1 मार्च 2020 याच दिवशी, महाराष्ट्रात जो पहिला कोरोनाचा रुग्ण आढळून आला होता, ते कुटुंबिय मुंबई एअरपोर्टवरून पुणे येथे टॅक्सी करून आले होते. हे कुटुंब दुबईवरून मुंबईमध्ये परतलं आणि त्यांना 5 - 6 मार्च रोजी त्रास जाणवल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. 7 मार्च रोजी त्यांची चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यानंतर महाराष्ट्रात कोरोनाने घातलेला धुमाकूळ आणि त्याच्या रौद्र रूपाचे सर्वचजण साक्षीदार आहेत. कोरोनाची साथ महाराष्ट्रात येऊन वर्ष पूर्ण झालं मात्र कोरोनाची साथ आजही महाराष्ट्रात कायम आहे. कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा चढता आणि उतरता आलेख पहिला, मात्र त्या आलेखाचे सपाटीकरण अजून झालेलं नाही. त्यामुळे अजूनही राज्यात पहिलीच लाट आहे. 2020 डिसेंबर ते 2021 जानेवारी या काळात कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला यश मिळाले होते. मात्र फेब्रुवारी महिन्यात राज्यातील काही भागात कोरोनाबाधितांचे आकडे इतक्या मोठ्या प्रमाणात वाढले की काही भागात लॉकडाउन आणि रात्रीची संचारबंदी यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी पुन्हा करावी लागली. दरम्यान, आज 1 मार्चपासून 60 वर्षावरील आणि 45 वर्षावरील सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहे, ही जमेची बाजू. हा लसीकरणाचा दुसरा टप्पा कसोटीचा असणार असून किती नागरिक यामध्ये सहभागी होतात, यावर या मोहिमेचे यश अवलंबून असणार आहे. कोरोना साथीच्या वर्षभरात काहींनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले तर काहींना या आजाराने छळले. या वर्षभराच्या काळातून आपण काय शिकलो हे ज्याने त्याने आप-आपले ठरवायचे आहे.


गेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात ज्यावेळी झाली त्यावेळी कोरोनाचा विषाणू इतका काही हाहाकार माजवेल असे कुणाच्या मनी ध्यानी पण नसेल. ज्या पद्धतीने या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढली की, राज्यात काही दिवसांतच रुग्ण दाखल करण्यासाठी रुग्णालयाच्या खाटा कमी पडू लागल्या. विलगीकरण, अलगीकरण कक्ष आणि फील्ड हॉस्पिटल हे सर्व वैद्यकीय क्षेत्रातील नवीन प्रयोग सगळ्यांनी याच काळात पाहिले. रुग्णालयातील खाटाच्या कमतरतेबरोबर प्राणवायूच्या टंचाईच्या घटनाही त्याच ह्याच काळातील. अनेक कोरोना योद्धे याच काळात कर्तव्य बजावताना शहीद झाले. आरोग्य आणि प्रशासन यंत्रणा रात्र-दिवस या कामात जुंपली होती आणि आजही तितक्यात जोमाने काम करत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मेहनत, त्यांचे 8-12 तास पीपीई किटमधील काम करण्याची पद्धत आजही कायम आहे. काही विशिष्ठ यंत्रणेवर कामाचा असह्य असा ताण असतानाही अनेक फ्रंटलाइन वर्कर घर सोडून आपले काम इमाने इतबारे करतच आहे. त्यांच्या या कार्याला मदत म्ह्णून काही सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी या काळात सर्व सामान्यांसाठी मोठी मदत उभारली. याच काळात काही खासगी कंपन्यांनी मोठा निधी दिला.


आजही कोरोनाच्या विरोधातील लढाई संपलेली नाही. कोरोचा विषाणू नव्या रूपात येऊन हैदोस घालत आहे. वैद्यकीय शास्त्रानुसार, विषाणूचे जनुकीय बदल हे होत असतातच, त्याला घाबरण्याची गरज नाही मात्र सुरक्षिततेचे उपाय जे आखून दिले आहे. ते पाळल्यास कोरोनाच्या या आजरापासून दूर राहण्यात यश मिळते. बेंबीच्या देठापासून ओरडून, प्रेमाने, वेळप्रसंगी रागावून, करवाई करून सांगितले की, सुरक्षिततेचे नियम पाळा. मात्र आजही काही नागरिक हे नियम धाब्यावर बसवून आपले दैनंदिन व्यवहार करताना आढळून येत आहेत. सध्या कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा या साथीबाबत चिंता व्यक्त करत आहे. राज्यातील एकूणच सध्याची परिस्थिती पाहता कुणालाही लॉकडाऊन नकोय. या आजाराचा संसर्ग ज्या वेगात पसरत आहे तो थांबविण्याकरिता अधिक कडक निर्बंध भविष्यात राबविल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण गेली काही दिवस राज्यात रोज 8 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद केली जात आहे. डॉक्टरांनी रुग्णांना दिलेल्या उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मृत्यू दर कमी करण्यात आरोग्य यंत्रणेला चांगलेच यश मिळत आहे. मात्र जो संसर्ग वाढत आहे तो थांबविण्याकरिता राज्यातील नागरिकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे, त्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. गर्दी करणे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे या गोष्टी काटेकोरपणे पाळाव्या लागणार आहेत.


वैद्यकीय तज्ञांच्या मते लसीकरणामुळे कोरोनाच्या विरोधात संरक्षण मिळते, मात्र लसीकरणाच्या बाबतीत अनेकांच्या मनात आजही किंतु-परंतु आहेत. लसीकरणाच्या या दुसऱ्या टप्प्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची आज लस घेतली, त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारत बायोटेकची को-वॅक्सिन लस घेतली. देशात लसीकरणाचा दुसरा टप्पा आजपासून सुरु झाला आणि या टप्प्यातली पहिली लस पंतप्रधान मोदी यांनी घेतली. आज सकाळीच दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन मोदींनी लस घेतली. देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली ती 16 जानेवारीपासून. तेव्हापासून सातत्याने हा प्रश्न विचारला जात होता की, पंतप्रधान मोदी कधी लस घेणार? आज या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये आज सकाळी साडेसहाच्या सुमारास पंतप्रधान मोदींनी लस टोचून घेतली. यामुळे नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत आत्मविश्वास निर्माण होऊन या मोहिमेला आणखी बळ मिळेल.


BLOG | लसीकरणाचे सुलभीकरण हवे!


याप्रकरणी मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले की "सुरवातीच्या काळात जी हतबलता होती ती परिस्थिती आज नाही. आज आपल्याकडे या आजाराविरोधात लढण्यासाठी लस आली आहे. आपल्याकडे उपचारपद्धती विकसित झाली आहे. या आजाराबद्दल लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती निर्माण झाली आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काही तांत्रिक अडचणी दूर झाल्या तर नागरिक मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतील असा विश्वास आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे आता आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत आणि आणखी या सुविधांची गरज आहे, याची जाणीव आपल्याला आहे. त्यामुळे जर नागरिकांनी शासनाने आखून दिलेले सर्व नियम पाळले तर आपण नक्कीच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सक्षम झालो आहेत, अशी आजची परिस्थिती आहे. विशेष म्हणजे मृत्यू दर खाली आणण्यात आरोग्य यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे."


फेब्रुवारी 27, ला 'संसर्ग रोखणे : आव्हान' या शीर्षकाखाली सविस्तर लिखाण करण्यात आले होते. त्यामध्ये मार्च 2020 मध्ये पहिला कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात सापडला आणि त्यानंतर कोरोनाबाधितांची सुरुवात झाली आणि त्यानंतर रुग्णांची वाढ इतकी झपाट्याने झाली की, ती राज्यातील सगळ्याच जनतेने पाहिली आहे. 2021 च्या जानेवारी महिन्यापर्यंत या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य यंत्रणेला यश प्राप्त झाले होते. सध्याच्या घडीला वैद्यकीय पातळीवर कोरोनाच्या रुग्णांना उपचार देणे शक्य आहे. मात्र या या आजाराचा वाढता संसर्ग रोखणे हे राज्यातील प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान राहिले आहे. कारण फेब्रुवारी 2021 मध्ये शेवटच्या आठवड्यात ज्या वेगाने या आजराच्या संसर्गाचा आकडा वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. एक कोरोनाबाधित रुग्ण बरा होण्याकरिता सर्वसाधारण 14 दिवस लागतात. गेली तीन दिवस राज्यात रोज नव्याने 8 हजारांपेक्षा अधिक नवीन रुग्णांची नोंद होत आहे, जर ही वाढ अशीच होत राहिली तर भविष्यात अधिक धोके संभवतात. त्यामुळे या आजाराला न घाबरता, सतर्क राहून सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे काम आता नागरिकांना करावे लागणार आहे. राज्याची आरोग्य यंत्रणा रात्र-दिवस काम करत कोरोना बाधित रुग्णांना उपचार देत असून रोज हजारो रुग्ण बरे होऊन घरी जात आहे. मात्र त्याचवेळी रोज बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा अधिक प्रमाणात लक्षणीय स्वरूपात नवीन रुग्णांचे निदान होत आहे. हा प्रकार असाच चालू राहिला तर या आजारावर पायबंद घालण्याकरिता अजून किती काळ लागणार आहे, हे सांगणं सध्या तरी कठीण आहे.


इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ. अविनाश भोंडवे यांच्या मते, "वर्षभरानंतरही कोरोनाची साथ आपल्याकडे कायम आहे. रुग्णांना उपचार देण्यात डॉक्टरांना यश मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजाराची काही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन कोरोनाची चाचणी करून घ्यावी. विशेष म्हणजे ट्रेसिंग, ट्रॅकिंग आणि ट्रिटमेंट या त्रिसूत्रीचा वापर आपल्याला आजही मोठ्या प्रमाणात चालूच ठेवावा लागणार आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केले तर आपण लवकरच या संकटातून बाहेर येऊ असा मला विश्वास आहे."


कोरोनाच्या साथीला वर्ष पूर्ण होत असताना आपल्याकडे या आजाराच्या विरोधातील महत्त्वाचे शस्त्र म्हणजे लस प्राप्त झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण मोहिमेचा फायदा घेतला तर वैद्यकीय तज्ञांच्या मते, लवकरच आपल्याकडे हर्ड इम्युनिटी निर्माण होण्यास मदत होईल. प्रशासनाने विशेष करून आरोग्य यंत्रणेने जर लसीकरणाच्या नोंदणीकरणात सुलभता आणली तर नागरिक नोंदणी करून घेतील. कारण अनेक नागरिकांना नोंदणी करताना त्रास होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यासाठी जर काही मदत केंद्रे उभारता आली तर त्याचा प्रामुख्याने विचार केला गेला पाहिजे. दुसऱ्या टप्प्यात 27 कोटी नागरिकांचे लसीकरण अपेक्षित आहे, येत्या काळात नागरिक किती या मोहिमेला प्रतिसाद देतात ते येत्या काळात कळेलच. कोरोनाच्या या आरोग्य आणीबाणीला वर्ष पूर्ण होत असले तरी सुरक्षिततेचे नियम सगळयांना आणखी काही महिने पाळावे लागणार हे मात्र निश्चित आहे.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग :