Vaibhav Naik on Narayan Rane: बाळासाहेबांनी हाकललेल्या शिवसेनेचाच तुम्ही प्रचार केला, धनुष्यबाण चिन्हावर तुमचा मुलगा उभा राहिला; वैभव नाईकांचा नारायण राणेंवर पलटवार
Vaibhav Naik on Narayan Rane: भाजपचे खासदार नारायण राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. आता वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्यावर पलटवार केलाय.

Vaibhav Naik on Narayan Rane: त्रिभाषा धोरणासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) सरकारने रद्द केल्यानंतर पाच जुलै रोजी ठाकरे गटाची शिवसेना आणि मनसे संयुक्तपणे ‘विजयी मेळावा’ आयोजित करणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार आहेत. त्यातच भाजपचे खासदार नारायण राणे (Naryan Rane) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “जो बूंद से गई, वो हौद से परत येत नाही,” असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना भाऊबंदकीच्या नात्याने परत जवळ करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत, असे देखील नारायण यांनी यांनी म्हटले. आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
वैभव नाईक म्हणाले की, महाराष्ट्राच्या मनात जे आहे, ते आज घडतंय.त्यामुळे भाजपच्या नारायण राणे यांच्या सारखा नेत्यांना पोटशूळ येतोय. उद्धव ठाकरेंवर आरोप करण्यापेक्षा ज्या बाळासाहेबांवर तुम्ही बोललात, शिवसेना संपून टाकू असं बोलतात, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना शिल्लक राहू देणार नाही, असं सांगतात. त्याच बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर तुमचा मुलगा निवडणुकीत तुम्ही उभा केला, शिवसेनेचा तुम्ही प्रचार केला. त्याच बाळासाहेबांनी तुम्हाला पक्षातून हाकलून दिलं होतं. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी करतात. तुम्हाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असं जोरदार प्रत्युत्तर त्यांनी नारायण राणेंना दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत.सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले. गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती, असे नारायण राणे यांनी सोशल मिडीयावर पोस्ट टाकत म्हटले आहे.
आणखी वाचा























