एक्स्प्लोर
राजू शेट्टींची किसान मुक्ती यात्रा, मेधा पाटकर, योगेंद्र यादवही सहभागी

भोपाळ: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली देश पातळीवरील किसान मुक्ती यात्राला मध्यप्रदेशातल्या बुढामधून सुरुवात झाली आहे. या मोर्चात राजू शेट्टींसह सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, योगेंद्र यादव यांच्यासह 25 राज्यातले शेतकरी सहभागी झाले आहे. तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी शेतकरी संघर्ष समितीचे स्थानिक नेते आणि माजी आमदार डॉ. सुनिलम यांना अटक केली आहे. सध्या इथं 600 पोलिसांचा बंदोबस्त आहे. शेती मालाला योग्य भाव आणि शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींनी किसान मुक्ती यात्रा काढली आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा या राज्यांमधून प्रवास करत ही यात्रा संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला दिल्लीत पोहणार आहे. दिल्लीत पोहोचल्यानंतर 18 जुलै रोजी जंतरमंतरवर देशभरातील शेतकऱ्यांनी एकत्र यावं असं आवाहन खासदार राजू शेट्टींनी केलं आहे. “मध्य प्रदेशातील मंदसौरपासून किसान मुक्ती यात्रेची सुरुवात होईल. या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचेल. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील.”, अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी नुकतीच पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली होती. नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून महाराष्ट्र सरकारनंच कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचं उघड केलंय, असा आरोपही शेट्टींनी केला होता. तसंच सदाभाऊ खोत यांनी आपल्यावर कितीही आरोप केले तरी महाराष्ट्र आपल्याला गेली 25 वर्षं ओळखतो असंही राजू शेट्टी म्हणाले. संबंधित फोटो राजू शेट्टी यांची किसान मुक्ती यात्रा
Before You Go
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?






















