Pune Moshi Building Collapse : मोशी दुर्घटनेत 9 जणांचा जीव गेल्यानंतर पिंपरी चिंचवड आयुक्तांना जाग; पर्यावरण विभाग अन् कंत्राटदाराला नोटीस!
Pune Moshi Garbage Depot Disaster Action : पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाने मोठी पावले उचलली आहेत.

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो परिसरात झालेल्या भीषण इमारत दुर्घटनेत 9 निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाला जाग आली आहे. या दुर्घटनेनंतर तब्बल चार दिवसांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे (PCMC) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गंभीर दखल घेतली आहे.
या दुर्घटनेला पालिकेचा पर्यावरण विभाग आणि कचरा व्यवस्थापनाचे काम पाहणारी कंत्राटदार कंपनी 'अँटोनी लारा रिन्युएबल' (Antony Lara Renewable) हेच पूर्णपणे जबाबदार असल्याचं प्रसारमाध्यमांनी सातत्यानं समोर आणलं होते. त्यानंतर सुरुवातीला क्लिन चिट देण्याच्या भूमिकेत असलेल्या आयुक्तांनी आता या दोन्ही घटकांना कारणे दाखवा नोटीस (Show Cause Notice) धाडली असून, त्रुटी आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
Pune Moshi Incident Update : 81 तासांनंतर बचावकार्य थांबले; 9 कामगारांचा मृत्यू
मोशी येथील या हृदयद्रावक दुर्घटनेनंतर युद्धपातळीवर सुरू असलेले बचावकार्य तब्बल 81 तासांनंतर रविवारी मध्यरात्री अधिकृतपणे थांबवण्यात आले. रविवारी रात्री 1 च्या सुमारास ढिगाऱ्याखालून नवव्या कामगाराचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले. या भीषण अपघातात एकूण 9 कामगारांचा मृत्यू झाला असून, एनडीआरएफ (NDRF) आणि अग्निशमन दलाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत 14 कामगारांचे प्राण सुरक्षित वाचवले आहेत.
बुधवार, 8 जुलै रोजी दुपारी 1.30 च्या सुमारास मोशी येथील 'वेस्ट-टू-एनर्जी' (Waste-to-Energy) प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर शेजारी असलेला 'लेगसी वेस्ट'चा (कचऱ्याचा) प्रचंड डोंगर मुसळधार पावसामुळे अचानक घसरून कोसळला होता. या ढिगाऱ्याखाली इमारतीचा मोठा हिस्सा दबला गेला आणि अनेक कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले होते.
PCMC Environment Department : वरचे दोन मजले कसे बांधले?
या दुर्घटनेनंतर आता महानगरपालिकेच्या आणि कंत्राटदाराच्या अनेक बेकायदेशीर बाबी चव्हाट्यावर आल्या आहेत. या इमारतीच्या केवळ तळमजल्याला पालिकेचा पूर्णत्वाचा दाखला (OC) मिळालेला असताना, नियम धाब्यावर बसवून पहिला आणि दुसरा मजला कसा काय उभारण्यात आला? तसेच तो कोणाच्या परवानगीने वापरात आणला गेला? असे अनेक गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
याशिवाय, कचऱ्याचे ढीग एकावर एक रचत असताना तिथे सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते की नाही? कचऱ्याचा डोंगर तयार होत असताना पालिकेच्या पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का केले? याचा जाब आता नोटीसीद्वारे विचारण्यात आला आहे. 9 जणांचा बळी गेल्याने पालिका आयुक्त स्वतः कायदेशीर कचाट्यात आणि अडचणीत आले आहेत. आता या प्रकरणी स्थापन करण्यात आलेली चौकशी समिती केवळ फार्स ठरणार की दोषी अधिकाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा:






















