एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या
खेड्यांमध्ये रिकामी, मोकळी मुलं आणि वृद्ध खूप. गावात नवं माणूस दिसलं की मुलं झुंडीनं त्याच्यामागं फिरायला लागतात. आदिवासी पाड्यांमध्ये मात्र चित्र थोडं वेगळं दिसतं.
![चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या Kavita Mahajans 6th Blog In Chalu Vartaman Kal Blog Series चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19173026/Kavita-Mahajan-1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
आदिवासी पट्टे आणि जिथं नीट रस्तेही नाहीत अशा लहान खेड्यांमधून फिरताना काही अनुभव समान असतात, काही निराळे. खेड्यांमध्ये रिकामी, मोकळी मुलं आणि वृद्ध खूप. गावात नवं माणूस दिसलं की मुलं झुंडीनं त्याच्यामागं फिरायला लागतात. आदिवासी पाड्यांमध्ये मात्र चित्र थोडं वेगळं दिसतं. वृद्धही रिकामे नसतात आणि मुलंही. प्रत्येक गावात / वाडीत / पाड्यात मी आधी तीन गोष्टी बघते... प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा / अंगणवाडी आणि पाणवठा!
प्राथमिक शाळा सहसा एकशिक्षकी. सहसा तिथले शिक्षक गायब असतात. असलेच तर गावातून मुलं गोळा करून आणण्यापासून त्यांचं काम सुरू होतं. मग एका खोलीत तीन वर्ग भरतात. एक वर्ग शिक्षकांकडे तोंड करून बसतो, त्याला ते शिकवत असतात. दुसरे दोन वर्ग भिंतीकडे तोंड करून दिलेल्या अभ्यासानुसार काही वाचत असतात वा गणितं सोडवत असतात. व्हरांड्यात चौथा वर्ग असंच काहीतरी अभ्यास करणारा. कुठे शाळा पडक्या, कुठं शिक्षक बेवडे. प्राथमिक आरोग्य केंद्रं म्हणजे निव्वळ खंडहर. उद्धवस्त धर्मशाळा... ही कविता आठवत राहते ही सकाळी बकाली पाहून. तुलनेत अंगणवाड्यांची अवस्था बरी असते. त्या कधी शाळा जरा बरी असेल तर शाळेच्याच एका वर्गात भरतात किंवा मग कुठल्याशा भाडोत्री खोपटात. अंगणवाडी चालक बाई गावातल्याच असतात, त्यामुळे शिक्षकांप्रमाणे सतत अदृश्य होणं त्यांना जमणारं नसतं. मुलं गोळा करायची आणि त्यांना खिचडी वा कडधान्याची उसळ असं काहीतरी रांधून खाऊ घालायचं हे त्यांचं ‘मुख्य काम’ असा त्यांच्यासह गावकऱ्यांचा समज असतो. जिथं अन्नाला काहीसा दर्जा असतो, तिथं मुलं गोळा करण्याची वेळ येत नाही. पालक मुलांना आणून सोडतात वा जवळची मुलं स्वत:हून येतात. हातात एक वाडगा किंवा ताटली असते. अंगावर कपडे असतात-नसतात... निदान कमरेला गुंडाळलेलं असतं, बास. सगळे अन्न शिजायची वाट बघत असतात. मग डाव-दोन डाव वाडग्यात पडतात. तशाच मळकट हातांनी मुलं खाऊ लागतात. त्यांची नखं वाढून साचलेला मळ दिसत असतो, त्याकडे पाहण्याची कुणाला गरज भासत नाही. काही मुलं वाडगा उचलून सरळ घरी घेऊन जातात. कधी एखादी गरोदर बाईही वाडगा घेऊन येते. या योजनेत तिलाही अन्न मिळणार असतं.
मी चौकशा करते की, महिन्याला किती सामान आणता, कोणकोणतं? किती मुलं त्यात जेवतात? सामान कुठं ठेवता? त्याचा दर्जा काय असतो? चोरी होत नाही का? इथंच स्वयंपाक करता तर तेलाचा डबा कुठं दिसत नाहीये तो? अच्छा... डबा घरी ठेवलाय... मुलं सांडू शकतात... बरं. तुमच्या कामाचं स्वरूप काय? पगार किती मिळतो? कामाचं स्वरूप काय? वगैरे.
अंगणवाडीच्या बाई निरुत्साहाने तुटक उत्तरं देत राहतात. आमचं बोलणं होईतो वाडगे चाटूनपुसून साफ झालेले असतात. पोटांचे नगारे आणि हातापायांच्या काड्या झालेली मुलं पांगतात. तिथं प्यायलाही पाणी नसतं, हात-तोंड धुण्यासाठी तर नाहीच नाही. शेजारच्या घरातली एक बाई मला प्यायला पाणी आणून देते. चहा विचारते. मग बिनदुधाचा, एक गुळाचा खडा घातलेला काळा चहा येतो. तोवर अजून काही लोक जमतात. गावातल्या समस्यांची चर्चा सुरू होते.
