गंभीरची रणनीती ठरली मास्टरस्ट्रोक; तिलकवर नाही 'या' प्लेयरवर होता डोळे झाकून विश्वास, सूर्याभाई काय म्हणाला?
गंभीरची रणनीती आणि दुबेंची दमदार फलंदाजी मिळूनच टीम इंडिया आशिया कप फायनलमध्ये विजयी झाली.

IND vs PAK Asia Cup: आशिया कप फायनलचा सामना भारतीय चाहत्यांसाठी रोमांचक क्षणांनी भरलेला ठरला. पाकिस्तानविरुद्धच्या या निर्णायक लढतीत टीम इंडियाने 5 गडी राखून विजय मिळवला. मात्र, खऱ्या अर्थाने चर्चेत राहिला तो गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक आणि शिवम दुबेची खेळी. (India vs Pakistan)
कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, निर्णायक क्षणी त्यांचा आणि संघाचा विश्वास तिलकपेक्षा शिवम दुबेवर ठेवण्यात आला होता.आशिया कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या क्रिकेट टीमचा धुव्वा उडवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे सोमवारी रात्री त्याच्या देवनार येथील निवासस्थानी आगमन झाले. यावेळी येथील नागरिकांनी सूर्याचे जल्लोषात स्वागत केले.
सूर्यकुमारचा गंभीरवर अटळ विश्वास
सूर्यकुमार म्हणाला ,“मी दर दोन-तीन षटकांनी जेव्हा डगआउटकडे पाहतो, तेव्हा गंभीर सरकडून मला नेहमी एखादा संकेत मिळतो. मी विचारात गुरफटलेलो असतो. गोलंदाज कोण, फील्डिंग कशी, पुढचा डाव कसा. पण बाहेरून त्यांचं विश्लेषण वेगळं असतं आणि मी त्यांच्या प्रत्येक सल्ल्याचं डोळे झाकून पालन करतो. आमच्यात परस्परांवर प्रचंड विश्वास आहे.”
गौतम गंभीरचा मास्टरस्ट्रोक
फायनलमध्ये हार्दिक पांड्या दुखापतीमुळे उपलब्ध नव्हते. त्यामुळे संघाला अतिरिक्त फलंदाजाची गरज होती. या वेळी गंभीरने शिवम दुबेवर विश्वास दाखवला. “क्रिकेटमध्ये कधीही 20/3 किंवा 40/4 अशी स्थिती निर्माण होऊ शकते. त्यामुळे बॅकअप फलंदाज हवा होता. त्यांनी सांगितले की शिवम दुबे ही जबाबदारी घेईल. मी त्यांना विचारले, 'तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का?' त्यांनी दुबेवर पूर्ण विश्वास दाखवला आणि आम्ही त्यांच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला." असं सूर्यकुमार म्हणाला
दुबेनं खेळली मॅच विनिंग खेळी
गंभीरच्या निर्णयानं आणि सूर्यकुमारच्या विश्वासानं दुबेनं कामगिरीतून शंभर टक्के उतरलं. 77 धावांवर 4 बाद असताना त्याने मैदानात येऊन फक्त 22 चेंडूत 33 धावा फटकावल्या आणि तिलक वर्मासोबत 60 धावांची मॅच विनिंग पार्टनरशिप केली. त्याची ही खेळी भारताच्या विजयाचा खरा पाया ठरली. गंभीरची रणनीती आणि दुबेंची दमदार फलंदाजी मिळूनच टीम इंडिया आशिया कप फायनलमध्ये विजयी झाली.























