![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास
Radhakrishna Vikhe Patil : भारताने विश्वकप जिंकला हा भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक जिंकणार असल्याचे राधाकृष्ण विखेंनी म्हटले.
!['भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास Radhakrishna Vikhe Patil India won the T20 World Cup we will also win the Vidhan Sabha Election Maharashtra Marathi News 'भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभा जिंकणार'; राधाकृष्ण विखे पाटलांना विश्वास](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/30/79a0680b4990890bac5e50b76cc0e78e1719731870398923_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जळगाव : भारताने रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्त्वात टी 20 वर्ल्ड कपचे (T20 World Cup 2024) विजेतेपद मिळवलं. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) 7 धावांनी पराभव करत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे संपूर्ण देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. यावर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी टीम इंडियाचे कौतुक केले असून भारतानं विश्वकप जिंकला, तसंच आम्ही विधानसभेची जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
विधानसभेची निवडणूक ताकदीने जिंकणार
जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, भारताने विश्वकप जिंकला हा सगळ्या भारतीयांसाठी आनंदाचा क्षण आहे. भारतीय संघाचे आम्ही स्वागत करतो. त्यांचे अभिनंदन करतो. भारताने जसा विश्वकप जिंकला, तसेच आम्ही आगामी विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election) त्याच ताकदीने जिंकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनिल पाटील भाजपमध्ये येण्याची चर्चा, राधाकृष्ण विखे म्हणाले...
माजी मंत्री डॉ. सतीश पाटील (Dr Satish Patil) यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील (Anil Patil) हे अजित पवार यांना सोडून भाजपामध्ये जाणार असल्याचे वक्तव्य केले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले की, या विषयात आपल्याला माहीत नाही, करमणूक म्हणून आपण अशा बातम्याकडे पाहतो, अशा बातम्या ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात.
शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल
इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात दुधाला भाव कमी असल्याचे म्हटले जात आहे. शेतकरी दुधाला भाव मागत आहे, असे विचारले असता राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, कायमस्वरूपी पाच रुपये अनुदानाची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल. काही बाबतीत दुधाचे संकलन करायला अडचणी येतात. दुधाच्या भुकटीची निर्यात थांबल्याने काही अडचणी आहेत. दूध भुकटीच्या निर्यातीला काही प्रोत्साहन देता येईल का? यावर विचार केला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जळगाव विमानतळावर आमदार सुरेश भोळेंचे नाराजीनाट्य
दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज जळगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी आलेल्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी विमानतळावर अडवल्याने आ सुरेश भोळे यांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पोलिसांना अखेर माफी मागण्याची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस जळगाव विमानतळावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी आ. सुरेश भोळे आणि काही कार्यकर्ते आत जाण्याच्या प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी त्यांना आतमध्ये प्रवेश देण्यास मज्जाव केला. यामुळे आ सुरेश भोळे यांनी नाराजी व्यक्त केली. विषय वाढु नये म्हणून पोलिसांनी तातडीने आ. सुरेश भोळे यांची समजूत काढून त्यांची माफी मागत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र आ सुरेश भोळे यांचे नाराजी नाट्य चर्चेचा विषय बनले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)