Eknath Shinde On Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं तुमच्यावर एवढं प्रेम अन् देवेंद्र फडणवीसांवर राग का?; एकनाथ शिंदे म्हणाले...
Eknath Shinde On Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर देखील भाष्य केलं.

Eknath Shinde On Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा जीआरबाबत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी एकत्र निर्णय घेतला, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केलंय. तसेच मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) घेतलेला निर्णय टिकलाही पाहिजे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. त्यामुळे विरोधकांच्या टीकेकडे लक्ष देत नाही, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. एकनाथ शिंदेंनी यांनी एबीपी माझाच्या गणरायाचे दर्शन घेतले. त्यावेळी एकनाथ शिंदेंनी एबीपी माझाला खास मुलाखत दिली. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर देखील भाष्य केलं.
मनोज जरांगे पाटील यांचं एकनाथ शिंदेंवर एवढं प्रेम का?, तसेच मनोज जरांगेंना देवेंद्र फडणवीसांचा राग का?, असा सवाल एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असताना जे काही निर्णय घेतले ते टीम म्हणून घेतले. जनहिताचे निर्णय घेतले, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच आधीच्या लोकांनी जे स्पीडब्रेकर टाकले होते, विकासाच्या कामांमध्ये ते आम्ही काढून टाकले. अनेक लोकाभिमुख प्रकल्प तातडीने, वेळेच्या आधी मार्गी लावले. मुख्यमंत्री हे राज्याचं प्रमुखपद आहे. मनोज जरांगेंनी समाजासाठी आंदोलन केलं आणि त्यांनी आपल्या संस्कृतीचं पालन केलं पाहिजे. माझ्याबद्दल कोण, काय संशय व्यक्त करतं याचा विचार मी करत नाही. मी कुठलीही गोष्ट लपून-छपून करतो, उघडपणे करतो. जे कुणी माझ्यावर असले आरोप करतो त्याला उत्तर देण्याची गरज मला नाही, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं. मी मुख्यमंत्री होतो, तरी कार्यकर्ता म्हणून काम पाहत होतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिल्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं- एकनाथ शिंदे
मी दिल्लीला गेलो, गावी गेलो तरी लोकांना पोटदुखी होते. मला अनेकवेळा इतर राज्यांतील प्रमुखांना भेटावे लागते. राज्यासाठी काही मागायचे असेल तर दिल्लीला जावे लागणे, यात गैर काय?, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह हे राज्याला मदत करत असतात. आम्ही दिल्लीला इतरांसारखे लपून-छपून जात नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अनेक महिल्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळालं. हा निधी देण्यासाठी थोडीफार कसरत करावी लागते. त्याचवेळी राज्यात जे पायाभूत कामं सुरू आहे. त्यांच्यातूनही पैसा जमा होतो. आम्ही जो बोललो आहे, ते आम्ही देणारच, प्रिंटींग मिस्टेक म्हणणार नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

























