IND vs ENG 3rd T20 : कॅप्टनचा संयम सुटला! इंग्लंडविरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा थेट इशारा; म्हणाला, आता खेळाडूंना...
Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला.

Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20 : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताला 125 धावांनी दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरचा संयम सुटला असून, त्याने खेळाडूंना कडक शब्दांत सुनावले आहे. "आता प्रत्येक खेळाडूला स्वतःची जबाबदारी घ्यावीच लागेल," अशा स्पष्ट शब्दांत अय्यरने आपला संताप व्यक्त केला. ट्रेंटब्रिज येथे झालेल्या या सामन्यातील टीम इंडियाच्या कामगिरीला त्याने अत्यंत खराब असे संबोधले आहे. या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 201 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या 11.4 षटकांत 76 धावांवर गारद झाला. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताची ही दुसरी सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली आहे, तर धावांच्या दृष्टीने हा भारताचा आजवरचा सर्वात मोठा आणि मानहानीकारक पराभव आहे.
पराभवानंतर काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर? (Shreyas Iyer IND vs ENG 3rd T20)
श्रेयस अय्यरने टी-20 संघाचे कर्णधारपद सांभाळल्यापासून भारताला अजून एकही विजय मिळवता आलेला नाही. आधी आयर्लंडने भारताला 2-0 असे पराभूत केले, आणि आता इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी दोन सामने भारताने गमावले आहेत. तिसऱ्या टी-20 सामन्यातील खराब कामगिरीवर बोलताना श्रेयस म्हणाला की, "हा अत्यंत सुमार दर्जाचा खेळ होता. या कामगिरीचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे यापेक्षा दुसरा कोणताही चांगला शब्द नाही. इतक्या मोठ्या फरकाने पराभूत होणे अजिबात स्वीकारार्ह नाही."
भारताने नाणेफेक जिंकून आधी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु इंग्लंडला 7 बाद 201 धावांपर्यंत पोहोचू दिले. इंग्लंडकडून फिल सॉल्टने 70 धावांची तुफानी खेळी केली, तर खालच्या फळीत सॅम करनने नाबाद 41 धावा ठोकल्या. यावर श्रेयस म्हणाला की, इंग्लंडला 200 धावांपर्यंत पोहोचू द्यायला नको होते, कारण ही खेळपट्टी एवढ्या धावांची नव्हती.
भारतीय फलंदाजांची सुमार कामगिरी
202 धावांच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी अत्यंत बेजबाबदारपणे विकेट्स गमावल्या. खेळपट्टीवर टिकून राहण्याऐवजी भारतीय फलंदाज चुकीचे आणि हवेत शॉट्स खेळण्याच्या नादात बाद झाले. संपूर्ण संघातून केवळ 4 फलंदाजांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, इशान किशन, स्वतः कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल हे सर्वच खेळाडू मोठे शॉट्स मारण्याच्या नादात बाद झाले. यामुळे भारताने पॉवरप्लेमध्येच आपले 5 महत्त्वाचे फलंदाज गमावले. गेल्या 5 सामन्यांपासून भारतीय फलंदाजीचा क्रम अशाच प्रकारे पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळताना दिसत आहे.
श्रेयस अय्यरचा खेळाडूंना कडक इशारा
संघाच्या सततच्या खराब कामगिरीवर बोट ठेवत श्रेयस अय्यरने खेळाडूंना थेट इशारा दिला आहे. तो म्हणाला की, "आम्ही खूपच खराब क्रिकेट खेळलो आहोत. आता खेळाडूंनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण मैदानावर कशा प्रकारे प्रभाव पाडू शकतो आणि संघाला विजयाच्या मार्गावर कसे आणू शकतो, याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. त्यामुळे निश्चितपणे आता प्रत्येक खेळाडूला स्वतःहून विचार करावा लागेल आणि आपण संघाला मॅच कशी जिंकवून देऊ शकतो, याची वैयक्तिक जबाबदारी घ्यावी लागेल."
हे ही वाचा -




















