एक्स्प्लोर

BLOG : एका जिंदादिल शायराची अंतिम विदाई!

BLOG : आज बशीर बद्र गेले. सकाळीच त्यांचा इंतकाल झाला. बशीर सरांना त्यांचा ख़ुदा आता नक्कीच भेटला असेल.. 
 
विख्यात शायर, कवी बशीर बद्र आजारी असल्याचं ऐकून वाचून होतो. मध्यंतरी काही महिन्यांपूर्वीच काही नतद्रष्ट लोकांनी त्यांच्या निधनाची खोटी बातमी व्हायरल केली होती, वास्तवात मागील काही वर्षे ते गंभीर आजारी होते. 

काही दिवसापूर्वी त्यांचा एक व्हिडीओ पाहण्यात आला होता, ज्यात बद्र सरांच्या पत्नी राहत बद्र, त्यांची शुश्रूषा करताना दिसतात, बशीर सरांची यारदाश्त चांगली राहावी म्हणून त्यांच्या शेरो शायरीबद्दल बोलताना दिसतात, बद्र सरांना डिमेन्शिया आणि अल्झायमरने ग्रासले होते. 

त्यांचा भूतकाळ ते हळूहळू विसरत गेले, त्यांच्या माणसांची त्यांना ओळख लागेनाशी झाली होती. त्यांचं स्वतःचं अस्तित्वही ते काही काळ विसरत चालले होते. त्यांचा जीव की प्राण असणारी शायरीदेखील त्यांच्या स्मरणनोंदीतून लुप्त होईल की काय असे वाटत होते. 

ते ब्लँक झाले होते. उरली होती केवळ, त्यांची मंद गतीतली धडधडती नब्ज! 

बशीर बद्र सरांच्या प्रकृतीच्या घसरणीचा वेग केवळ त्यांच्या शायरीमुळेच कमी होता, कारण त्यांच्या पत्नी राहतजी, रोज त्यांच्याशी त्यांच्या शायरीविषयी बोलत असत. 

काही शेर त्या सुनावत असत आणि आपल्या लाडक्या पतीने पुढचा शेर तोडक्या मोडक्या अल्फाजमध्ये फर्मावा म्हणून विनवणी करत. राहत भाभी कधी कधी मतला सांगत आणि पतीला पुढच्या पंक्ती सांगण्यासाठी हट्ट करत. 

मग बद्र सर, त्यांच्या आलम तनहाईच्या दुनियेतून बाहेर येण्याची धडपड करत. इकडे तिकडे पाहत, शून्यात नजर गढवत. पत्नीकडे पाहत, कसनुसे हसत आणि मेंदूला ताण देत, मग कुठे काही अल्फाज वा अख्खी पूर्ण पंक्ती त्यांना आठवत असे. 

त्यांनी रदीफ़ बयान करताच राहतजींच्या चेहऱ्यावर समाधान विलसे. आपल्या प्राणप्रिय पत्नीला खूश पाहून मग बशीर सरांच्या चेहऱ्यावर एक हलकीशी स्मितरेषा उमटे! 

बद्र सर आता एक्क्याण्णव वर्षांचे झाले होते, माझ्यासारखे अनेक जण त्यांच्या शायरीवर प्रेम करत वाढले आहेत! त्यांच्या शायरीने अनेकांना दिलासा दिलाय, अनेकांना आधार दिलाय! राहतजी खऱ्या अर्थाने बशीर सरांच्या गझल झाल्या आहेत!  

जी क्लीप, मी पाहिली होती त्यात त्यांच्या बेगमजान त्यांना जो शेर ऐकवत होत्या, त्याची पंक्ती अशी होती - ख़ुदा ऐसे एहसास का नाम है.., ही पंक्ती त्या वारंवार सांगत होत्या आणि बशीर सरांना पुढची ओळ नाहीतर रदीफ़ ऐकवावा म्हणून गळ घालत होत्या, तीन चार रिपिटेशन्सनंतर बशीर सरांना त्याची पुढची ओळ आठवली, ते काहीसे अडखळत उत्तरले - रहे सामने और दिखाई न दे!

