हा 'उठाव' उद्याच्या सत्ताकारणाची गणितं ठरवणारा आहे. एक पत्रकार म्हणून शिवसेनेतली ही उभी फूट आम्ही गेल्या वर्षभरात अगदी जवळून पाहिली. 'पक्ष कसा फुटतो ?' 'गटतट कसे निर्माण होतात ?' 'आपला पक्ष हीच खरी शिवसेना' यासाठी झालेला टोकाचा संघर्ष हे सारं गेल्या वर्षभरात बातम्या करताना अनुभवता आलं. आणि आता बंडाच्या वर्षपूर्तीनंतरही यावर वार्तांकन करत राहू. यात कोण चूक? कोण बरोबर? जे झालं ते योग्य की अयोग्य? यात न पडता तटस्थपणे जे पाहिलं, जे ऐकलं, जे अनुभवलं, जे समजलं, ते एक पत्रकार म्हणून मांडण्याचा हा प्रयत्न आहे
वर्ष झालं. याच दिवशी विधान परिषदेच्या जागांसाठीचं मतदान पार पडत होतं. निकाल हाती येत होते तर दुसरीकडे विजयी झालेल्या उमेदवारांचं सेलिब्रेशन सुरू होतं. पण त्याआधीच एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदार विधान भवनात नाहीत, असं समजलं होत. अचानक मतदान करून आमदार इतक्या लवकर गायब होतील वाटत नव्हतं. म्हणून आधी विधान परिषदेच्या निकालाची आणि मग गायब झालेल्या आमदारांची बातमी बघू, असं म्हणत जवळपास सर्वच पत्रकारांनी विधान परिषदेच्या निकालावर लक्ष केंद्रित केलं होतं. निकाल हाती आले, विजयाचे सेलिब्रेशन संपलं आणि गायब असलेल्या त्या गटाचा विचार सुरू झाला. रात्री बाराच्या सुमारास दिवसभराचा आलेला थकवा, सुरू झालेला पाऊस, त्यामुळं डोक्यातला विचार काहीसा थांबवून घरी परतण्याचा निर्णय आमच्यातल्या अनेकांनी घेतला. पण आमच्यातल्या काही वरिष्ठ पत्रकारांनी त्या मध्यरात्रीपर्यंत नॉट रिचेबल असलेल्या आमदारांचा नेमका पत्ता काढायला सुरुवात केली.
एकनाथ शिंदेंसोबत नॉट रिचेबल असलेले ते आमदार सुरतमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये असल्याचं सकाळी साडेसहा सातच्या दरम्यान समजलं. सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्यान मला ऑफिसकडून सुरतला निघण्याची सूचना आली. एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले आहेत त्या ठिकाणी पोहोचण्याची ही सूचना होती. प्रत्येक राजकीय पत्रकाराला हवीहवीशी ही जबाबदारी होती. तसाच सुरतकडे निघालो. हे आमदार का गेले? त्यांनी पक्ष सोडला का? या आमदारांच्या नाराजीचं कारण काय? निघून गेलेल्या आमदारांमुळं सरकार पडणार का? बंड केलेल्या आमदारांमुळे सत्तांतर होणार का? असे अनेक प्रश्न सुरतला जाताना पत्रकार म्हणून अनुत्तरीत होते. बंडखोर आमदारांची पुढची नेमकी भूमिकाही कळत नव्हती. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि आमदार रवींद्र फाटक हे शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांना भेटण्यासाठी सुरतला निघालेले असताना आम्हाला दिसले. पण तेही कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या मनस्थितीत नव्हते.
गुजरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्या पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर तैनात होता. नार्वेकर आणि फाटक यांनाही त्या पोलिसांनी 15 ते 20 मिनिटानंतर आतमध्ये सोडलं. नेमकं काय सुरू आहे? किती आमदार आतमध्ये आहेत? या आमदारांचे नेमकं म्हणणं काय आहे? तसं काहीच कळायला मार्ग नव्हता. कारण आतमध्ये माहितीनुसार जेवढे आमदार होते, त्यातील सर्वांचा मोबाईल बंद होता. काही वेळानं आतमध्ये नेमकं कोण कोण आहे, हे कळायला सुरुवात झाली. आणि मग आतल्या काही जणांकडून या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेमकं कोण आहे आणि आणखी कोण या गटात येणार आहे, याची माहितीही यायला सुरुवात झाली. काही वेळानं आतील सूत्रांकडून मेसेज आला. या सर्व आमदारांचा पुढचा मुक्काम हा गुवाहाटीला असणार होता. मध्यरात्री तीन-साडेतीनच्या दरम्यान एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचे चेहरे विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर सुरतेतच पाहायला मिळाले. मग काहीशी पुसट भूमिकाही सुरतहून गुवाहाटीला जातांना एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी स्पष्ट करायला सुरुवात केली. यामध्ये 'आपणच शिवसेना आहोत', 'बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी दिलेल्या हिंदुत्वाचे खरे विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत' अशी त्या वेळेची या बाजूला निघालेल्या गटाची भूमिका होती.
