Ajit Pawar plane crash: मोठी बातमी : अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी होणार, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
Ajit Pawar plane crash : अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Ajit Pawar Plane Crash Update: महाराष्ट्राला हदरवणारी बातमी आज सकाळी समोर आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज (बुधवारी, ता २८) बारामती या ठिकाणी मोठा अपघात झाला आहे. या विमान अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारामती विमानतळावर लँडिंग करण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांचं विमान शेतात कोसळलं, त्यानंतर विमानाला भीषण (Ajit Pawar Baramati Plane Crash) आग लागली. या भीषण दुर्घटनेत अजित पवारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अजित पवारांसह या विमानात असलेल्या ५ जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.(Ajit Pawar Baramati Plane Crash) या घटनेनंतर राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत माझा मोठा भाऊ गेला. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं आहे. कुणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता, असं म्हटलं आहे. तर या दुर्दैवी अपघाताची चौकशी व्हावी असंही त्यांनी म्हटलं आहे.
अपघाताची चौकशी व्हावी
आमच्या सहकाऱ्याचा जीव या विमान दुर्घटनेत गेला आहे, पाच ते सहा जणांचा मृत्यू झालेला आहे, त्यामुळे या विमान अपघाताची चौकशी नक्कीच होईल, नक्कीच झाली पाहिजे, कारण यापुढे देखील अशा प्रकारच्या अपघात होता कामा नये यासाठी हे गरजेचं आहे, आणि तसेच या अपघाताची चौकशी देखील होईल अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना
मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर असे म्हणणारे ते होते, ते मनाने अतिशय निर्मळ होते, त्याचा अनुभव मी घेतला आहे, असंही एकनाथ शिंदे पुढे म्हणालेत.
अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे
त्यांच्यासोबत मी मंत्रिमंडळात देखील काम केलं, मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं, महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना इतर कोणत्याही योजना सुरू केल्या तेव्हा आर्थिक घडी किंवा आर्थिक तरतूद आहे ती अतिशय उत्कृष्टपणे आणि उत्तमपणे अजित पवारांनी त्यावेळी संभाळली. त्यांच्या कामाचा चांगला अनुभव मला आहे, एकदा करायचं ठरवलं की अजित दादा ते करायचे, करतो, बघतो, पाहतो असे शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नव्हते, चांगला असेल तर काय करायचं तर करायचं म्हणायचे, जे वाईट आहे त्याला स्पष्टपणे नाही म्हणायचे, असा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा महाराष्ट्राने अनुभवलेला आहे, मी असेन किंवा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, अजितदादा असतील, आमच्या कामाच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या तरी आम्ही पहाटेपर्यंत काम करायचो, अजित दादा पहाटे लवकर कामाला सुरुवात करायचे, अजित दादांनी पहाटे सहा सहा वाजता देखील अपॉइंटमेंट दिल्या होत्या, त्यांच्या कामाचा अनुभव लोकप्रतिनिधींना आणि अधिकाऱ्यांना देखील आहे. वेळेचे महत्व आणि भान ठेवून ते काम करायचे, असा नेता हरपला आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राजकारणातील एक मोठा भाऊ हरपल्याची, गेल्याची भावना
काल परवाच आमची एका कार्यक्रमांमध्ये भेट झाली, त्यावेळी झालेल्या चर्चा, गप्पा, गोष्टी केल्या, आज सकाळी जेव्हा ही त्यांची घटना मला समजली, तेच सगळं समोर आणि त्याच आठवणी येऊ लागल्या, ते राजकारणात अनुभवी नेते होते, वयाने देखील ते माझ्यापेक्षा मोठे होते, आणि अनुभवानेही ते माझ्यापेक्षा मोठे होते. राज्यातील अनेक मोठ्या विषयांचा त्यांना मोठा अभ्यास होता, अनेक विभाग त्यांनी हाताळले होते, त्यांचा राज्याला मोठा फायदा होत होता. मंत्री मंडळात देखील काही विषयाच्या तेव्हा आपल्या राज्याची आर्थिक परिस्थिती अशी आहे आपल्याला काटकसर करावी लागेल अशी अगदी निर्भीडपणे सांगणारे अजित दादा आम्ही अनुभवले आहेत, अजित पवारांच्या जाण्याने फक्त त्यांच्या कुटुंबियांचे नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा न भरून येणारे नुकसान झालं आहे. माझ्यापेक्षा वयाने मोठे असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जी तयार झालेली जवळीक होती, आम्ही राजकारणात तिघे मिळून एकत्र काम करत असलो तरी राजकारणातील एक मोठा भाऊ हरपल्याची, गेल्याची भावना आणि दुःख देखील माझ्या मनामध्ये आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असंही शिंदे म्हणालेत.






