आपल्या शोहरकडून शेर पूर्ण होताच लहान मुलांसारख्या त्या खुदखुदून हसल्या! बशीरजींच्या गालावरून हात फिरवत आपल्या कापऱ्या आवाजात त्यांनी संपूर्ण शेर अर्ज केला -  

ख़ुदा ऐसे एहसास का नाम है
रहे सामने और दिखाई न दे.. 

बशीर बद्र सरांचा ख़ुदा त्यांच्या पत्नीच्या रूपाने त्यांची काळजी घेत होता, खुदा त्यांच्या समोरच होता मात्र ते महसूस करू शकत नव्ह,ते कारण ते या गोष्टींच्या पुढे गेले होते! मध्येच त्यांना भास होत असत की मुशायरा सुरु आहे! मग घराच्या दिवाणखान्यात ते एकटेच बसून असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज येई आणि स्वतःच्या नकळत ते म्हणत, इर्षाद इर्षाद! हे दृश्य डोळे पाणावणारे असे!      

आता लौकिक अर्थाने, ते पाण्याची लिखावट वाचण्यास रवाना झाले आहेत, त्यांना ठाऊक आहे की, हरेक नदी हजारो वर्षांच्या कथा बयान करते! त्या कथांच्या, व्यथांच्या साम्राज्यात ते अलगद हरवून जातात!

अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना
हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है..

एक नोंद सांगावीशी वाटते. डॉक्टरसाब अगदी बेशकिंमती शेर सहजतेने सांगत असत, पैकी हा एक शेर विलक्षण रसाळ आहे- 

अगर तलाश करूँ कोई मिल ही जाएगा
मगर तुम्हारी तरह कौन मुझ को चाहेगा.. 

हा शेर राहतजी, जेव्हा बशीर सरांना ऐकवत असतील तेव्हा ते राहतजींच्या प्रेम जाणिवांच्या परिघात, परिपूर्णतेने परतत असतील असे राहून राहून वाटते! आता मात्र बशीर सर कधीही परतून येणार नाहीत, ते अनंताच्या प्रवासाला रवाना झाले आहेत! अलविदा बशीर साहब, तुम्ही कोट्यवधी रसिकांच्या हृदयात सदैव सचेत असाल

बशीर बद्र यांच्याविषयीच्या काही नोंदी -  

नोंद 1 - बशीरसाबना एकुलता एक मुलगा होता, नुसरत त्याचं नाव. नुसरतच्या डोक्यात बालवयातच कवितेची ओढ होती, मात्र मीरत जाळपोळीत सर्वस्व लुटलं गेल्यानंतर बशीर सर व्याकुळ झाले होते. त्यामुळे मुलाने शायर कवी व्हावं असं त्यांना कधीही वाटलं नाही. परिणामी नुसरतच्या नज्मना त्यांनी कधी प्रेमाचा आसरा दिला नाही. याचे व्हायचे तेच परिणाम झाले, नुसरतला व्यावसायिक यश मिळण्यास फार मोठा कालावधी लागला. 

मुलाला उशिरा यश मिळाले म्हणून बशीर सर नाराज झाले नाहीत. त्यांना वाटलं सारं सुरळीत झालंय पण वास्तव तसं नव्हतं, प्रारब्ध काही वेगळंच होतं, नुसरत गंभीर आजारी पडला, तब्बल दशकभर तो आजारी होता. 2020 सालच्या फेब्रुवारीमध्ये त्याचं निधन झालं. बशीर आणि राहत, दांपत्य खचून गेलं. राहत भाभीना डगमगून चालणार नव्हतं, हळूहळू त्यांच्या पतीचा स्मृतीभ्रंश वाढत होता, त्यांना सावरण्यासाठी जगणं क्रमप्राप्त होतं. मुलाच्या मृत्यूने शोकविव्हळ झालेले बशीर बद्र एकांतात दुःखी राहू लागले जे की त्यांच्यासाठी हानिकारक होते. त्यांच्या पत्नीने त्यांना थोडेफार सावरले असले तरी काळजातली उदासी कधीकधी नकळत बाहर येई. बद्र सर लिहितात - 

कभी कभी तो छलक पड़ती हैं यूँही आँखें
उदास होने का कोई सबब नहीं होता.. 

