Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: भारताने पाकिस्तानला लोळवलं, फायनलनंतर दुबईत राडा; नरेंद्र मोदी म्हणाले, निकाल तोच...
Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.

Narendra Modi On Ind vs Pak Asia Cup Final: दुबईत खेळवण्यात आलेल्या आशिया चषक 2025 च्या स्पर्धेत (Asia Cup 2025) भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan Final) यांच्यात काल (28 सप्टेंबर) अंतिम सामना झाला. या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने आतापर्यंत नवव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. भारताच्या या विजयानंतर देशभरात सेलिब्रेशन करण्यात येत आहे. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील एक्सवर ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.
मैदानातही ऑपरेशन सिंदूर, निकाल तोच, भारताचा विजय..., असं नरेंद्र मोदी (Narendra Modi On Asia Cup Final) पोस्ट करत म्हणाले. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील ट्विट करत भारतीय संघाचे अभिनंदन केले. एक अद्भुत विजय. आमच्या मुलांच्या प्रचंड उर्जेने पुन्हा एकदा विरोधकांना पराभूत केले आहे. मैदान कोणतेही असो, भारत जिंकणारच हे निश्चित आहे, असं अमित शाह म्हणाले.
#OperationSindoor on the games field.
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2025
Outcome is the same - India wins!
Congrats to our cricketers.
भारत-पाकिस्तानचा सामना कसा रंगला? (India vs Pakistan Asia Cup Final)
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानच्या संघाने आक्रमक सुरुवात केली. त्यांचा पहिला गडी 84 धावांवर गेला, साहिबजादा फरहान 57 (38) धावा करून माघारी परतला. पण त्यानंतर मात्र पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली. फरहानची खेळी ही पाकिस्तानसाठी सर्वात मोठी ठरली. त्याच्याशिवाय फक्त दोन फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले. फखर जमन 46(35) तर सैम अयूब 14(11) धावा करून बाद झाले. उरलेल्या फलंदाजांत तिघे शून्यावर परतले. कर्णधार सलमान अली आगा 8, हुसैन तलत 1, मोहम्मद नवाज 6 आणि हारिस रऊफ 6 धावा करून बाद झाले. अशा प्रकारे पाकिस्तानचा डाव 146 धावांवर संपला.
भारताचा 5 विकेट्सने दणदणीत विजय- (Team India Over Pakistan)
147 धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. दुसऱ्या ओव्हरमध्येच इनफॉर्म बॅट्समन अभिषेक शर्मा आऊट झाला. फहीम अशरफने त्याला आऊट केले. शुभमन गिलने 10 चेंडूत 12 धावा केल्या. तर कप्तान सूर्यकुमार यादव या सामन्यातही फ्लॉप राहिला, 5 चेंडूत फक्त 1 रन करून आऊट झाला. यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत भारताचा डाव सावरला. मात्र 13व्या ओव्हरमध्ये अबरारने संजू सॅमसन (24) ला आऊट केले. यानंतर शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनी पुन्हा एक अर्धशतकीय भागीदारी केली. एक टप्प्यावर भारताला जिंकण्यासाठी फक्त 2 ओव्हरमध्ये 17 धावा लागत होत्या. अंतिम ओव्हरमध्ये 10 धावा हव्या होत्या आणि विजयी शॉट रिंकू सिंगने मारत भारताने सामना जिंकला. या सामन्यात भारतासाठी तिलक वर्माने 53 चेंडूत 69 नाबाद धावा केल्या त्याने 3 चौकार आणि 4 षटकार मारले आणि भारतीय विजयाचा शिलेदार ठरला.
पाकिस्तानच्या मोहसीन नक्वीकडून ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार- (Team India Denied Collect Asia Cup Trophy)
भारत आणि पाकिस्तान संघांमधल्या आशिया चषकाच्या फायनलइतकाच या स्पर्धेचा तासाभरापेक्षा जास्त वेळ लांबलेला पारितोषिक वितरण सोहळाही तितकाच नाट्यमय ठरला. कारण आशियाई क्रिकेट कौन्सिल म्हणजे एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक आणि वैयक्तिक पदकं स्वीकारण्यास भारतीय संघानं स्पष्ट नकार दिला. एसीसीनं आपल्याला ही माहिती दिल्याचं सांगून समालोचक सायमन डूल यांनी पारितोषिक वितरण सोहळा थोडक्यात गुंडाळला. आशिया चषकाचा अंतिम सामना जिंकल्यानंतरही भारतीय संघाला विजयी ट्रॉफी मिळाली नाही. ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंनी अखेर सेलिब्रेशन केले. भारतीय संघाचे कुलदीप यादव, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा या भारतीय खेळाडूंनी आपली वैयक्तिक पारितोषिकं अन्य मान्यवरांच्या हस्ते स्वीकारली. पण पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगानं उपविजेतेपदाचा धनादेश एसीसीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते स्वीकारला. मात्र भारतीय खेळाडूंनी मोहसिन नकवींच्या हस्ते विजेतेपद स्वीकारण्यास नकार दिला. तसेच शेवटपर्यंत त्या भूमिकेवर कायम राहिले. त्यामुळे मोहसिन नकवी यांचा चेहरा बक्षीस समारंभावेळी पडला होता.





















