Wet Drought in Maharashtra: राज्यात ओला दुष्काळ जाहीर होण्याच्या हालचालींना वेग, कृषीमंत्री अन् मदत-पुनवर्सन मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?
Wet Drought in Maharashtra: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. शेतामधील पिकांसोबतच माती वाहून गेल्याने जमिनी खरवडल्या गेल्या आहेत.

Wet Drought Farmers: मराठवाड्यासह राज्यातील अन्य भागांमध्ये गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्य सरकारकडून ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. सरकारी पातळीवर त्यादृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आज राज्य मंत्रिमंडळाची (Cabinet Meeting) बैठक असून यावेळी सर्व मंत्र्यांकडून एकमुखाने ओला दुष्काळा जाहीर करण्याचा प्रस्ताव मांडला जाऊ शकतो. तत्पूर्वी राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे आणि मदत व पुनवर्सन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी यासंदर्भात महत्त्वपूर्ण संकेत दिले. दोन्ही मंत्र्यांनी राज्य सरकारकडून ओला दुष्काळ जाहीर होऊ शकतो, असे संकेत दिले. (Mahayuti Government)
शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. हे निसर्गाचे संकट आहे, धीराने त्याचा सामना करावा लागेल. शासन आपल्या पाठीमागे आहे, पंचनामे पूर्ण झालेल्यांना नुकसान भरपाई दिली आहे. काहींना दिवाळीपर्यंत मदत दिली जाईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. यावेळी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत त्यांना विचारणा करण्यात आली. यावेळी त्यांनी म्हटले की, कोणतीही मागणी करताना निकष बघणंे महत्त्वाचे आहे. मात्र, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे ही शासनाची भूमिका आहे. राज्य किंवा केंद्राची मदत ठरली आहे. काही काळ रक्कम वाढवली होती. आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासमोर आज अहवाल ठेवला जाईल. शेतकऱ्यांसाठी योग्य तो चांगला निर्णय घेतला जाईल. जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत केली जाईल. राज्यात 70 हजार एकर पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, यवतमाळ, जालना, परभणी, बीड जिल्ह्यांमध्ये झाले आहे. एकूण ३० जिल्ह्यात शेतीच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली.
Farmers Crop loss: मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान, योग्य तो निर्णय घेतला जाईल: मकरंद पाटील
राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री परिस्थितीवर सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री हे संबंधित भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मोठं नुकसान झाले आहे. शेती, घरांची पडझड आणि नुकसान झाले आहे. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्याचे मकरंद आबा पाटील यांनी म्हटले. शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात योग्य तो विचारविनिमय करुन निर्णय घेतला जाईल. यापूर्वी राज्य सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांना जीआर काढून नुकसानभरपाई दिली होती. जुलै महिन्यापासून छत्रपती संभाजीनगरमध्ये 721 कोटी, नाशिकमध्ये 13.77 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ऑगस्टमध्ये पुणे विभागासाठी 14.29, नागपूर विभागाला 23.85 कोटी आणि अमरावती विभागाला 565.60 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. तर कोकणाला 10.53 कोटी रुपये देण्याचे निर्देश देण्यात आले होते. ही सगळी मिळून राज्य सरकारने खरीप हंगामासाठी आतापर्यंत 2200 कोटी रुपये देण्याचे निर्देश दिले असल्याचेही मकरंद पाटील यांनी सांगितले.
आणखी वाचा
