पण हा बाजूला निघालेला गट उद्या आम्हीच खरा पक्ष ही भूमिका घेऊन सत्ता स्थापन करणार का? ही बाजूला निघालेल्या आमदारांची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मान्य होणार का? महाविकास आघाडीतून शिवसेना बाजूला होणार का? की हा गट भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन करणार? असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित होते आणि त्याचा उलगडा हळूहळू होत गेला. गुवाहाटीला मुक्कामाला असताना या गटाचं बळ दिवसागणिक वाढत होतं. इतर आमदारसुद्धा या गटासोबत येऊ लागले होते. जवळपास 40 आमदारांची ताकद या गटाकडे आली आणि तेवढ्या आमदारांची ताकद एकत्र आल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना हा दावा शिंदे आणि त्यांच्या समर्थक चाळीस आमदारांनी केला. आणि तिथूनच सुरु झाला शिवसेनेतला खरा राजकीय संघर्ष.
हा संघर्ष सत्तेचा होता, हा संघर्ष पक्षाचा होता, पक्षचिन्हाचा होता, विचारांचा होता. तसंच आमदार-खासदारांपासून तळगाळातला कार्यकर्ताही आपल्यासोबत राहावा यासाठीचाही तो संघर्ष होता. शिवाय मूळ शिवसेना पक्षाशी निगडित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा संघर्ष आपल्या अस्तित्वाचा वाटू लागला होता आणि त्या
संघर्षातूनच एक भावनिक वातावरणही निर्माण झालं. ते एकीकडे अजूनही कायम आहे, तर दुसरीकडे कायद्याच्या कसोटीवरही तब्बल नऊ महिने सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्ष सुरू राहिला. सुनावण्यावर सुनावण्या होत राहिल्या आणि तारखांवर तारखा मिळत गेल्या. त्याआधी निवडणूक आयोगाच्या दारात हे दोन गट उभे राहिले. हजारो कार्यकर्त्यांनी शपथपत्रं दिली. त्यांचे गठ्ठेच्या गठ्ठे निवडणूक आयोगात सादर झाले. या लढाईत उद्धव ठाकरेंकडून पक्षाचं नाव गेलं आणि धनुष्यबाण हे चिन्हही. 'शिवसेना' हे नाव आणि 'धनुष्यबाण' हे पक्षचिन्हही शिंदेंच्या गटाला मिळालं. त्याआधी 40 आमदार, 13 खासदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपल्या बाजूनं वळवण्यात एकनाथ शिंदेंना यश मिळालं होतं. मूळ शिवसेनेतली नेतेमंडळी आपल्या बाजूनं आणण्याचं शिंदेंचं मॅजिक अगदी वर्षपूर्ती होत असतानाही कायम आहे. अगदी कालपरवा शिंदेंच्या शिवसेनेत आलेल्या मनीषा कायंदेच बघा ना.
शिवसेनेत दोन गट निर्माण झाल्यानं राज्यातल्या अनेक कुटुंबांमध्येही सुद्धा विभागणी झालीय. कोणाचे वडील शिंदेंसोबत आहेत तर चिरंजीव ठाकरेंसोबत. कोणाचे चिरंजीव शिंदेंसोबत आहेत तर वडील ठाकरेंसोबत आहेत. अगदी भावाभावांमध्येही विभागणी झालीय.
गेल्या वर्षभरात ठाकरे आणि शिंदे गटांमध्ये एकमेकांवर टीका झाल्यानं त्यांच्यातील वादही विकोपाला गेले आहेत. अगदी खालच्या पातळीला जाऊन वर्षभर एकमेकांवर शाब्दिक चिखलफेकही झाली. आणि वर्षपूर्ती होत असतानाही ही शाब्दिक चिखलफेक पुढे सुरू राहील अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेनेच्या इतिहासात याच वर्षभरात पहिल्यांदाच दोन 'दसरा मेळावे' झाले, आणि आता 'शिवसेना वर्धापन दिन' साजरा करण्यासाठी दोन सोहळेही झाले. दोन्ही कार्यक्रमात दोन्ही पक्षांकडून मोठं शक्तिप्रदर्शन झालं. वर्षभरात दोन्ही गटांनी एकमेकांना कोंडीत पकडण्याचा कुठलीही संधी सोडली नव्हती. आधीच विकोपाला गेलेला हा संघर्ष आता आगामी निवडणुकांच्या काळात पराकोटीला पोहोचणार अशी चिन्ह आहेत.
या वर्षभरात उद्धव ठाकरेंशी फारकत घेऊन अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. ते का गेले? याची प्रत्येकानं दिलेली कारणं वेगवेगळी आहेत. पण त्यांनी यापुढे शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना मानून राजकारणात आपलं अस्तित्व टिकवण्याचं ध्येय ठेवलंय. आता जी मंडळी ठाकरेंसोबत राहिली, ती का राहिली ? याची त्या प्रत्येकानं वेगळी कारणं दिली आहेत. आता तेही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निष्ठावंतांची शिवसेना मानून आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. वर्षभरात घडलेल्या सगळ्या घडामोडी बघितल्या तर नेमकं चुकलं कोणाचं ? एकनाथ शिंदेंचं की उद्धव ठाकरेंचं ? यामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह वेगवेगळी उत्तरं देतील. यापुढे कोणी विचाराचा वारसा जपण्याचा प्रयत्न करेल तर कोणी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करेल. पण या 'बंडा'च्या किंवा 'उठावा'च्या वर्षपूर्तीनंतरही 'कोणता झेंडा घेऊ हाती?' हा प्रश्न शिवसेना या नावाशी जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला पडलेला पाहायला मिळेल. कारण या संघर्षातली हार जीतच खरी शिवसेना ठरवेल आणि खऱ्या शिवसेनेचा 'भगवा' महाराष्ट्रात फडकवेल.