![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
राज्यातील स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
CM Eknath Shinde : पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
![राज्यातील स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत Agriculture News Big news for strawberry farmers in state CM Eknath Shinde is preparing to take big decision marathi news राज्यातील स्ट्रॉबेरी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मुख्यमंत्री शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/19/6b16a0f103fbbcf6220cbb15915209891708334238981737_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
सातारा : जिल्ह्यातील महाबळेश्वर (Mahabaleshwar) तालुक्यासह राज्यातील अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरी (Strawberry) उत्पन्न घेतले जाते. यावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. पाचगणी येथील बिलीमोरिया शाळेच्या सभागृहात स्ट्रॉबेरी विथ सीएम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
याबाबत बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांनी आता पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. शेत पिकावर प्रक्रिया उद्योग उभारल्यास शेतकऱ्यांना त्याचा अधिक फायदा होईल. यादृष्टीने शेतीमध्ये गुंतवणूक वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. शेतीमधून आर्थिक उत्पन्न वाढावे म्हणून मागेल त्याला शेततळे, ठिबक सिंचन, एक रुपयात पीक विमा अशा अनेक योजना राज्य शासन राबवीत आहेत. त्याचबरोबर अतिवृष्टीत बाधित शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुपटीने आर्थिक मदत करण्याचा निर्णयही शासनाने घेतला. तसेच, स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे.
स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्प उभारणार...
याचवेळी बोलतांना शिंदे म्हणाले की, “महाबळेश्वर व जावळी हे डोंगरी तालुके आहेत. येथील नागरिक कामासाठी मुंबई येथे जातात. ते पुन्हा गावात यावेत, नोकरीच्या शोधार्थ शहरात जाणाऱ्यांना स्थानिक पातळीवरच रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी पर्यटन वाढी बरोबर रोजगार निर्मितीवर भर देत आहोत. येथील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे. बांबू नगदी पीक असून बांबूपासून फर्निचर, इथेनॉल निर्मिती करता येते. बांबू लागवडीसाठी शासन अनुदान देत असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. स्ट्रॉबेरीपासून वाईन निर्मितीचा प्रकल्पही महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.
शेतकऱ्यांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील...
पुढे बोलतांना शिंदे म्हणाले की, "शेती करीत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हे शासन सर्वसामान्यांचे, शेतकऱ्यांचे असल्याने या घटकांच्या विकासासाठी आवश्यक सर्व बाबी केल्या जातील. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सर्वांनी झाडे लावली पाहिजेत व त्याचे संवर्धनही केले पाहिजे," असेही मुख्यमंत्री म्हणाले. या कार्यक्रमास महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या :
एकेकाळी हरियाणात मजूर म्हणून काम, आज स्ट्रॉबेरीच्या शेतीतून झाला करोडोंचा मालक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)