RCB on Sale Explained : RCB विकायला काढली, 5 उद्योजक शर्यतीत! IPL ट्रॉफी जिंकल्यानंतरही ही वेळ का आली?, विराट कोहलीचं काय होणार?, A टू Z माहिती
Royal Challengers Bengaluru on Sale : 3 जून 2025 तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) ने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले.

Royal Challengers Bengaluru on Sale : 3 जून 2025 तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर बंगळुरू (RCB) ने पहिल्यांदाच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. संपूर्ण देशात आरसीबीच्या सेलिब्रेशन करण्यात आले, जणू भारतीय संघाने विश्वचषक जिंकला आहे. पण आता हीच टीम विक्रीच्या उंबरठ्यावर आली आहे. 5 नोव्हेंबर रोजी आरसीबीची मालकी असलेल्या डियाजिओ (Diageo) कंपनीच्या भारतीय शाखा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडने (USL) बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) ला एक अधिकृत पत्र पाठवले असून, त्यानंतर आरसीबी विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
आता प्रश्न असा आहे, खरंच आरसीबी टीम विकली जाणार का? नवीन मालक कोण असणार? आणि विराट कोहलीचे या टीममधील भविष्य काय असणार? चला तर मग, ABP एक्सप्लेनर मध्ये समजून घेऊया या सर्व प्रश्नांची उत्तरं…
View this post on Instagram
प्रश्न 1 – डियाजिओच्या पत्रात नेमकं काय लिहिलं होतं, ज्यामुळे आरसीबी विक्रीच्या चर्चेला उधाण आलं?
उत्तर – डियाजिओच्या भारतीय युनिट यूनीटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ने पाठवलेल्या पत्रात आरसीबीच्या मालकीबाबत स्ट्रॅटेजिक रिव्ह्यू सुरू केल्याची घोषणा केली आहे. हे पत्र भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाला (SEBI) नियमन 30 अंतर्गत औपचारिक डिस्क्लोजर म्हणून पाठवण्यात आले. यानंतर लगेचच आरसीबी विक्रीच्या चर्चांना जोर आला, कारण अशा प्रकारचं पुनरावलोकन साधारणतः फ्रँचायझी विक्रीच्या प्रक्रियेचा संकेत मानला जातो. ही प्रक्रिया आरसीबीच्या पुरुष आणि महिला दोन्ही संघांवर लागू होणार असून कंपनीने सांगितले की हे पुनरावलोकन 31 मार्च 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.
पत्रातील मुख्य मुद्दे असे –
- USL आपल्या पूर्ण मालकीच्या रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) या उपकंपनीतील गुंतवणुकीचं रणनीतिक पुनरावलोकन करत आहे.
- RCSPL हीच कंपनी आहे जी आरसीबीच्या पुरुष (IPL) आणि महिला (WPL) संघांची मालकी राखते.
- हा निर्णय डियाजिओ आणि USL यांच्या भारतातील व्यवसायाचं मूल्य वाढवण्यासाठी आणि सर्व स्टेकहोल्डर्ससाठी दीर्घकालीन फायदा सुनिश्चित करण्यासाठी घेतला गेला आहे.
- रिपोर्ट्सनुसार, RCB ची सध्याची किंमत सुमारे 2 अब्ज डॉलर (अंदाजे 17 हजार कोटी रुपये) इतकी असू शकते.
USL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO प्रविण सोमेश्वर यांनी सांगितलं की, “आरसीबी ही आमच्यासाठी नेहमीच एक महत्त्वाची ब्रँड राहिली आहे. USL आणि डियाजिओ आपला भारतीय व्यवसाय नियमितपणे तपासत असतात, जेणेकरून कंपनीचा कारभार अधिक मजबूत आणि शाश्वत राहील.” त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, “आरसीबी संघ आणि त्याच्याशी संबंधित सर्वांच्या हितांचे पूर्ण संरक्षण केले जाईल.”
प्रश्न 2 – डियाजिओ आरसीबी विकण्याचा विचार का करत आहे?
उत्तर – क्रीडा तज्ज्ञांच्या मते, आरसीबी विकण्याचा निर्णय हा अचानक घेतलेला नाही, तर जून 2025 पासूनच याबाबत चर्चा सुरू होती. अखेर 5 नोव्हेंबर 2025 च्या पत्राने ही प्रक्रिया अधिकृत झाली. डियाजिओ काही प्रमुख कारणांमुळे आरसीबी विक्रीचा विचार करत आहे.
- मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करणे - डियाजिओचा मूळ व्यवसाय अल्कोहोल ब्रँड्स – जसे की जॉनी वॉकर, स्मिरनॉफ आणि मॅकडॉवेल्स – यांवर आधारित आहे. RCB ही स्पोर्ट्स फ्रँचायझी असल्याने “नॉन-कोर अॅसेट” म्हणजेच कंपनीच्या मुख्य उत्पन्नस्रोतापासून वेगळी आहे. सध्या डियाजिओ जागतिक पातळीवर हाय-एंड ब्रँड्स आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन यावर भर देत आहे, आणि या धोरणाशी RCB चं मालकी हक्क ठेवणं सुसंगत नाही.
