एक्स्प्लोर
IndvsSL : श्रीलंका फॉलोऑनच्या छायेत
विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंकेची पाच बाद 154 अशी दाणादाण उडवून गॉलच्या पहिल्या कसोटीवर दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली.

गॉल: विराट कोहलीच्या टीम इंडियानं श्रीलंकेची पाच बाद 154 अशी दाणादाण उडवून गॉलच्या पहिल्या कसोटीवर दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली. श्रीलंकेला फॉलोऑनचं संकट टाळण्यासाठी 401 धावांची मजल मारायची असून, त्या लक्ष्यापासून श्रीलंका अजूनही 247 धावांनी दूर आहे.
दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी अँजलो मॅथ्यूज 54, तर दिलरुवान परेरा सहा धावांवर खेळत होते.
या कसोटीत भारतीय संघानं पहिल्या डावात सर्व बाद 600 धावांचा डोंगर उभारला. त्या प्रचंड धावसंख्येच्या दडपणाखाली श्रीलंकेची आधी तीन बाद 68 अशी घसरगुंडी उडाली होती. पण उपुल थरंगा आणि अँजलो मॅथ्यूजनं चौथ्या विकेटसाठी 57 धावांची झुंजार भागीदारी रचली. अखेर थरंगा दुर्दैवानं धावचीत झाला आणि ही जोडी फुटली. मग निरोशन डिकेवालाही स्वस्तात माघारी परतला.
त्यामुळं गॉल कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पाच बाद 154 अशी फॉलोऑनच्या छायेखाली आहे.
मोहम्मद शमीनं दोन, तर उमेश यादव आणि रवीचंद्रन अश्विननं एकेका फलंदाजाला माघारी धाडून भारताला गॉल कसोटीवर घट्ट पकड मिळवून दिली. श्रीलंकेला फॉलोऑनचं संकट टाळण्यासाठी पहिल्या डावात किमान 401 धावांची मजल मारायची आहे.
गॉल कसोटीचा दुसरा दिवस भारताच्या अष्टपैलू हार्दिक पंड्यानं गाजवला. त्यानं या कसोटीत पदार्पणात अर्धशतक साजरं केलं. पंड्यानं पाच चौकार आणि तीन षटकारांसह 49 चेंडूंत 50 धावांची खेळी केली. त्यानं तळाच्या चार फलंदाजांसह भारताच्या धावसंख्येत 109 धावांची भर घातली. त्याआधी, चेतेश्वर पुजारानं 153 आणि अजिंक्य रहाणेनं 57 धावा फटकावून भारतीय डावाची बांधणी केली. त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 137 धावांची भागीदारी रचली. श्रीलंकेकडून नुवान प्रदीपनं सहा, तर लाहिरू कुमारानं तीन फलंदाजांना माघारी धाडलं.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
व्यापार-उद्योग
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement


















