एक्स्प्लोर

BLOG : शरद पवारांचे धक्कातंत्र 

BLOG : साल होतं 1962, बारामती जवळच्या काटेवाडीसारख्या खेड्यातून आलेला 19 वर्षांचा तरुण पुण्याच्या डेक्कनसारख्या उच्चभ्रू भागातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी प्रतिनिधीपदाच्या निवडणुकीसाठी उभा होता. ग्रामीण भागातील हा तरुण शहरी विद्यार्थ्यांसमोर काय टिकणार असा विचार त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी करत होते. विशेष म्हणजे पुढे पवारांची सावली म्हणून ओळखले गेलेले त्यांचे मित्र विठ्ठल मणियार हेदेखील त्यावेळी पवारांच्या विरोधी गटात होते.  जिमखाना प्रतिनिधी असलेल्या कर्नल संभाजी पाटील यांचं मत त्यावेळी निर्णायक ठरलं. त्यासाठी पुण्यातील वाडिया कॉलेजमधून कर्नल संभाजी पाटलांना पवारांचे मित्र दुचाकीवर बसवून मतदान करायला घेऊन गेले. एक एक मत गोळा करून 19 वर्षांच्या शरद पवारांनी ती निवडणूक जिंकून दाखवली.  पुण्यातील विद्यार्थी चळवळीला शरद पवारांनी दिलेला हा धक्का होता. 

पुढे लगेच शरद पवार युवक काँग्रेसमध्ये दाखल झाले. यशवंतराव चव्हाण यांच्या संपर्कात ते आले आणि काँग्रेसचे काम करू लागले. शरद पवार यांच्या आई शारदाबाई पवार आणि मोठे बंधू वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षात होते. संयुक्त महाराष्ट्राचा लढा जोमात असताना शेकाप पक्षाकडून वसंतराव पवार यांना बारामती लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र तोपर्यंत युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झालेल्या शरद पवारांनी सख्ख्या भावाच्या विरोधात प्रचार करण्याचा निर्णय घेतला. पुढे वसंतराव पवार यांचा या निवडणुकीत पराभव झाला. 

युवक काँग्रेसमधील त्यांच्या या कामाची दखल यशवंतराव चव्हाणांनी घेतली आणि अवघ्या 27 वर्षांच्या शरद पवारांना 1967 साली बारामती विधानसभेची उमेदवारी द्यायचं ठरवलं. मात्र या निर्णयाला बारामतीतील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला आणि 11 विरुद्ध 1 अशा फरकाने शरद पवारांना उमेदवारी देऊ नये असा ठराव प्रदेश काँग्रेसला पाठवण्यात आला. पण यशवंतरावांच्या आग्रहाखातर शरद पवारांना उमेदवारी देण्यात आली. बारामती तालुक्यातील काँग्रेसचे त्याकाळातील सर्व दिग्गज नेते विरोधात असतांनाही शरद पवारांनी ती निवडणूक जिंकून दाखवली. बारामतीतील प्रस्थापित नेतृत्वाला धक्का देऊन शरद [पवारांचा राज्याच्या राजकारणातील हा प्रवेश होता. 

आमदार बनून दोन वर्ष झालेली असताना  वयाच्या 29 व्या वर्षी वसंतराव नाईकांच्या मंत्रिमंडळात  शरद पवारांचा उपमंत्री म्हणून प्रवेश झाला. पण महत्वाकांक्षी शरद पवारांना राज्याचं मुख्यमंत्रीपद खुणावत होतं. ते देखील त्यांनी गाठलं. 1978 साली वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून शरद पवारांनी विरोधी पक्षांच्या मदतीनं मुख्यमंत्रीपद मिळवलं. शरद पवारांच्या साठ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील ही सर्वात वादग्रस्त घटना मानली जाते. त्याबद्दल शरद पवारांनी अनेकदा स्पष्टीकरण देऊन झालंय. मात्र शरद पवारांवर होणारा खंजिराचा आरोप त्यांच्या विरोधकांकडून अजूनही केला जातो. वयाच्या 37व्या वर्षी मुख्यमंत्री बनून शरद पवारांनी त्यांचे राजकीय मार्गदर्शक असलेल्या वसंतदादांनाच नव्हे तर राजकीय गुरु असलेल्या यशवंतराव चव्हाणांनाही दिलेला हा धक्का होता. त्यासाठी शरद पवारांनी चंद्रशेखर यांची मदत घेतली. चंद्रशेखर यांच्या सांगण्यावरून त्यावेळचा राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षाची भूमिका बजावणारा समाजवादी पक्ष पवारांना बाहेरून पाठिंबा द्यायला तयार झाला . 
 
पुढे 1980 साली पुन्हा पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींनी शरद पवारांचं सरकार बरखास्त केलं. त्यानंतर पुढची पाच वर्ष विरोधात बसावं लागलेल्या शरद पवारांनी 1985 ला राजीव गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला. त्यानंतरही शरद पवारांचं धक्कातंत्र कायम राहील. पुढे आणखी तीनवेळा याच धक्कातंत्राचा वापर करत शरद पवारांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं. पण राजकारणातील या यशाबरोबरच  त्यांच्या राजकारणाला बेभरवशीपणाचं लेबल चिकटलं. पवारांनी जाणीवपूर्वक त्यांच्याबद्दल अंदाज बांधणं त्यांच्या विरोधकांनाच नव्हे तर त्यांच्या मित्रांनाही शक्य होणार नाही याची काळजी घेतली. त्यामुळं संशयाच्या धुक्यातून जणारी पवारांच्या राजकारणाची वाट सगळ्यांनाच चकवा देणारी ठरली.
 