- आर्थिक कारणे आणि गुंतवणुकीचा पुनर्विचार - आरसीबीची सध्याची किंमत सुमारे 17 हजार कोटी रुपये (2 अब्ज डॉलर) इतकी आहे. ही विक्री झाल्यास USL साठी मोठा कॅश इनफ्लो मिळू शकतो. आरसीबीने 2025 पूर्वी आयपीएल जिंकले नव्हते, पण खेळाडूंचे मानधन, मार्केटिंग आणि स्टेडियमवरील खर्च सतत वाढत होते. डियाजिओला वाटतं की हे पैसे कंपनीच्या मुख्य व्यवसायाच्या वाढीसाठी वापरणं अधिक फायद्याचं ठरेल.
- चिन्नास्वामी स्टेडियम दुर्घटनेचा परिणाम - आरसीबीच्या आयपीएल विजयाचा जल्लोष करताना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर USL वर सुरक्षा व्यवस्थेबाबत मोठा दबाव आला, आणि माध्यमांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. ही दुर्घटना डियाजिओसाठी ब्रँड इमेजवर नकारात्मक परिणाम करणारी ठरली, ज्यामुळे विक्रीची प्रक्रिया जलद करण्याचा विचार झाला.
प्रश्न 3 – म्हणजे खरंच RCB विकली जाणार आहे का, की ही फक्त अफवा आहे?
उत्तर – तज्ज्ञांच्या मते, USL (युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड) कडून SEBI कडे अधिकृत पत्र पाठवले गेले आहे, म्हणजेच RCB विक्रीची प्रक्रिया प्रत्यक्षात सुरू झाली आहे. टीम विक्रीच्या चर्चा यापूर्वीही झाल्या होत्या, पण कंपनी योग्य वेळेची वाट पाहत होती असं दिसतं. त्यामुळे RCB विकली जाण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे.
सवाल 4 – आरसीबीचा नवा मालक कोण होऊ शकतो?
उत्तर – मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरसीबी खरेदी करण्यासाठी तब्बल 5 कंपन्या रस दाखवत आहेत.
- अदानी ग्रुप : गौतम अदानींचा समूह आयपीएलमध्ये नव्याने प्रवेश करण्यास उत्सुक आहे. 2022 मध्ये लखनौ आणि अहमदाबाद टीमच्या लिलावात अदानी ग्रुपने बोली लावली होती, पण तेव्हा टीम मिळाली नाही. मात्र, आता आरसीबी खरेदी करण्यासाठी ते सर्वात पुढे मानले जात आहेत.
- JSW ग्रुप (पार्थ जिंदल) : सज्जन जिंदल यांचा पुत्र पार्थ जिंदल सध्या दिल्ली कॅपिटल्स (DC) या आयपीएल टीमचा 50% भागधारक आहे. JSW ग्रुपकडे इंडियन सुपर लीग फुटबॉलमधील बंगळुरू FC चेही मालकी हक्क आहेत. मात्र, बीसीसीआयच्या क्रॉस-ओनरशिप नियमांनुसार, एकाच व्यक्तीकडे दोन आयपीएल टीम्स असू शकत नाहीत. त्यामुळे आरसीबी विकत घेण्यासाठी JSW ग्रुपला दिल्ली कॅपिटल्समधून पूर्णतः बाहेर पडावे लागेल.
- अदार पूनावाला (सीरम इन्स्टिट्यूट) : पुणे येथील अब्जाधीश उद्योजक अदार पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. ते स्पोर्ट्स इन्व्हेस्टमेंट क्षेत्रात नवीन प्रवेश करू इच्छितात. त्यांच्या नावावर अद्याप कोणतीही क्रिकेट किंवा आयपीएल टीम नाही, त्यामुळे बीसीसीआयच्या नियमांमध्ये कोणताही संघर्ष नाही. अशा परिस्थितीत आरसीबी खरेदी करणे त्यांच्या दृष्टीने सोपे ठरू शकते.
- रवी जयपूरिया (देवयानी इंटरनॅशनल) : दिल्लीतील उद्योगपती रवी जयपूरिया हे देवयानी इंटरनॅशनल लिमिटेड चे चेअरमन आहेत. ही कंपनी KFC, Pizza Hut आणि Costa Coffee सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सच्या फ्रँचायझी चालवते. अन्न व रिअल इस्टेट क्षेत्रात त्यांची मजबूत पकड आहे. स्पोर्ट्समध्ये अनुभव कमी असला तरी आर्थिक सामर्थ्य आणि दीर्घदृष्टी यामुळे ते आरसीबीसाठी एक दमदार दावेदार ठरू शकतात.
- दोन अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म्स : अमेरिकेतील दोन मोठ्या प्रायव्हेट इक्विटी कंपन्यांनीही आरसीबीमध्ये रस दाखवला आहे. त्या भारतीय भागीदारांसह संयुक्तरित्या बोली लावू शकतात. मात्र, त्यांची नावे अद्याप सार्वजनिक झालेली नाहीत.
प्रश्न 5 – जर टीम विकली गेली, तर विराट कोहलीचं काय होणार?
उत्तर – क्रीडा तज्ज्ञांच्या मते, विराट कोहली हा आरसीबीचा सर्वात मोठा चेहरा राहिला आहे. इतर खेळाडूंनी फ्रँचायझी बदलल्या, तरी कोहलीने नेहमीच आरसीबीप्रती निष्ठा राखली. स्वतः कोहलीने अनेकदा सांगितले आहे की तो फ्रँचायझी फक्त निवृत्त झाल्यावरच सोडेल. खेळाडू म्हणून कोहलीचा करार फ्रँचायझीशी आहे, डियाजिओ कंपनीशी नाही. त्यामुळे मालकीत बदल झाला तरी त्याच्या स्थानावर काही परिणाम होणार नाही.





















