Laxman Hake & Manoj Jarange: ज्यांच्यापासून संरक्षण हवं तेच लांडगे ओबीसींच्या कळपात शिरले तर... लक्ष्मण हाकेंचा मराठा राज्यकर्त्यांवर हल्लाबोल
Laxman Hake on OBC Reservation: लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास कडाडून विरोध केला. अजित पवारांच्या सरकारविरोधी हालचाली.

Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी नाही. मनोज जरांगे यांची मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचं आरक्षण संपलेलं असेल, असा धोक्याचा इशारा ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी दिला. ओबीसी समाजाला शासनकर्त्या आणि राज्यकर्त्या जमातीपासून संरक्षण मिळावं म्हणून ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) देण्यात आले. मात्र,ज्या जमातीपासून त्यांना संरक्षण पाहिजे तेच सगळे लांडगे ओबीसींच्या कळपात घुसले तर मेंढरांचं काय होईल, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.
मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेचे मी स्वागत करतो, त्यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, असे सूतोवाच केले. पण राज्यात 59 लाख कुणबी प्रमाणपत्र वाटली गेली असतील तर राज्यातील ओबीसी समाजाचे आरक्षण संपलेले आहे. राज्यातील डोंगरात, गावगाड्यात ओबीसी समाज आहे. मात्र, ओबीसी समाजाला एकत्र आणणे, ही अवघड गोष्ट आहे. ओबीसी जागरुक असता तर आरक्षण काढून घेण्याची हिंमत कोणी केली असती का? महाराष्ट्रातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक समाज ओबीसी आहे. सुतार, कुंभार, परत, नाभिक, मेंढपाळ, बंजारा समाजाचं काय होणार? ओबीसी समाज बोलत नाही, रस्त्यावर उतरत नाही, याचा अर्थ त्यांचं आरक्षण संपवून टाकायचं का, ते मराठ्यांना देऊन टाकायचं का? राज्य सरकारला झुंडशाहीची भाषा समजत असेल तर आम्हीही संघर्ष यात्रा आणि मोर्चे काढू, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.
Laxman Hake on Ajit Pawar: अजित पवारांचा गट सरकार उलथवून टाकण्यासाठी प्रयत्न करतोय; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
मनोज जरांगे यांचा हा आरक्षणाचा लढा नाही. हा गरीब मराठा बांधवांसाठीचा लढा नाही. मराठा समाजाच्या शिक्षण, नोकरी यासाठी जी कळवळ दाखवली जात आहे, त्यासाठी हा लढा नाही. मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे जाताना स्क्रीप्ट फोडली होती. जरांगे म्हणाले होते की, मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आजपर्यंत विरोधी पक्ष प्रयत्न करत आहे, असे आम्ही सांगत होतो. मात्र, आज मी जबाबदारीने सांगतो की, सरकार उलथवण्यासाठी विरोधी पक्षासोबत अजित पवार यांचे आमदार आणि खासदार सामील आहेत. मी माझ्या पदरचं काहीही सांगणार नाही, मी हे जबाबदारीने सांगत आहे. मनोज जरांगे यांच्या आडून महाराष्ट्रातील सत्ताधारी आमदार, खासदार सरकार अस्वस्थ आणि बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केला.
आणखी वाचा
