वर्षानुवर्षं या चित्रात बदल दिसत नाही. अधूनमधून पगारवाढीसाठी अंगणवाडी चालिका आंदोलनं करतात. त्याच्या बातम्या येतात, विरतात. मुलांचं काही समजत नाही. महाराष्ट्रात आज ७३ लाख मुलं या बकाल आणि भकास अंगणवाड्यांमध्ये येणारी आहेत. कुपोषित मुलं किती याच्या आकडेवाऱ्या सहसा मुलं किड्यांसारखी पटापट मरायला लागली की मगच लाजतमुरडत अर्ध्या अधुऱ्या समोर येतात... नीट तोंड दाखवत नाहीत, खाली मान घालून उभ्या असतात. विक्रमगडमध्ये तीव्र कुपोषित मुलं ७४१, अतितीव्र कुपोषित मुलं ११३, डहाणूमध्ये १०३, पालघरमध्ये ३९७ आणि गोंदिया व नंदुरबार इथं ५०० हून अधिक! नंदुरबार, गडचिरोली हे जिल्हे तरी आडबाजूला आहेत म्हणता येईल; नाशिक, ठाणे, पालघर या मुंबईहून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील हीच अवस्था? इथं अजूनही तीव्र कुपोषित आणि अतितीव्र कुपोषित मुलं आढळावीत आणि आपल्याला कुणालाच कणभर देखील लाज वाटू नये?
एक दुसरं चित्रही मी पाहिलं आहे. स्वप्नवत म्हणावं असं वास्तव होतं ते. ओरिसामधल्या कोरापुट हा आपल्याकडील गडचिरोलीसारखाच जिल्हा. आदिवासी भाग. नक्षलवाद्यांचा प्रश्न. जंगलात आत आत गेल्यावर लागणाऱ्या लहान-लहान, पण अत्यंत स्वच्छ वस्त्या. घरांची रचना म्हणजे अगदी रांगेत, जवळजवळ बांधलेली घरं रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. अधिक घरं झाली की मागून अशीच दुहेरी रांग. आकस्मिक काही शाळांमधून गेले, काही अंगणवाड्या आणि काही बचतगटांची कामं पाहिली. त्या सजवलेल्या सुंदर अंगणवाडीतून मला बाहेर पडावं वाटेना. मुलं खूप छोटी आणि भाषा निराळी, त्यामुळे गोष्ट सांगता येणार नव्हती, पण खेळले त्यांच्यासोबत.
व्यवस्थित सतरंज्या घालून गोलाकार बसलेली मुलं. आईनं काळजी घ्यावी, तसं वागणाऱ्या अंगणवाडी सेविका. प्रचंड उत्साही. एकीनं मला बाहेर नेऊन बांधलेले दोन संडास दाखवले. बाहेर एका मोठ्या ड्रममध्ये पाणी भरून ठेवलेलं आणि बाजूला एका मोडक्या तिवईवर हात घुण्यासाठी लाईफबॉय. वडी अर्धी संपलेली, ओली होती. खेरीज एक साधा, सुती टॉवेल. मुलांना इथं संडास वापरण्याची सवय लागते, पण घरीही पालकांना शौचालय बांधायला भाग पाडतात! – ती हसून म्हणाली. मुलांना बालवाडीप्रमाणे इथं गाणी, अक्षरओळख, माहिती, खेळ असं मनोरंजनातून शिक्षण दिलं जात होतं. केवळ अन्न पोटात ढकलण्यापुरती ही मुलं शाळेत येत नव्हती. ‘जेवणाचं काय?’ मी विचारलं. तिनं सातूच्या पिठाची छोटी पाकिटं दाखवली, ‘आज हे देणार’ म्हणाली. त्यात साखर देखील मिसळलेली होती. अंगणवाड्या – शाळांना अन्नधान्य पुरवण्याचं काम बचतगटांच्या बायका करत होत्या. त्यांच्या पिठाच्या स्वच्छ, सुंदर गिरण्यादेखील पाहिल्या. पाकिटांवर स्क्रीन प्रिंटींग करून गटाचं नाव छापलेलं दिसत होतं. ते काम मतिमंद मुलांची एक वेगळी शाळा आहे, तिथली मुलं करून देतात म्हणे. मग गावात धान्यबँका पाहिल्या.
सरकारी योजना लाख आहेत, राबवणारे अधिकारी थोडं डोकं वापरणारे, कल्पनाशक्ती असलेले प्रामाणिक वृत्तीचे असतील... तर गावं किती लख्ख निराळी दिसू लागतात, हे मी याची डोळा पाहत होते. इथला जिल्हाधिकारी एक मराठी तरुण होता... सचिन जाधव.
पगारवाढीसाठी आंदोलनं होतील, कोट्यवधींच्या रकमांचे प्रस्ताव सादर होतील, पगारवाढ देखील होईल – व्हावी नक्कीच. पण बाकीचं चित्र कधी बदलेल? ती जबाबदारी कोण स्वीकारणार?
(लेखात व्यक्त झालेली मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)
‘चालू वर्तमानकाळ’ सदरातील याआधीचे ब्लॉग –
![mahajan (2)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19172341/mahajan-2.jpg)
![mahajan (1)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19172406/mahajan-1.jpg)
![mahajan (3)](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19172419/mahajan-3.jpg)
![चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19172508/mahajan-5.jpg)
![चालू वर्तमानकाळ : 6. उद्ध्वस्त अंगणवाड्या](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/09/19172510/mahajan-6.jpg)
चालू वर्तमानकाळ (5) : अनेक ‘कुत्र्या’ आहेत या देशात...
चालू वर्तमानकाळ (4) : जन पळभर म्हणतील…
चालू वर्तमानकाळ (3) : आईचा घो आणि बापाची पत
चालू वर्तमानकाळ (२) – अब्रू : बाईची, गायीची आणि पृथ्वीची!
चालू वर्तमानकाळ (1) : स्वातंत्र्याचं सावळं प्रतिबिंब
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion