चार दिवसाने देशातील लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपणार असून याला 68 दिवस पूर्ण होणार आहेत. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या 'मुंबई' शहराच्या तब्येतीवर अनेक जणांचं बारीक लक्ष आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसत असून मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, ही बाब लक्षात घेतली तर मुंबई महानगर विस्तारित क्षेत्र पाचव्या लॉकडाऊनसाठी पात्र ठरत आहे. लॉकडाऊन केल्यामुळे बऱ्याच प्रमाणात रुग्ण आटोक्यात ठेवण्यात यश मिळाल्याचे सगळ्यांनीच बघितले आहे. सध्याच्या आरोग्य व्यवस्थेवर येणारा ताण ध्यानात घेऊन शहरातील लॉकडाऊन शिथिल करणे उचित ठरणार नाही. 'पांगळ्या' मुंबईपेक्षा धडधाकट मुंबई सगळ्यांना अभिप्रेत आहे, त्याकरिता आणखी थोड्या कालावधीकरिता लॉकडाऊन वाढवून रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यावर भर दिला पाहिजे.


मुंबई सुरु होणे म्हणजे तिचा श्वास आणि मुंबईकरांची 'लाइफलाइन' लोकल सुरु होणे, रेल्वेच्या लोकल व्यतिरिक्त मुंबई अपूर्ण आहे. सध्याचं वातावरण पाहता लोकल सुरु करणे धोकादायक ठरू शकते. लॉकडाऊनच्या काळात दिवसागणिक हजारोच्या संख्येने शहरात वाढणारे रुग्ण ही बाब गंभीर आहे. कोविड-19, हा विषाणूचं असा आहे की त्यापासून होणाऱ्या संसर्गजन्य आजाराला असं तात्काळ थांबविणे मुंबई सारख्या शहराला अवघड आहे, मात्र अशक्य नाही, त्याकरिता आणखी थोडा काळ जावा लागेल. मुंबई शहराची जडणघडण इतर देशातील सर्वच शहरापेक्षा वेगळी आहे, हे सगळ्यांनाच मान्य करावे लागेल. देशातील श्रीमंत माणसाच्या टॉवर सोबत आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या या मुंबईची इमेज ही 'लार्जर दॅन लाइफ' आहे.


या शहरातून काही दिवसात लाखोंच्या संख्येने मजूर परराज्यात आपल्या गावी गेले आहे. अजून काही दिवस परप्रांतातील मजूर आपल्या गावी जाण्याचा सिलसिला चालू राहील, यामुळे नक्कीच मुंबईवरील ताण हलका होण्यास मदत होईल. येत्या काही दिवसात रुग्ण संख्येचा आलेख कशा पद्धतीने चढ-उतार करतो तेही कळेलच. लॉकडाऊनमुळे घनदाट लोकवस्ती असणाऱ्या मुंबई शहरांला रुग्ण संख्या आटोक्यात ठेवण्यात नक्कीच फायदा झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेने कोरोनाविरुद्ध चांगलीच खिंड लढवली आहे, परिस्थिती इतकी बिकट आहे की, अनेक वेळा बेड्स मिळविण्याकरिता रुग्णाचे नातेवाईक रात्र-दिवस धावपळ करीत आहेत. मात्र रुग्णांची संख्याच एवढी मोठी आहे की सध्याच्या आरोग्य व्यवस्था अपुरी पडत आहे.


वाढत्या रुग्णांची सोय करण्याकरिता महापालिकेने विशेष व्यवस्था केली आहे. येत्या काळात रुग्ण संख्या वाढली तरी आवश्यक बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे, सध्या 75 हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांसह विविध ठिकाणी तात्पुरते रुग्णालय उभारण्यात येत आहे. जूनच्या मध्यापर्यंत बेड्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविणार येणार आहे. येत्या काळात आरोग्य यंत्रणा आणखी जोरदार तयारी करणार असून 'कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर' भर देणार आहे. याकरिता लक्षणविरहित लोकांच्या तपासण्या सुद्धा पूर्वीप्रमाणे केल्या जाणार आहे. शासनाने जर पाचवा लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला तर तो अधिक कडकपणे राबविण्यावर भर दिला पाहिजे, जेणेकरून रुग्ण संख्या आटोक्यात येण्यास मदत होईल. मृत्यूदराचे प्रमाण पूर्वीपेक्षा चांगले असून अजून ते खाली कसे आणता येईल यावर महापालिकेचा आरोग्य विभाग काम करीत आहे.


या सगळया तयारी महापालिका करत असल्या तरी या सर्व आरोग्याच्या यंत्रणा व्यवस्था संभाळण्याकरिता लागणारं कुशल मनुष्यबळ उभारणं महापालिकेसमोर मोठं आव्हान आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स हवे आहेत म्हणून जाहिराती दिल्या जात आहे. पण अशा अचानकपणे उद्भवलेल्या परिस्थितीत असे प्रश्न निर्माण होणे खूप स्वाभाविक आहे. या अशा समस्येवर मात करण्याकरिता राज्याच्या ज्या भागात डॉक्टर अतिरिक्त आहे किंवा जेथे कोरोनाची रुग्ण संख्या कमी आहे त्या ठिकाणावरील डॉक्टरांनी मुंबई शहरात सेवा दिली पाहिजे. अशा कठीण काळात मुंबईला आधार देण्यासाठी सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. डॉक्टरांची शिखर संस्था असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने पुढाकार घेऊन कशा पद्धतीने महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे.


विशेष म्हणजे गेल्या दोन महिन्यांपासून अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी दिवस रात्र काम करून जनतेला सेवा देण्याचं काम करीत आहे. यामध्ये विशेष म्हणजे आरोग्य सेवेतील कर्माचारी आणि पोलीस दलातील कर्मचारी याना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण भरपूर आहे. राज्यात आता पर्यंत 1 हजार 964 पोलिसांना याची लागण झाली असून यामध्ये 233 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यावरुन कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव सगळ्यांनीच लक्षात घेतला पाहिजे. या अशा काळात नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे, कितीही कंटाळा आला असला तरी आरोग्य पुढे सगळ्या गोष्टी या गौण आहेत. प्रत्येकानेच स्वतःची काळजी घेतली पाहिजे. राज्यात काही सगळंच वाईट घडत नाही आहे, आतापर्यंत 16 हजार 954 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरीसुद्धा गेले आहेत.


अनेकांना लॉकडाऊन म्हणजे शिक्षा वाटत असली किंवा नोकरीवर जाणं महत्वाचं वाटत असलं तरी याबाबतीत शासन सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच निर्णय घेत असते. सध्याच्या परिस्थितीत मुंबई शहर हे संपूर्ण देशामधील अपवादात्मक शहर आहे, सगळ्यात जास्त कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू बघणारं हे शहर आहे . त्यामुळे इतर शहराचे नियम मुंबईला लागू होत नाहीत. चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील काही भागात नक्कीच अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्याकरिता प्रयत्न केले जाऊ शकतात. मात्र सध्याच्या घडीला मुंबई आणि पुणे या शहरातील सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवणे ही काळाची गरज आहे.


प्रशासनाला अपेक्षित अशी कोरोनाची साथ अजून आटोक्यात आली नसल्यामुळे सरसकट लॉकडाऊन उठविण्याचा विचार करण्यापेक्षा राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाबाधितांच प्रमाण कमी आहे किंवा नियंत्रित आहे अशा ठिकाणी लॉकडाउन शिथिल करून उद्योधंद्याना चालना देणे योग्य आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोनाचा युद्ध अजून जोरदारपणे सुरु आहे त्याठिकाणी काही काळ लॉकडाऊन ठेवणे समाजहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. आणखी काही दिवस मुंबई शहरातील नागरिकांना सक्तीची रजा घेणे ही काळाची गरज असून लवकरच या संकटावर मात करून हे शहरही इतर शहराप्रमाणे कोरोना मुक्तीच्या मार्गावर असेल यामध्ये काही दुमत नाही.


संतोष आंधळे यांचे अन्य ब्लॉग