नोंद 2 - 1987 साली उत्तर प्रदेशातील मीरत शहरात सलग मार्च ते जून, चार महिने दंगली सुरु होत्या. हजारो घरे या दरम्यान जाळली गेली, साडेतीनशेहून अधिक लोक मारले गेल्याची अधिकृत आकडेवारी आहे. शहरातील हाशिमपुरा मोहल्ल्यातील तब्बल चाळीस मुस्लिम तरुणांना यूपीच्या सशस्त्र पोलीस दलाच्या एकोणीस जवानांनी जबरदस्तीने पकडून नेलं. त्यांना पोलीस स्टेशनमध्ये न्यायच्या ऐवजी गंगेच्या काठी घेऊन नेण्यात आलं; अत्यंत थंड डोक्याने या मुलांना अतिशय जवळून गोळ्या घालून ठार केले, सर्व तरुणांचे मृतदेह नदीपात्रात फेकून दिले. यापैकी वाचलेला एक तरुण पाण्यात पोहून नदीपार गेला, त्यानेच एफआयआरची नोंदवलं. 

काँग्रेस नेते वीर बहादूर सिंह हे तत्कालीन यूपीचे मुख्यमंत्री होते. न्यायाच्या नावावर तीस वर्षे कुचेष्टा केली गेली. 2015 साली यातील पीडितांच्या नातलगांना नुकसान भरपाई दिली गेली यावरून काय ते ओळखावे! असो. हा पोस्टचा मुद्दा नाही, या दंग्यात बशीर बद्र यांचे घर जाळण्यात आले. त्यांची अनेक हस्तलिखिते, डायऱ्या, पुस्तके आगीच्या भक्षस्थानी पडले, संसार उघड्यावर आला. डॉक्टरसाब व्यथित झाले. त्यांनी मीरत कायमचे सोडले आणि ते भॊपाळला स्थायिक झाले. या साऱ्या उद्विग्नतेच्या काळात त्यांनी तो शेर लिहिला जो त्यांची पहचान बनून गेला!

लोग टूट जाते हैं एक घर बनाने में
तुम तरस नहीं खाते बस्तियाँ जलाने में.. ..

ज्याचं जळतं त्यालाच ते बेहद्द कळतं, बाकी जग केवळ सहानुभूती देण्याशिवाय काही करत नाही. इतकं होऊनही ज्यांना द्वेष जारी ठेवावा वाटतो ते द्वेष करतच राहतात.. असो..   

नोंद 3 - तसे तर त्यांनी त्यांच्या ख़ुदाला एक कैफियत त्यांच्या वयाच्या चाळीशीतच केली होती, ज्यात ते आपल्या परिस्थितीवर असे काही नाराज होते की त्यांच्या वेदना थेट काळजाला भिडतात..

ज़िंदगी तू ने मुझे क़ब्र से कम दी है ज़मीं
पाँव फैलाऊँ तो दीवार में सर लगता है..

बशीर सरांना त्यांच्या अंतिम कश्मकशचा अंदाज पूर्वीच आला असावा. अतिसंवेदनशील असणं त्रासदायक असतं. हा माणूस उत्तुंग आणि उदात्त होता, त्याचे कलाम आपल्याला वाचता आले ही आपली पुण्याई! त्यांना अलविदा म्हणणं जड जातंय मात्र नियतीपुढे कुणाचेही काही चालत नाही!

View More

ओपिनियन

Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
Advertisement

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC  :  जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget