एक्स्प्लोर

BLOG : 'हम क्यों देखेंगे? 'द कश्मीर फाइल्स'

काश्मीर...
जेव्हापासून कळू लागलं तेव्हापासून काश्मीर ही भारताच्या शीर्ष भागी असलेली भळभळती जखम आहे, हे अनेकांकडून ऐकलं, त्याबद्दल वाचलं, अनेकांनी ते पटवून देण्याचा प्रयत्नही केला. एखादी जखम इलाज न करता तशीच ठेऊन दिली की ती चिघळत जाते, आणि काश्मीर नावाच्या जखमेबाबतही काहीसं असच झालं. 
काश्मीर, त्याचं विलीनीकरण आणि त्याभोवतीच राजकारण हा विषय गेली अनेक वर्ष भारताच्या कानाकोपऱ्यात चघळला गेलाय, आणि वेगवेगळ्या हेतूंच्या साध्यतेसाठी वेगवेगळ्या लोकांकडून वापरलाही गेला आहे.

एकीकडे काश्मीर ही एक जखम आहे म्हणत असताना तेच काश्मीर पृथ्वीवरचं नंदनवन आहे, स्वर्ग आहे, सौंदर्य आणि निसर्गाच्या चमत्कृतींचा भव्य असा देखावा आहे हे ही ऐकत मी मोठी झाले. त्यामुळे पहिल्यापासूनच काश्मीर बद्दल एक अगम्य गूढ आणि अनामिक ओढ अशा दोन्ही भावना मनात होत्या. 

काश्मीरच्या हेलावून टाकणाऱ्या, आणि आकर्षित करण्याऱ्या कहाण्या ऐकत असतानाच अचानक एक दिवस घरात काश्मिरी पंडितांचा विषय निघाला, साधारण सातवी आठवी मध्ये असेन मी. बाबाने बोलता बोलता या विषयाची निसुटती ओळख करून दिली, पण मला आजही आठवतंय की, त्या रात्री मी शांत झोपू शकले नव्हते. हिंदू - मुस्लिम वादाचा  दाह काय आहे हे मला तेव्हा नवीन नव्हतं, पण त्यादिवशी मी आई आणि बाबाकडून जे ऐकलं ते भेसूर होतं, भयानक होतं, मनाचा तळ पार ढवळून काढणारं होतं. पंडितांवर एवढे अत्याचार का झाले त्याची दुसरी बाजू ही कालांतराने वाचनामधून, चर्चांमधून समोर येत होती. स्थानिक काश्मिरी मुस्लिमांना डावललं जात होतं म्हणून त्यांच्या मनात पंडितांविरुद्ध रोष होता, हे त्या जखमेवर तात्पुरती मलमपट्टी करणारं कारण अनेकदा समोर आलं. पण पंडितांवर झालेल्या अत्याचारांच्या जखमांचे व्रण एवढे खोल आहेत, त्या वेदना इतक्या असह्य आहेत की ही मलमपट्टी किती तोकडी आहे हे भारतात राहणाऱ्या प्रत्येकाला माहितेय. पंडितांना हुसकावून लावण्यामागे काय अजेंडा होता हे आता ओपन सिक्रेट आहे. 

काश्मीरमध्ये जे झालं ते एका रात्रीत झालं नव्हतं, त्याची बीजं 5-6 वर्ष आधीपासून पेरली जात होती. काश्मिरच्या शांततेला चूड लावण्याचे प्रयत्न खूप आधीपासून सुरू होते, कुठे बॉम्बस्फोट, कुठे, दंगली, कुठे हत्या, कुठे बलात्कार. पण तेव्हाचं केंद्र शासन आणि राज्य शासन हे या ज्वलंत प्रश्नाबाबत काश्मिर मधल्या बर्फाइतकंच थंड होतं. देशातल्या इतर कोणत्याही राज्याने अनुभवली नसेल इतके वेळा जम्मू काश्मिर राज्याने राष्ट्रपती राजवट अनुभवली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते, पण राष्ट्रपती राजवट लागू असतानाही काश्मीरमध्ये मात्र सर्रास कत्तली केल्या जात होत्या. सुरुवातीच्या काळात काश्मिरला आणि काश्मिरच्या समस्यांना कधी भारताची समस्या मानलं गेलच नाही, आणि त्यानंतर काश्मिर हीच भारताच्या डोक्यावरची एक मोठी समस्या झाली. यात आणखी एक मुद्दा जाणवला की ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल ही अशीच अनास्था होती, पण सुदैवाने बऱ्यापैकी लवकर जाग आली... अर्थात तिथे ही टांगती तलवार डोक्यावर आहेच, कारण काश्मिर जवळ पाकिस्तान नावाचा साप आहे आणि ईशान्येजवळ चीन नावाचा अजस्त्र आणि कधीही भूक न संपणारा ड्रॅगन. 

हे सगळं लिहिण्यामागचं कारण मी वेगळं सांगण्याची गरज नाही, कारण फेसबुक वर असणाऱ्या प्रत्येकाने 'द कश्मीर फाइल्स' या चित्रपटाबद्दल दिवसाला सरासरी 3 पोस्ट तर नक्की वाचल्या असतील. खरंतर विवेक रंजन अग्निहोत्रीचा बुद्धा इन अ ट्रॅफिक जॅम आणि द ताश्कंत फाईल्स बघितल्यानंतर बॉलिवूडच्या चौकटी लांघणारा हा दिग्दर्शक आहे, आणि दिग्दर्शकाच्याही पलीकडे त्याचा काहीतरी वेगळा दृष्टिकोन आहे, सिनेमा हे माध्यम हाताळण्याची त्याची हातोटी वेगळी आहे याची खात्री पटली होती आणि त्यामुळेच कश्मीर फाइल्स या चित्रपटाबद्दल कुतूहल होतं. वर्षानुवर्ष कोणत्या ना कोणत्या कारणमुळे वादात असलेल्या या विषयाला कोणीतरी हात घालतंय याचंच आश्चर्य  होतं आणि कुतूहलासुद्धा. सिनेमाचा ट्रेलर पाहिला आणि मी स्वतः ला विचारलं की सिनेमात जे दाखवलं गेलंय, ते पाहण्याची हिंमत तुझ्यात आहे का? ( ओटीटी मुळे जगभरातला काँटेट ओपन आहे. गेम ऑफ थ्रोन्स, स्क्विड गेम यासारख्या वेब सिरीज बघितल्यामुळे violence बघायला डोळे सरावलेले आहेत, पण तरीही हा प्रश्न पडला, कारण जे आपण बघणार आहोत ते वास्तव आहे, वास्तवात घडलेलं आहे, आपल्या माणसांना आपल्याच देशात मान खाली घालून हे सगळं सगळं सहन करावं लागलं आहे, जेव्हा शासन, प्रशासन, माध्यमं, आणि समाज या सगळ्यांनी या प्रश्नापासून मान फिरवून घेतलेली होती.) 

घरात बंडखोर मुलाने, दुसऱ्या मुलाकडे असलेल्या एखाद्या गोष्टीसाठी हट्ट केला, अकांडतांडव केलं, घरातल्या चार दोन गोष्टींची तोडफोड केली की आई बाबा त्याला गप्प करण्यासाठी त्याला जे हवं ते दुसऱ्या मुलाकडून काढून घेऊन देतात, तसच काहीसं राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काश्मीर मधल्या पंडित आणि फुटिरतावादी लोकांसोबत केलं. परिणामी बंडखोर मूल अधिक बंडखोर होतं आणि दुसरं मूल दुबळ होतं. आपणही प्रतिकार करू शकतो याची जाणीवच त्या दुसऱ्या मुलाला राहत नाही. 'अन्याय काश्मिरी पंडितांवरही झाले, पण त्यांनी कधीच शस्त्र का उचलली नाहीत?' या प्रश्नाचं हे एक उत्तर असू शकतं

हिंमत केली आणि हा सिनेमा बघायला गेले. खिळवून ठेवणारे सिनेमा अनेक पाहिले, हा सिनेमा तुम्हाला थिजवून टाकतो आणि डोळ्यातल्या पाण्याने भिजवून ही टाकतो. पुष्करनाथ पंडित त्यांचा मुलगा, त्यांची सून, दोन नातू, आणि त्यांचे चार मित्र ( ज्यातला एक पोलिस अधिकारी आहे, एक आयएएस अधिकारी आहे, एक माध्यम प्रतिनिधी आहे आणि एक डॉक्टर आहे) यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो. 
एक हसतं खेळतं कुटुंब राक्षसी महत्वाकांक्षेच्या कसं बळी पडतं आणि त्या काळात पोलीस, प्रशासन, माध्यमं यांची भूमिका दाखवणारा हा सिनेमा. 

पहिल्या दोन मिनिटात हा सिनेमा तुमची पकड घेतो. 1990 सालात काश्मीरच्या गल्ली बोळात आझादीचे नारे लागत होते, रलीव गलीव या चलीव या घोषणांनी काश्मीरला कुशीत घेऊन उभा असलेला स्तब्ध हिमालय विचलित होत होता. द्वेषाची आग इतकी पेटली होती की जानेवारी महिन्याच्या गोठवणाऱ्या थंडीतही तिची धग जाणवत होती, आणि त्या आगीत होरपळत होते काश्मिरी पंडित. त्यांचा एकच प्रश्न होता, आमच्या गेल्या कित्येक पिढ्या इथेच जन्मल्या, वाढल्या, आणि याच मातीत एकरूप झाल्या, तर मग आमची भूमी आम्ही का सोडायची? आणि आम्ही जायचं कुठे? पण या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. कदाचित आजही नाही. 1990 साली भारतात झालेला नरसंहार पडद्यावर यायला तब्बल 32 वर्ष लागली. हे सगळं पाहिलेली एक पिढी कदाचित आज हयात ही नसेल. दुसऱ्या महायुध्दात यहुदी लोकांनी केलेलं ज्यू लोकांचं शीरकाण किती भयानक होतं यावर आपण तासन् तास बोलू शकतो, पण 1990 साली आपल्याच देशात किती मोठा नरसंहार झाला हे किती लोकांना माहीत असेल माहीत नाही. कारण नोंद ठेवण्यासाठी त्याची नोंद कितपत घेतली गेली हाच एक मोठा प्रश्न आहे. कारण सुरुवातीला आम्ही आमच्याच लोकांना दुर्लक्षित केलं आणि नंतर त्यांना अगदी सहज विसरून गेलो. या सगळ्याची नोंद होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा सिनेमा गरजेचा आहे.

अशा खूप कमी भूमिका असतात की ज्या पडद्यावर बघताना केवळ हाच अभिनेता पेलवू शकतो असं वाटतं. अनुपम खेर हे स्वतः काश्मिरी पंडित आहेत. 1985 सालीच ते शिमल्याला शिफ्ट झाले असेल तरी त्यांच्या नातेवाईकांनी ती आग पहिली आहे, अनुभवली आहे. आणि त्यामुळे पुष्करनाथ पंडित ही भूमिका साकारण्याचं सामर्थ्य अनुपम खेर यांच्याशिवाय इतर कोणाकडे ही नाही. एरवी हिंदी सिनेमांमध्ये विनोद निर्मिती करण्यासाठी येडाचाला करणाऱ्या अनुपम खेर यांच्या अभिनयाची ताकद मी A Wednesday या सिनेमात पहिल्यांदा पहिली आणि त्यानंतर आता कश्मीर फाइल्स मधला त्यांचा अभिनय वर्णना पलीकडचा आहे. त्यांच्या डोळ्यातली असहायता, अगतिकता, अस्वस्थता आपल्याला अंतरबाह्य हलवते. ट्रान्झिट कॅम्पच्या बाहेर पार्लेजीचं बिस्कीट चाटणारा  एक असहाय्य म्हातारा, आपल्याच जमिनीवर आश्रीतासारखा राहणार काश्मिरी पंडित अनुपम खेर यांनी ज्या ताकदीने साकारला आहे त्याला तोड नाही. एक सिनेरसिक म्हणून आणि एक माणूस म्हणून माझ्या मनावर तो क्षण कायमचा कोरला गेलाय. याच प्रसंगात मागे सुरू असणारं आणि क्षणाक्षणाने आर्त होत जाणारं काश्मिरी लोकगीत त्या प्रसंगाची उंची कैक पटीने वाढवणारं आहे. 

आजवर आझादी हा शब्द ऐकल्यावर अनेकदा स्फुरण चढलं आहे. पण यावेळी पहिल्यांदा आझादीचे नारे ऐकताना शिसारी आली, घृणा वाटली. आणि ही भावना निर्माण करण्यात सिनेमा आणि सिनेमाचा दिग्दर्शक यशस्वी झालाय.

या सिनेमाच्या निमित्ताने हिंदी सिनेसृष्टीने मराठी माणसाच्या अभिनयाची ताकद पुन्हा एकदा अनुभवली असेल, चिन्मय मांडलेकरच्या रूपाने. JKLF (जम्मू काश्मिर लिबरल फ्रंट) च्या बिट्टा या फुटीरतावादी नेत्याची भूमिका त्याने ज्या पद्धतीने साकारली आहे की त्याच्या रूपाने खलनायक म्हणून एक नवा आणि तगडा चेहरा मिळालाय. 'सांगितलं गेलं असतं तर मी माझ्या भाऊ आणि आईलाही मारलं असतं' हे तो ज्या थंडपणे सांगतो, त्याच्या डोळ्यातला तो थंडपणा आपल्याला गोठवून टाकणारा आहे. आपल्याला इतकं गोठवण्याची क्षमता कदाचित काश्मिरमधल्या बर्फात ही नसेल. 

