Mumbai BDD Chawl Aditya Thackeray: निमंत्रण पत्रिकेत नाव, पण ती एक गोष्ट खटकली?, आदित्य ठाकरे नाराज; बीडीडीच्या कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता
Mumbai BDD Chawl Aditya Thackeray: वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील 556 रहिवाशांना आज चावी वाटप केले जाणार आहे.

Mumbai BDD Chawl Aditya Thackeray मुंबई: वरळीमधील बीडीडी चाळ (Mumbai BDD Chawl) पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात म्हाडाकडून येथील 556 रहिवाशांना आज चावी वाटप केले जाणार आहे. आज (14 ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता यशवंत नाट्यमंदिर येथे 556 लाभार्थ्यांना चावी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. आज या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत अनेक मंत्री हजर राहणार आहेत. तसंच स्थानिक आमदार म्हणून यावेळी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनाही निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र आदित्य ठाकरे आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे.
आदित्य ठाकरे यांचे कार्यक्रम पत्रिकेत जरी नाव असलं तरी कार्यक्रम ग्रुप रेषेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या भाषणाचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही. आजच्या बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचीच भाषण होणार असल्याचं समोर आलं आहे. बीडीडी चाळ पुनर्विकास कार्यक्रमात स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांचं भाषण नसल्याने नाराजी असल्याने आदित्य ठाकरे उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. इतर ठाकरेंचे नेते कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती सध्या समोर येत आहे.
बीडीडी चाळीतील रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका- (Mumbai BDD Chawl)
मुंबईत वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग येथे बीडीडी चाळी असून, त्यांचा पुनर्विकास म्हाडाच्या माध्यमातून केला जात आहे. सुमारे 92 एकर जागेवर 195 बीडीडी चाळी असून, त्यामध्ये 15 हजार 593 सदनिका, गाळे आणि व्यावसायिक स्टॉल आहेत. बीडीडी चाळींचा टप्प्याटप्प्याने पुनर्विकास केला जाणार असून, येथील रहिवाशांना 500 चौरस फुटांची सदनिका दिली जाणार आहे. त्याची सुरुवात झाली आहे.
अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका-
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाद्वारे 121 जुन्या चाळींतील 9 हजार 689 रहिवाशांचे पुनर्वसन होणार आहे. म्हाडातर्फे वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात प्रकल्पाच्या एकूण भूखंडापैकी 65 टक्के जागेचा पुनर्वसनासाठी वापर करण्यात आला आहे. 160 चौरस फुटाच्या खोलीत राहणाऱ्या पात्र रहिवाशांना पुनर्वसन इमारतीत 500 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त 2 बीएचके सदनिका मालकी तत्त्वावर विनामुल्य वितरित केली जाणार आहे. 40 मजल्यांच्या 34 पुनर्वसन इमारती उभारण्यात येणार इमारत क्रमांक एक मधील डी व ई विंग मधील 556 सदनिकांचे वितरण केले जाणार आहे. स्टील्ट + पार्ट सहा मजली पोडियम पार्किंगमध्ये प्रत्येक सदनिकाधारकास एकास एक पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोडियम पार्किंगच्यावर सातव्या मजल्यावर पर्यावरण पूरक उद्यानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसन सदनिकेत व्हिट्रीफाईड टाईल, ग्रेनाइट ओटा, अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या, ग्रानाईट स्वयंपाकचा ओट्टा, ब्रांडेड प्लंबिंग फिटिंग्स आदी सारख्या अनेक सुविधा देण्यात आल्या असून इमारतीत अग्निरोधक यंत्रणा, तीन लिफ्ट, 1 स्ट्रेचर लिफ्ट, 1 फायर लिफ्ट देण्यात आली आहे.
बीडीडी चाळी ब्रिटीश सरकारकडून बांधण्यात आल्या होत्या-
बीडीडी चाळी 1920 ते 1925 च्या दरम्यान ब्रिटीश सरकारकडून बांधण्यात आल्या होत्या. बीडीडीचं पूर्ण नाव बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असं होतं. ब्रिटिशांच्या काळात मुंबईत रोजगाराच्या निमित्तानं येणाऱ्या कामगारांच्या आणि स्थलांतरितांच्या निवासाच्या सोयीसाठी बीडीडी चाळी बांधण्यात आल्या होत्या. नंतरच्या काळात गिरणी कामगार आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
























