Nashik : विद्यार्थी शेतात लावतात भेंडी, मिरची आणि टोमॅटो... नाशिकमधील शाळेत दिले जातात शेतीचे धडे
Nashik School Agriculture : नाशिकच्या शाळेतील विद्यार्थी शेतात मशागत करतात, पिकांची निगा राखतात, तसेच भाजीपाला तोडतात.

नाशिक: विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच शेतीचे धडे दिले जातील अशी भूमिका राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मांडली असतानाच नाशिकच्या इस्पॅलियर शाळेत मात्र गेल्या काही वर्षापासून मुलांना शेतीचे धडे दिले जात आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच शेतात काम करण्याचा अनुभव देखील मिळत असल्यानं विद्यार्थ्यांच्या बौद्धीक पातळीत भर पडत असल्याचंही दिसून येतंय.
नाशिक त्रंबकेश्वर रोडवरील इस्पॅलियर हेरिटेज शाळेची मुलं आपल्या हक्काच्या शेतात शेती करत आहेत. कुणी वांगी, भेंडी लावलीय, कुणी मिरची, टोमॅटोची शेती करतंय. तर कुणी इंद्रायणी भात पिकाची निगा राखतोय. पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांचं या शेतीत काहीं ना काही योगदान आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतीचा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करणार असल्याचं सूतोवाच केलं आहेत. मात्र त्या आधीच नाशिकच्या इस्पॅलियर हेरिटेज शाळेत मुलांना शेतात नेऊन शेतीचे धडे दिले जात आहेत. शाळेच्या प्रांगणातच छोटेसे शेत विकसित करण्यात आलं आहे.
शेतीची मशागत करणे पिकांची लागवड करणे, पिकांची निगा राखणे इथं पासून ते आलेला भाजीपाला तोडून शाळेतच त्याचा आस्वाद घेणे हा सर्व अनुभव विद्यार्थ्यांना शाळेतच मिळतोय. यातून विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल निर्माण होतंय. शेतकऱ्यांच्या वेदना कळतात, एक रोप लावल्यानंतर काही महिने वाट बघितल्यानंतर त्याला फळ, फुल लागत असल्यानं संयम वाढतोय. डॉक्टर, इंजिनियर बरोबरच आधुनिक शेतकरी बनण्याचे स्वप्नं आहेत. तर कुणाला फूड इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी सध्याच्या शेतीच्या अभ्यासाचा पाया पक्का होतोय.
मुलांना शालेय जीवनापासूनच शेतीचे शिक्षण दिले पाहिजे या महत्तम गांधींच्या संकल्पनेनुसार इस्पॅलियर शाळेने स्वतः शेतीचा अभ्यासक्रम तयार केलाय. दर आठवड्यात शेतीचा तास असतो. यात शेतीच्या विविध टप्प्यांचा समावेश करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल शिक्षणाबरोबरच त्यांची निरीक्षण करण्याची क्षमता वाढण्यासही मदत होतेय. केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरणात शेतीचा अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आल्याची शिक्षण तज्ञांची माहिती आहे. मुलं जे काम करतात ते त्यांना कायम स्मरणात राहते, त्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेजवर अधिक भर देण्यात आला आहे. ज्या शाळांकडे जागेची कमतरता आहे त्यांना टेरेसवरही परसबाग फुलवता येईल.
कृषी मंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत होत आहे. कृषिप्रधान देशात कृषीचे अधिकाधिक शिक्षण देण्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र अभ्यासक्रमाचे स्वरूप कसे असणार, प्रशिक्षित शिक्षकवर्ग कसा निर्माण करणार, विद्यार्थ्यांना भावी आयुष्यात त्याचा कसा फायदा होणार अशा असंख्य प्रश्नावर अभ्यास करून सरकारला शैक्षणिक धोरण ठरवावे लागणार आहे.
Before You Go
Dharashiv Crop Loss : धाराशिवमध्ये अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल






