कृष्णा आणि बिट्टा या दोघांमधला एक संवाद आहे. जिथे बिट्टा नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल बोलतो. ते किती चांगले होते हे सांगतो. पण त्याचवेळी तो म्हणतो की 'आपके अभी के वजीर -ए- आलीया चाहते है की लोग उनसे डरे.'  त्यावेळी सिनेमागृहातून दोन तीन वेळा आवाज आला 'सही है' पण आपण हा ही विचार करायला हवा की हे वाक्य सिनेमाचा खलनायक म्हणतोय ज्याला काश्मिर भारतापासून तोडायचं आहे. आणि जर तो हे म्हणत असेल तर मग 'ये डर जरुरी है' असंही वाटतं.

काश्मिरी भाषा, काश्मिरी गाणी यांच्या सुयोग्य वापरामुळे आपण प्रेक्षक म्हणून त्या सिनेमाशी आणि कथेशी अधिक एकरूप होतो. समस्या मांडत असतानाही काश्मिरी खाद्यसंस्कृती आणि लोकसंस्कृती, वेशभूषा याचं ओझरतं दर्शन आपल्याला होत राहतं. आणि धुमसणारा असला तरी काश्मिर मधला नेत्रसुखद बर्फ आजही काश्मिर कडे मन ओढून घेतो. 

चित्रपटाचा प्रवाह थोडा वेडावाकडा असला तरी सिनेमाची ती गरज आहे नाहीतर आपण तो सिनेमा पचवू शकणार नाही. सिनेमाचे संवाद आणखी प्रभावी हवे होते असं वाटतं. परिस्थितीची दाहकता जेवढी दृष्यांमधून समोर येते, तेवढीच ती जर संवादांमधून अधोरेखित झाली असती तर परिणामकारकता वाढली असती असं वाटतं. उदाहरण घ्यायचं झालं तर सिनेमा मध्ये जेनोसाईड हा शब्द किमान ७ वेळा वापरला गेला आहे, पण सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला जेनोसाईड पेक्षा नरसंहार हा शब्द जास्त जवळचा वाटतो आणि जी भीषणता नरसंहार हा शब्द दाखवतो ती जेनोसाईड हा शब्द तितक्या प्रमाणात दाखवत नाही. 

त्यासोबत दर्शन कुमारची (पुष्करनाथ यांचा छोटा नातू) संवाद फेक आणखी स्पष्ट असायला हवी होती असं जाणवतं. आणि अर्थात जरी संपूर्ण सिनेमा तो संभ्रमावस्थेत असला तरी जिथे त्याला सगळं समजलंय तिथे त्याची संवाद आणि अभिनय दोहोंवरची पकड अधिक घट्ट असती तर शेवटचा मोनोलॉग अजरामर झाला असता.

बाकी सिनेमा त्या भोवतीच राजकारण, प्रपोगंडाचे आरोप हे सगळं आहेच. पण सिनेमा हे माध्यम या आधी सुद्धा अनेकदा प्रपोगंडा राबवण्यासाठी वापरलं गेलच आहे की. निखळ मनोरंजन हे सिनेमाच्या व्याख्येतून काही दिवसांनी हद्दपार होईल. जर तुम्ही पिके पाहू शकता, हैदर पाहू शकता, मुल्क पाहू शकता गेला बाजार जोधा अकबर पाहू शकत असाल आणि जर तुम्ही स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवत असाल तर द काश्मिर फाईल्स या सिनेमाला आणि तो बघण्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही.

370 कलम रद्द करून आत्ताच्या सरकारने काश्मिरी पंडितांच्या वेदेनेवर काहीशी फुंकर घातली ही असेल. पण आता त्याचा कायमचा इलाज होणं गरजेचं आहे. आणि तो इलाज काय आहे या प्रश्नाचं उत्तर सरकार शोधेल तेव्हा शोधेल पण आपल्याला मात्र या सिनेमाने ते उत्तर दिलेलं आहे.

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं

व्हिडीओ

Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune :  भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Embed widget