Gautam Gambhir News : रणजी ट्रॉफीत जाऊन कोचिंग शिका...; गौतम गंभीरवर टीकेचा भडिमार, काढून टाकण्याच्या चर्चेत नवा ट्विस्ट, कोणी केलं खळबळजनक विधान?
Gautam Gambhir Ranji Trophy Coach : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याला कसोटी प्रशिक्षकपदावरून काढून टाकू शकते अशा बातम्या येत आहेत.

Monty Panesar on Gautam Gambhir Ranji Trophy Coach : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याला कसोटी प्रशिक्षकपदावरून काढून टाकू शकते अशा बातम्या येत आहेत. या अफवांमध्ये, इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर यांनी गंभीरला रणजी ट्रॉफीमध्ये प्रशिक्षकपदाचा सल्ला दिला आहे. पानेसर यांचा असा विश्वास आहे की, भारताच्या प्रमुख घरगुती रेड-बॉल स्पर्धेत प्रशिक्षण देणे आणि इतर प्रशिक्षकांशी संवाद साधल्याने गंभीरला या स्वरूपात संघ कसा बनवायचा हे शिकण्यास मदत होईल.
व्हाईट-बॉल आणि रेड-बॉल यामध्ये मोठा फरक
गौतम गंभीरचा कसोटी क्रिकेटमधील कोचिंग अनुभव आणि व्हाईट-बॉल क्रिकेटमधील यश यामध्ये मोठा फरक दिसतो. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली असून आतापर्यंत एकही टी20 मालिका गमावलेली नाही. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थिती वेगळी आहे. गंभीरच्या कार्यकाळात भारताला घरच्या मैदानावर दोन वेळा कसोटी मालिकेत क्लीन स्वीपचा धक्का बसला आहे, जे यापूर्वी कधीच घडले नव्हते. गेल्या दीड वर्षात भारताने रेड-बॉल आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक पराभव पाहिले आहेत.
एएनआयशी बोलताना माँटी पानेसर म्हणाला की, “गौतम गंभीर हा व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये चांगला प्रशिक्षक आहे, कारण तिथे त्याला यश मिळाले आहे. पण तो रणजी ट्रॉफीचा कोच बनू शकतो आणि रेड-बॉल क्रिकेटमध्ये अनुभव असलेल्या प्रशिक्षकांशी चर्चा करायला हवी. सध्या भारतीय कसोटी संघ कमकुवत आहे, आणि ही वस्तुस्थिती आहे. संघ पूर्वीसारखा तगडा दिसत नाही. तीन मोठ्या खेळाडूंनी निवृत्ती घेतल्यानंतर उर्वरित खेळाडूंना तयार करणे वेळखाऊ आणि कठीण असते.”
माँटी पानेसरची ही टिप्पणी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा बीसीसीआयने गंभीरचा माजी सहकारी व्हीव्हीएस लक्ष्मण याच्याशी कसोटी संघाच्या जबाबदारीबाबत अनौपचारिक चर्चा केल्याच्या बातम्या येत आहेत. भारतात सहसा स्प्लिट कोचिंग पद्धत स्वीकारली जात नाही, त्यामुळे हा निर्णय मोठा बदल ठरू शकतो. मात्र, लक्ष्मणकडे गंभीरपेक्षा अधिक कोचिंग अनुभव असल्याचे मानले जाते.
बीसीसीआयनं अफवा फेटाळल्या
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या सर्व अफवा फेटाळल्या आहे. ते म्हणाले,
“ही बातमी पूर्णपणे चुकीची आणि अफवांवर आधारित आहे. काही प्रतिष्ठित वृत्तसंस्थांनीही ती चालवली असली, तरी त्यात कोणतेही तथ्य नाही. बीसीसीआय अशा सर्व बातम्यांचा स्पष्ट इन्कार करते. लोक काहीही तर्क लावू शकतात, पण बीसीसीआयने कोणताही निर्णय घेतलेला नाही.
हे ही वाचा -





