सन 1999 साली सोनिया गांधींच्या विदेशी मुळाच्या मुद्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणं हा पवारांनी दिलेला पुढचा धक्का होता. मात्र त्या धक्क्यातून सावरण्याच्या आतच त्यांनी काँग्रेसला राज्यात राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्यास भाग पाडलं आणि काही दिवसांपूर्वीच जन्म झालेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 1999 साली राज्याच्या राजकारणात सत्तेत आला. पुढे राष्ट्रवादीच्या पंधरा वर्षांच्या सत्ताकाळात शरद पवारांनी लहान मोठे धक्के त्यांच्या विरोधकांना आणि मित्र पक्षांनाही दिले . 

2014 ला राज्याच्या सत्तेतून पायउतार होत असताना आणि पक्ष चौथ्या क्रमांकावर फेकला गेलेला असताना शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाजप सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा करून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला दिलेला पुढचा धक्का होता. पवारांच्या या खेळीने भाजप आणि शिवसेनेतील कटुता आणखी वाढीस लागली. पुढे हे दोन्ही पक्ष सत्तेत येऊनही एकमेकांबद्दलचा तिरस्कार वाढत गेला आणि त्याचा परिणाम 2019 ला निवडणुकीनंतर भाजप-शिवसेना वेगळे होण्यामध्ये झाला . 

महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याआधी अचानकपणे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं अडीच दिवसांचं सरकार अस्तित्वात आलं. सुरुवातीला शरद पवारांच्या नेतृत्वाला अजित पवारांनी दिलेला हा धक्का मानला गेला. पण पुढं राष्ट्रवादीचे सर्व आमदार शरद पवारांच्या बाजूने एकवटले आणि अडीच दिवसांचं ते सरकार कोसळलं.  शरद पवारांनी दिलेला हा धक्का देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तर होताच पण अजित पवरांसाठीही होता. त्यातूनच पुढे पवारांनी आपल्याला फसवल्याचा आरोप फडणवीसांनी केला तर अजित पवार त्याबद्दल अजूनही जाहीरपणे बोलू शकत नाहीत. पवारांच्या त्या खेळीने राष्ट्रपती राजवट तर उठलीच पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस कधीही एकत्र येऊ शकतात ही चर्चा सुरु राहिली. राष्ट्रवादीवर पकड कायम ठेवण्यासाठी शरद पवारांनी पुतण्याला दिलेला हा धक्का होता.  

2019 ला महाविकास आघाडीची स्थापना करून शरद पवारांनी विरोधकांना दिलेला हा पुढचा धक्का होता. अडचणीत सापडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी एकहाती लढा देऊन सुटका केली होती. पुढची तीन वर्ष राज्यातील सत्तेचा सर्वाधिक फायदा उठवण्याचा राष्ट्रवादीने प्रयत्न केला. पण अनिल देशमुख, नवाब मलिक यासारखे दिग्गज मंत्री याच काळात तुरुंगात देखील गेले. तर  इतर अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला. त्यातून पक्षातील एक मोठा गट भाजपसोबत आघाडी करण्याची मागणी करू लागला . 

भाजपसोबत आघाडी करण्याचा पक्षांतर्गत दबाव असलेल्या शरद पवारांना अशी आघाडी करणं म्हणजे स्वतःच राजकीय अस्तित्व स्वतः नाहीस करणं आहे याची पुरेपूर जाणीव आहे. पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन शरद पवारांनी हा शरद पवारांनी हा दबाव झुगारून देण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादीत त्यांना हवं ते नेतृत्व स्थापित करण्याचा आणि वेगळी भूमिका घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे पंख छाटण्याचाही त्यांचा उद्देश आहे. पण या वयात धक्कातंत्राचा वापर करणारे शरद पवार त्यांना हवं ते साध्य करू शकणार का आणि यामध्ये कोणा-कोणाची दांडी गुल होणार हे समजण्यास काही काळ जावा लागणार आहे. 

धक्कातंत्र हा शरद पवारांच्या राजकारणाचा स्थायीभाव राहिलाय. सहा दशकांच्या राजकीय वाटचालीत शरद पवारांनी या धक्कातंत्राचा वापर करत त्यांना हवं ते बहुतेकवेळा साध्य केलंय. अपवाद फक्त देशाच्या पंतप्रधान पदाचा. आता राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्षपदाचा अचानक राजीनामा देऊन शरद पवारांनी पुन्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केलाय. अर्थात या वयात त्यांना हवं ते पवार साध्य करू शकतील का आणि त्यातून कोणतं नवं राजकारण आकारास येतंय याकडं सगळ्यांच्या नजरा लागल्यात. साठ वर्षांनंतर देखील पवारांचं धक्कातंत्र असं काम करतंय . 

अधिक पाहा..

ओपिनियन

Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget