Pune Pmc News: पुणेकरांनो महापालिकेकडे वाहतुकीचा प्रस्ताव द्या अन् मुलांना सुरक्षित शाळेत पाठवा
पुण्यातील सर्वच भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना शालेय वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यामुळे स्पर्धेतून शालेय वाहतूक सुधारण्याचे नियोजनाचा निर्णय पीएमसीने घेतला आहे.

Pune Pmc News: वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पालक मुलांना सायकलने किंवा पायी चालत शाळेत पाठवण्याचे धाडस करत नाहीत. त्यामुळे ते आपल्या मुलांना स्वतःच्या बाईक किंवा स्कूल बसने किंवा व्हॅनने शाळेत पाठवतात. ही संख्या वाढली की वाहतूक कोंडीही वाढते आणि सुरक्षित प्रवासाची खात्री नसते. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने (PMC) विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीची व्यवस्था आणि नियोजन करण्यासाठी पावलं उचलली आहेत.
शाळेत प्रवेश आणि बाहेर पडताना विद्यार्थ्यांना प्राधान्य देताना विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे चालता यावं, सायकल चालवता यावी आणि सार्वजनिक वाहतुकीचा वापर करता यावा यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. 2018 च्या योजनेनुसार पुण्यातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रोज सुमारे दहा लाख विद्यार्थी जातात. यातील 43 टक्के विद्यार्थी पायी चालत शाळेत जातात, तर चार टक्के विद्यार्थी सायकलने शाळेत जातात. घरापासून शाळा दोन ते चार किलोमीटर अंतरावर असली तरी पालक स्वत: विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी जातात किंवा खासगी वाहनाने पाठवतात.
पुण्यातील सर्वच भागात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत असताना शालेय वाहतुकीच्या नियोजनाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, त्यामुळे स्पर्धेच्या माध्यमातून शालेय वाहतूक सुधारण्याचे नियोजन करण्याचा निर्णय पीएमसीने घेतला आहे.
“शहरातील 43 टक्के विद्यार्थी चालत शाळेत जातात, मात्र केवळ चार टक्केच सायकली वापरतात. दुचाकी, टॅक्सी किंवा स्कूल बसने विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचे प्रमाण 37 टक्के आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित वाहतुकीचे नियोजन केल्यास त्याचा परिणाम शहरातील संपूर्ण वाहतुकीवर होईल, त्यामुळे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे,” अशी माहिती पीएमसीचे वाहतूक नियोजक निखिल मिझार यांनी दिली.
शहरातील बहुतांश शाळा व महाविद्यालये असलेले क्षेत्र निवडण्यात आले आहेत. त्या प्रत्येक भागाचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यात डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहेगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पार्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा आणि खराडी या शहरातील नऊ भागांचा समावेश आहे. या प्रत्येक भागात असलेल्या शैक्षणिक संस्था, तेथून होणारी वाहतूक कोंडी, गर्दीचे तास यांचा अभ्यास करण्यात येणार आहे.
शालेय वाहतूक सुधारण्यासाठी योजना बनवण्यात कोणताही नागरिक सहभागी होऊ शकतो मात्र त्यासाठी शहर नियोजक किंवा शहर रचनाकार असणे बंधनकारक आहे आणि त्यांच्यामार्फत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. महापालिका नऊ विभागांपैकी एकाची निवड करून त्याचा सर्वसमावेशक आराखडा सादर करणार आहे. सार्वजनिक वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा प्रस्ताव असावा. या प्रस्तावांमधून तीन विजेते निवडले जातील. त्यांना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. हे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 24 जुलै आहे यासंदर्भातील सर्व माहिती www.pmc.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
